Thursday, December 27, 2012

आज्ञापत्रांतील दुर्गप्रकरण

गडकोटांचे महत्व

संपूर्ण राज्याचें सार तें दुर्ग. दुर्ग नसतां मोकळा देश परचक्र येतांच निराश्रय, प्रजाभग्न होऊन देश उद्वस होतो. देश उद्वस झाल्यावरी राज्य असें कोणास म्हणावें ? याकरीतां पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्यें दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला, आणि आलें परचक्रसंकट दुर्गाश्रयी परिहार केले. हें राज्य तर तिर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले. जो जो देश स्वशानवश न होय त्या त्या देशीं स्थलविशेष पाहून गड बांधिले, तसेंच जलदुर्ग बांधिले, त्यावरून आक्रमण करीत करीत सालेरी अहिवंतापासून कावेरीतीरपर्यंत निष्कंटक राज्य संपादिले. औरंगजेबासारखा महाशत्रू चालून येऊन विजापूर भागानगरांसारखीं महासंस्थानें आक्रमिलीं, संपूर्ण तिस-बत्तीस वर्षेपर्यंत या राज्यांशी अति श्रम केला, त्याचे यत्नास असाध्य काय होतें? परंतु राज्यात किल्ले होते म्हणून अवशिष्ट तरी राज्य राहिले. पुढे पूर्ववत करावयास अवकाश जाहला. या उपरही ज्यापेक्षां राज्य संरक्षण करणें आहे, त्यापेक्षां अधिकोत्तर साधनी स्वतां गड किल्ल्याची उपेक्षा न करितां परम सावधपणें असतील त्या गडकिल्ल्यांची यथोक्त मजबुदी करावी. नूतन देश साधणें. त्या देशांत जीं स्थळें असतील ती महत्प्रयासाने हस्तवश करावीं ज्या देशात गडकोट नसतील त्या देशांत आपले राज्याचे सरहद्दीपासून पुढे जबरदस्तीनें नूतन स्थळें बांधीत बांधीत तो देश आक्रमावा. त्या स्थळांचे आश्रयीं सेना ठेवून पुढील देश स्वशासनें वश करावा. असें करीत करीत राज्य वाढवावें. गडकोटाचा आश्रय नसतां फौजेच्यानें परमुलुखीं टिकाव धरून रहावत नाही. फौजेविरहित परमुलखी प्रवेश होणेंच नाहीं. इतक्याचें कारण, गडकोटविरहित जें राज्य त्या राज्याची स्थिति म्हणाजे अभ्रपटलन्याय आहे. याकरितां ज्यांस राज्य पाहिजे त्यांणी गडकोट हेंच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचें मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपलीं वसतिस्थळें, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपलें प्राणसंरक्षण, असें पूर्ण चित्तांत आणून कोणाचे भरंवशावर न राहतां आहे त्यांचे संरक्षण करणें, व नूतन बांधण्याचा हव्यास स्वतःच करावा, कोणाचा विश्वास मानूं नये.

