Wednesday, May 8, 2013

संताजी घोरपडे

 

महाराजांना एका पेक्षा एक असे सेनापती लाभले तीच परंपरा पुढे शंभुराजांच्या कालात हंबिराव मोहिते यांनी चालू ठेवली. शंभुराजांना आणि कवी कलाशंना संगमेश्वरी शेख निजाम यानि पकडले आणि त्याच वेळेस म्हालोजी घोरपडे मारले गेले. या नंतर मोघलांनी रायगड घेतला आणि जणू मराठ्यांचे हे राज्य (महाराजांचे दिव्य स्वप्नच) नष्ट होते काय अशी परिस्तिथि निर्माण झाली. पण याच वेळेस महाराजांच्या आणि शंभु राजांच्या तल्मित तयार झालेले काही रणझुंझार पुढे सरसावले आणि याच मराठी भूमीत त्या मस्तावलेल्या मोघल बादशाहला गाढ़ला. या योध्यात एक आघाडिचा वीर म्हणजे "सरसेनापती संताजी घोरपडे". मराठ्यांचा इतिहास सेनापती संताजी घोरपडे यांचे नाव न घेता पूर्ण होउच शकत नाही.


चोलराजा हा घोरपडे घराण्याचा वंशज. चोलाराजचा मोठा मुलगा पिलाजी घोरपडे (बजी घोरपडे यांचे आजोबा) हा मुधोल ची जहागीर संभालून होता तर त्याचा दूसरा पुत्र वल्लभजी यांस वाई प्रांतातल्या पाटिलक्या देण्यात आल्या होत्या. याच वल्लभजीचा नातू म्हणजे "म्हालोजी घोरपडे" ज्यांना संगमेश्वरी वीर मरण प्राप्त झाले. आणि याच वल्लभजीचा पणतू म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे, ज्यांनी स्वराज्य रक्षणात मोलाची कामगिरी बजावली. (sources- डॉ.जयसिंह पवार)

म्हालोजी घोरपडे हे शिवाजी महाराजांस आपल्या ५०० स्वरानिशी येउन मिळाले. म्हालोजी हे पुढे पन्हालगडाचे तटसरनौबत होते. शंभुराजे जेव्हा दिलेर खानाकडून निघून आले तेव्हा त्यांची व्यवस्था पान्हाळ्यावर केलि होती आणि सोबतीस म्हालोजी घोरपडे दिले होते. असे कापशीकर घोरपडे घराण्याचा इतिहास सांगतो. संपूर्ण शंभु राजांच्या कारकिर्दीत म्हालोजी घोरपडे हे स्वराज्य राखण्याचे चोख काम करीत होते. शिरक्यांचे बंड मोडून काढण्याच्या वेळी स्वतः शंभु राजांच्या सोबत म्हालोजी घोरपडे हजर होते. मोगल सरदार मुकर्रब खान जेव्हा संगमेश्वर येथे शंभु राजांस कैद करण्यास पोचला तेव्हा म्हालोजी घोरपडे यांनी लढाई केलि पण ते मारले गेले.संताजी घोरपडे यांचे जन्म साल इतिहासाला माहित नाही पण जयसिंह पवारांच्या अंदाजानुसार साधारण १६४५ असू शकते. चिटणीस बखर सांगते की हंबिररावनच्या हाताखाली जे अनेक वीर होते त्यात एक संताजी घोरपडे होते. अहमदाबाद, बुराण्पुर, जाल्नापुर, सिंदखेड हे मुलुख लुटत हंबिरराव स्वराज्यात आले. हंबिररावनच्या विनंतीवरुन संताजिंस जुमलेदारी दिल्ही. दक्षिण दिग्विजय मोहिमेत कोप्पल प्रांत जिंकणे ही एक महत्वाची योजना होती. कोपल हे अदिल्शाहिचे सरदार हुसैनखान आणि कासिम खान यांचे ठाणे होते. या मोहिमेत हंबिरराव यांनी या पठाण बंधूंचा पड़ाव केला आणि कोपल स्वराज्यात सामील केले. ९१ कलमी बखर सांगते की या युद्धात संताजी आणि बहिर्जी घोरपडे यांनी मोठे रण माजवले. पण जालन्याच्या स्वारित संताजिच्या हातुन काही तरी चुक झाली म्हणुनच महाराजांनी त्यास मुजर्यास न येण्याची शिक्षा ठोठावली असे ९१ कलमी बखर सांगते. जालनाची मोहिम ही महाराजांच्या जिवनातील शेवटची मोहिम, जालना शहर मराठयानी ४ दिवस लुटले पण लूट परत आणताना रणमस्तखान या मोगल सरदाराने हल्ला केला आणि बरीच लूट परत घेउन गेला, या यूद्घात सिधोजी निंबाळकर कामी आले.

