Showing posts with label शिवकालीन महाराष्ट्र भाग १३९. Show all posts
Showing posts with label शिवकालीन महाराष्ट्र भाग १३९. Show all posts

Saturday, February 6, 2016

शिवकालीन महाराष्ट्र भाग १३९

 शिवरायांचा मसुरवर हल्ला 
२२ नोव्हेंबर १६५६ च्या एका फर्मानात शिवरायांच्या मासूरवरील छाप्याचा उल्लेख सापडतो. आदिलशाही सरदार मुहम्मद इखलासखानला हे फर्मान मिळाले होते. त्याला कर्नाटकाचा सुभेदार नेमले होते व शिवरायांच्या त्या भागातील हलचालींवर पायबंद घालायचा आदेश त्याला दिला होता. आदिलशाहीतील घडामोडींच्यावेळेचा शिवरायांच्या हलचालींबाबतचा हा सगळ्यात जुना संदर्भ आहे. मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या आदिलशाहीतील कलहाबद्दल शिवरायांना बहुतेक कल्पना होती. वरील फर्मान मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर आठरा दिवसांनी लिहीले आहे. त्यामुळे आदिलशाहीतील अस्थिरतेचा लाभ घेऊन शिवरायांनी मासूरवरील छापा घातला असावा. शिवाजी राजे स्वतः ह्या छाप्यात होते की नाही ते स्पष्ट होत नाही. ५ जानेवारी १६५७ चे आणखी एक फर्मान सांगते की मासूरजवळ झालेल्या झटापटीत आदिलसाही सैन्याने शिवरायांच्या सैन्याला पराभूत केले. हा निष्कर्ष थोडा वावगा वाटतो आणि त्याची पडताळणी करण्यासाठी छाप्याचा हेतु काय होता हे बघणे आवश्यक आहे. हा भाग शिवरायांच्या मुलुखापासून बराच दूर आहे. त्यामुळे हा छापा प्रदेश जिंकण्यासाठी नसून खंडणीसाठी असावा हे जास्त संयुक्तिक वाटते. अशावेळी शिवरायांची नीति कमीतकमी जीवहानी व जास्तीजास्त धनलाभ अशीच होती. त्यामुळे ज्याला आदिलशाही फरमानात पराभव म्हटले आहे ती खरतर यशस्वी माघार असावी असे दिसते. मासूरवरील छाप्यात नेमके काय धन मिळाले ते साधनाअभावी कळत नाही. पण आदिलशाही व मराठी सैन्यात झटापटी झाल्या हे निश्चित. हा सगळा प्रकार नोव्हेंबर-डिसेंबर १६५६ मधे झाला. 
संदर्भग्रंथ • श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ८०५-८०८
Website Security Test