शंभु राजांच्या मृत्यु नंतर मोघलंनी कोकणात मुसंडी मारली. खुद्द रायगडाला विळखा पडला, जुल्फिकार खान याने रायगड आणि आसपासचा परिसर जिंकण्यासाठी पराकाष्ट केले. याच दरम्यान संताजी खर्या अर्थाने एक नेता म्हणुन उदयास आले. त्यांनी राजाराम, ताराराणी, राजसबाई यांस धनाजी बरोबर सुखरूप विळख्यातुन बाहेर काढले. राजाराम राजे प्रतापगड मार्गे वासोटा, पन्हाला करत बेदनुरच्या राणीच्या साह्याने जिंजिंस सुखरूप निघून गेले. येथे महाराष्ट्रात, शंभुराजांच्या मृत्यु आणि मराठ्यांचे राज्य संपणार या धुंधित मोघल गाफिल झाले होते. नेमक्या याच गोष्टीचा फायदा संताजिने घेत खुद्द औरंगजेबाच्या तंबूवरील कळस कापून नेले. संताजीने आपल्या बंधू आणि विठोजी चव्हाण यांच्या साह्याने अवघ्या २००० सैन्यानिशी तुलापुर येथील मोघल छावणीवर हल्ला करुन त्यांची बहुत हानीकरुन सिंहगडावर पसार झाले. (संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध) नंतर संताजिंनी जुल्फिकार खानावर हल्ला केला. जुल्फिकार त्या वेळेस रायगडाला वेढा घालून बसला होता. या छाप्यात त्यांना बरीच लूट मिळाली, ती घेउन ते थेट पन्हाल्यास असलेल्या राजाराम राजांस भेटले.(संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध)साधारण १६८९ (नोव्हे- डिसे) या कालात शेख निजाम कोल्हापुरास होता. ह्यास संताजिने युद्धात हरवले, मुकर्रब खान याच युद्धात जबर जख्मी झाला (संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध) . पुढे त्याचा (मुकर्रब खान) कुठे उलेख सापडत नाही बहूदा तो नंतर या जख्मानमुले मेला सुद्धा असेल.


पुढे हाच स्वातंत्र लढा संताजी-धनाजीने बेलगाव-धारवाड़ करत कर्नाटक प्रांतात नेला. नंतर ह्यांनी जिंजीकड़े आपला मोर्चा वळवला. जिंजी किल्ल्यास जुल्फिकार खान, त्याचा बाप असद खान, आणि शेहजादा काम्बक्ष वेढा घालून बसले होते. संताजी साधारण १५ हजाराचे घोड़दल घेउन तर धनाजी साधारण १० हजाराचे घोड़दल घेउन जिंजिंस थडकले. प्रथम धनाजी आपली फौज घेउन सामोरे आले आणि मोगली सैन्यावर हल्ला केला. मागुन येणार्या संताजिंस अलिमर्दाखान आडवा आला. अलिमर्दाखान हा जिंजिंच्या मोगली फौजेला रसद पुरवित असे. त्याची रसद मारीत संताजी पुढे निघून गेले. (संदर्भ- जेधे शकावली) या लढाईची फ्रेंच गवरनर मार्टिन याने आपल्या डायरित नोंद केलि आहे. संताजी आणि धनाजी यांच्या या जोशा समोर मोगल सैन्याची दाणादाण उडाली. जिंजीच्या मोगली सैन्याचीतर वाताहात झाली. त्यांची रसद तोडली गेली, अफवांचे पीक उठवले जाऊ लागले होते. त्यात किल्ल्यातुन मोगली फौजेवर हल्ले होऊ लागले. स्वतः जुल्फिकार खान रसद आण्यास बाहेर पडला असता त्याचा सामना संताजी बरोबर झाला. जुल्फिकार खान कसाबसा आपला जीव वाचवत परत छावनित आला. जुल्फिकार खानने राजारामकड़े वाट मागितली आणि जिंजीचा वेढा उठवण्याचा वायदा केला. २२ जानेवारी १६९३ रोजी हुक्माची वाट न पाहता मोगली सैन्य जिंजी सोडून वांदीवाश येथे निघून गेले. (संदर्भ- मराठ्यांचे स्वतंत्रयुद्ध)

जुल्फिकार खानास वाट दिल्यावरून संताजी आणी राजाराम राजात वाद निर्माण झाला. वास्तविक संताजी हे एक खरे सेनानी होते त्यांना राजकारणाची तितकीशी जाण असण्याची शक्यता कमी होती. या उलट राजाराम राजांस अनेक राजकारणी मंडली सल्ले देत होती.संताजी जिंजी सोडून कांचीपुरमला निघून गेले. वाटेत त्यांना कासिमखान जिंजी कड़े चालून येत असल्याची बातमी मिळाली. कासिम खानास बादशाहने जुल्फिकार खानास मदत करण्यासाठी पाठविले होते. कांचीपुरम नजिक कावेरिपाक या ठिकाणी खान असताना संताजीने अचानक हल्ला चढ़विला. अगदी थोड्याच वेळात खानाच्या फौजेचा धुव्वा उडाला आणी खान कांचीपुरमला पलुन गेला, तिथे त्याने देवलांचा आश्रय घेतला आणी धोका मिटे पर्यंत तिथेच लपून बसला.याच दरम्यान बहिर्जी घोरपडेने राजाराम विरोधात बंडखोरी केलि आणी याचप्पा नायका संगे मोगलान विरोधात लढु लागले.राजारामने संताजिंस सुद्धा सेनापति पदावरून दूर केले. आता सेनापति पद धनाजी जाधवान कड़े देण्यात आले होते. येथे एक लक्ष्यात घेण्या सारखी गोष्ट म्हणजे, सेनापतिपद गेले तरी संताजीने मोग्लान विरोधातला लढा चालूच ठेवला. ते मोग्लाना वतना साठी किंवा कुठच्या पदासाठी जाउन मिळाले नाहीत. हाच खरा मराठ्यांचा स्वातंत्र लढा जो १८५७ च्या क्रांति पेक्षा ही किती तरी पटीने सरस होता.जाने १६९५ दरम्यान संताजी ने कर्नाटकातुन मुसंडी मारली ती थेट बुरहानपुरात. मोगली सुबेदाराने प्रतिकार करण्याचा प्रयन्त केला पण मराठ्यांच्या २०००० सैन्या पुढे त्याचा निभाव लागला नाही आणि तो बुरहानपुर सोडून पलुन गेला. मराठयानी बुरहानपुर लूटले आणि ही बातमी जेव्हा औरन्ग्यास कळली तेव्हा त्याने बुरहानपुरच्या सुबेदारास बांगड्यानचा आहेर पाठवला.नंतर संताजीने सुरत लूटण्याचा बेत आखला होता पण तसे न करता त्याने वेढा घातला तो नंदुरबार शहरास. नंदुरबारच्या सुभेदाराने शहर राखण्यासाठी संताजी बरोबर लढाई केली. संताजी नंदुरबारला जास्ती वेळ वेढा घालून बसले नाहीत आणि ते परत खटाव प्रांतात आले. तिथे त्यांने अनेक मोगल सरदारांना लढाईत मारले, अनेक मोगल सरदार युद्ध सोडून पलुन गेले, अनेक सरदार कैद झाले. (संदर्भ- मराठ्यांचे स्वातंत्रयुद्ध)

संताजीच्या कारकिर्दीत दोन मोठे विजय म्हणजे दोड्डरी ची लढाई आणि दूसरी बसवापट्टणची लढाई. या दोन लढायांची तुलना साल्हेर किंवा कांचनबारीच्या लढायांशी होऊ शकते. संताजीस नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने कासिम खाना बरोबर अनेक नामवंत सरदार त्यांच्या मागे पाठवले होते. कासिम खान बरोबर खानाजाद खान, असालत खान, मुराद खान, सफसिख खान असे अनेक सरदार मोठा तोफखाना, भरपूर धन, आणि काम्बक्षचे सुद्धा सैन्य दिमतीला दिले होते. संताजी मोगल सैन्याच्या हालचाली वर लक्ष ठेउन होते. त्यांना आपल्या गुप्तहेरा कडून बित्तंबातमी मिळत होती. कासिम खानाने आपले सामान रवाना केल्याची खबर संताजीस मिळाली. संताजिने गनिमी काव्याचे डाव आखले आणि त्या प्रमाणे आपल्या सैन्याच्या ३ तुकड्या केल्या. पहिल्या तुकडीने कासिम खानाच्या सामानावर हल्ला केला. तो हल्ला परतावण्यासाठी कासिम खानने आपले बरेच सैन्य खानाजाद खाना बरोबर तिथे पाठवून दिले. संताजिच्या दुसर्या तुकडीने खानाजाद खानाला वाटेत गाठला आणि लढाई सुरु केली. आता कासिम खानाची छावणीत शुकशुकाट होता, तीच संधी साधत मराठ्यांच्या तिसर्या तुकडीने या छावणीवर हल्ला केला आणि मोगली सैन्याची पूरी वाताहात करून टाकली. मोगली सैन्य रणंगण सोडून पळत सुटले आणि दोडेरीच्या गढ़ीचा आश्रय घेतला. संताजीने या गढ़ीला वेढा घातला आणि मोगलांची रसद मारली. दोडेरीच्या मोगल किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कासिम खानाच्या सैन्यास संताजीच्या तावडीत मोकले सोडले. कासिम खान आणि त्याचे सरदार दोरखंड लाउन एक रात्री किल्ल्यात निघून गेले, फौजेला संताजीच्या तोंडी देऊन. जसे दिवस जाऊ लागले तशी किल्ल्यातली रसद सुद्धा संपत आली. खानाचे सैन्यतर उपाशी मरू लागले. शेवटी मोग्लंनी संताजीकड़े जीवदानाची याचना केली. संताजीने मोग्लांचे अनेक हत्ती, घोडे, तोफा, नगद, आणि सोबत दोन लाख होनाची खंडणी घेतली. ही नामुष्की सहन न होउन कासिम खानाने विष पिउन आत्महत्या केली. या लढाईचे दाखले मोगल इतिहासकार देतात पण आपल्या इतिहासकारांनी या एका मोठ्या लढाईचे साधे वृत सुद्धा दिले नाही.(संदर्भ- मराठ्यांचे स्वातंत्रयुद्ध)

संताजी घोरपडे यांच्या आयुशातला दूसरा मोठा विजय म्हणजे बसवापट्टणची लढाई. या युद्धात संताजिने हिम्मत खान बहादुर याचा पूर्ण बीमोड केला. दोद्देरीच्या युद्धात मराठयानी कासिम खानचे कंबरडेच मोडले होते. वास्तविक कासिम खानच्या मद्तींस औरंगजेबाने हिम्मत खानास पाठवले होते. बसवापट्टणच्या जवळ हिम्मत खानाने आपला तळ टाकला होता, तो संताजीवर चालून जाण्यास कुचरत होता. एके दिवशी संताजी अगदी अल्प फौजेनिशि हिम्मत खानवर चालून गेले. हिम्मत खानास जेव्हा हे कळले तेव्हा तो सुद्धा युद्धास तयार झाला. मोगल सैन्य संताजिंवर तुटून पडले, युद्धास तोंड फुटले. मराठे युद्धात पडू लागले आणि संताजिने माघारिचे कर्ण फूंकले. आता मोग्लांस चेव चडला आणि पळणार्या मराठ्यांचा त्यांनी पाठलाग सुरु केला. संताजी बसवापट्टणच्या गडी बाहेरच्या जंगलात घुसले. त्यांच्या मागोमाग मोगल सुद्धा तिथे घुसले. जंगलात आधीच लपून बसलेल्या मराठ्यांच्या बंदुकधार्यंनी एक एक करुन मोग्लंना टिपले. युद्धाचे पूर्ण चित्रच पालटले, जे मोगल सैन्य वरचढ़ झाले होते तेच आता पाठ दाखवून पलू लागले. पण त्यांच्या परतीचा मार्ग बंद केला होता. आता हिम्मत खान सुद्धा शर्थीने लढु लागला पण बंदुकीचा एक गोला त्याच्या डोक्यास लागला आणि तो बेशुद्ध झाला. हिम्मत खानाचा मुलगा सुद्धा या युद्धात जख्मी झाला. बाप लेकास मोगल सैनिक परत कसेबसे घेउन गेले. त्या रात्री हिम्मत खान मरण पावला. खानाच्या लष्करातील अनेक घोडे, हत्ती, तोफा, शास्त्रे संताजिच्या हाती लागले. या लढ़ाईचा खाफिखान दाखला देतो. या लढ़ाई नंतर संताजी, जिंजिंस राजाराम राजांस भेटण्यासाठी निघून गेले.

संताजी जिंजी कड़े येत असताना, वाटेत अर्काट नजिक त्यांचा मुकाबला जुल्फिकार खानाशी झाला. या युद्धात संताजिचा पाडाव झाला आणि ते पलुन गेले असे भीमसेन सक्सेना लिहितो. ते थेट गेले ते जिंजित, तिथे त्यांनी मद्रास आसपास मोहिम करण्याचे मनसूबे रचले असे कही इंग्लिश पत्रे लिहितात. पण याच दरम्यान त्यांचे आणि राजाराम राजांचे काही तरी बिनसले. नक्की काय झाले याचे दाखले कोणीच देत नाहीत. पण राजारामशी वितुष्ट येताच संताजी आपल्या २० हजार फौजेसह जिंजी बाहेर पडले. संताजिचा बीमोड करण्यासाठी खुद्द राजाराम राजे सोबतीला धनाजी जाधव, अमृतराव निमंबालकर असे वीर घेउन जिंजी बाहेर पडले. संताजिना त्यांनी आयेवरकुट्टी यथे गाठले, या दोघात मोठे युद्ध झाले आणि शेवटी राजारामचा पराजय झाला. धनाजी पलुन जाण्यात यशस्वी झाले तर अमृतराव निमंबालकर या युद्धात मारले गेले. खुद्द राजराम राजांस संताजिने कैद केले पण नंतर सन्मानाने मुक्त सुद्धा केले.जरी छत्रपतिशी वितुष्ट आले होते तरी सुद्धा संताजिने मोग्लंशी संगर्ष चालूच ठेवला. मराठ्यांच्या यदाविच्या बातम्या जुल्फिकार खानास कळल्या आणि त्याने आपली फौज अर्काट बाहेर काडली पण संताजी पुन्हा अर्काट दिशेनी येत असल्याची बातमी कळताच खान परत निघून गेला. पुढे संताजी कृष्णपट्टाम लूटले, मोगल सैन्य बघ्याची भूमिका घेत होते. नंतर संताजिने महाराष्ट्राची वाट धरली आणि येथेच त्यांचा शोकांतिकेची सुरवात झाली. राजाराम राजांनी आता भावनिक आव्हान केले होते आणि अनेक संताजिचे सैनिक पुन्हा राजरामांस जाउन मिलू लागले. हीच संधी साधून धनाजीने संताजिवर हल्ला केला आणि त्यांचा पूर्ण पाडाव केला. संताजी असह्य होउन आपल्या घराकडे निघून गेला. आता मोगल सैन्य सुद्धा संताजिच्या मागावर होते.सातारच्या प्रदेशात शंभुमहादेवचा डोंगर रांगात संताजिने आश्रय घेतला होता. शंभुमहादेवचा डोंगर रांगात मोगल सैन्य येण्यास कुचरत असे कारण हा प्रदेश घनदाट जंगलांनी वेढ़ला आहे. या अगोदर मराठयानी याच डोंगर रांगात दबा धरून अनेक मोगल सैन्याला कापून काढले होते.संताजिंच्या खुनाच्या अनेक आख्यायिका आहेत. कोणी सांगते की संताजिंस मोगल सरदार लुफ्तलुल्ला खानाने मारले. तर कोणी लिहिते की संताजिंस त्याच्याच माणसाने फितुरिने मारले, काहींच्या मते दवेदारानी मारले असे आहे. पण इतिहास जाणकरांच्या मते त्यांस नागोजी मानेने मारले असे आहे.


लेखक - अपरिचीत (सदर लेखाचे लेखक मला माहित नाही बऱ्याच ब्लॉगवर असणारा हा लेख मी माझ्याकडे पब्लिश केला आहे )
Website Security Test