गडाची रचना व बांधणी

राज्यरक्षणाचें मुख्य कारण किल्ले, देशोदेशीं स्थळें पाहून बांधावे. किल्ल्यासमीप दुसरा पर्वत किल्ल्यासमुदायी आसूं नये. कदाचित असला तरी सुरूंग लावून पाडून गडाचे आहारी आणावा. सुरूंगास असाध्य असा असला तरी तोहि जागा मोकळी न सोडिता बांधून मजबूत करावा.
गडाची इमारत गरजेची करूं नये. तट, बुरूज, चिलखतें, पाहारे, पडकोट जेथें जेथें असावे ते बरे मजबूत बांधावे, नाजूक जागे जे असतील ते सुरूंगादि प्रयत्नेंकरून, अवघड करून, पक्की इमारत बांधोन गडाचा आयब काढावा. दरवाजे बांधावे, ते खालील मारा चुकवून, पुढें बुरुज देऊन, येतिजाती मार्ग बुरूजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे. किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे, याकरिंता गड पाहून, एक दोन तिन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यामध्यें हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या. इमारतीवरील मामलेदार वगैरे आदिकरून ठेवाणें ते बरे शहाणे, कृतकर्मे, निरालस्य पाहून ठेवावे. गडाची इमारत मुस्तेद करावी. कित्येक किल्ले प्रत्तेक पर्वताचे आहेत. कित्येक पर्वत थोर थोर, त्याचा एखादा कोन, कोप-याची जागा पाहोन बांधावा लागतो. त्यास दरवाजापुढें अथवा तटाखालीं मैदानभुमी लागते, म्हणजे तो गड भुईकोटांत दाखल जाहला. आला गनीम त्यानी दरवाजास अथवा तटास लागावें असेम होतें ही गोष्ट बरी नव्हे. याकरितां जातीचा किल्ला असेल त्यास आधीं सर्व प्रयत्ने दरवाज्यापुढें तटाखाली जितकें मैदान असेल तितका खंदक खोल आणी रुंद खणून तटाचे पायी दुसरा पडकोट मजबूत बांधोन त्यावर भांडी, जुंबरे ठेवून, खंदकाचे कडेस एकाएकी परकी फौज येऊन न पावे असें करावें. गडास यावयाचे मार्ग असतील ते सुगम नसावे. सुगम असले तर ते मार्ग मोडून, तावर झादी वाढवून आणखीकडे परके फौजेस येतां कठीण असे मार्ग घालावे. याविरहित बलकबुलीस चोरवाटा ठेवाव्या. त्या सर्वकाळ चालूं देऊं नयेत. समयास तेच दिंडी अथवा दरवाज्याचा राबता करुन सांजवादा चढवीत जावा.

गडाची राखण

गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी, ते झाडी प्रयत्ने वाढवावी. त्यामध्यें एक काठीही तोडों न द्यावी. बलकबुलीस त्या झाडीमध्ये हशम बंदुके घालावया कारणाजोगे असों द्यावे. गडासभोवती नेहमी मेटे असावी. घेरीयाची घस्ती करीत जावी. घस्तीचा जाब मेटेकरी यांणी देत जावा. गडाखालतें इमारतीचें घर किंवा घराभोंवतें दगडाचें कुसूं सर्वथा असो न द्यावें. तसेंच गडावर आधीं उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणी तें स्थळ तों आवश्यक बांधणे प्राप्त झालें तरी आधी खडक फोडून तळीं, टांकी पर्जन्यकाळपर्येंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशीं मजबूत बांधावीं. गडावरी झराही आहे, जसें तसें पाणीही पुरतें, म्हणुन तितकियावरीच निश्चिंती न मानावी. उद्योग करावा, किनिमित्य कीं, झुंजामध्यें भांडियांचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हां संकट पडतें याकरीतां तसे जागीं जखिरियाचें पाणी म्हणून दोन चार टाकीं तळीं बांधावीं. त्यातील पाणी खर्च होऊं न द्यावें, गडाचे पाणी बहुत जतन राखावें. गडावरी राजमंदिराविरहित थोर इमारतीचें घर बांधो नये. राजमंदिरासही भिंती इटांच्या बांधून त्यास चुना दाट गच्च घालावा. घरांत कोठें उंदिर, विंचू, किडा , मुंगी राहील अशी दरद न ठेवावी. घरास कुसूं पाहीजे तें निरगुंडी आदिकरून झाडांचें पातळ घालावें. गडकरी यांणी राजमंदिर म्हणून खाली न ठेवावें. सर्व काळ करून धुरे करुन घर शाबूत राही, जीव जंतु न राही तें करावें. धनी गडावरी येतात असें कळतांच आगोदर दोन चार दिवस मामलेदारानें येऊन, खासा उभा राहून, संपुर्ण घर सारवून, रांगोळी आदिकरून घालून धनी गडावरी येईतोपर्येत त्याच जागा सदर करून बसत जावें. गडावरील मार्गा मार्गावरील बाजारांत तटोतट केर कसपट किमपी पडो न द्यावें. ताकीद करून झाला केर गडाखाली न टाकतां जागाजागी जाळून ती राखही परसांत टाकून घरोघर होईल ते भाजीपाले करवावें.

गडावरील साहित्य व युद्धाची सामुग्री


गडावरील धान्यगृहें, इस्तादेचीं घरें, ही सकळही (आहेत त्यास) अग्नी, उंदिर, किडा, मुंगी वाळवी यांचा उपद्रव न बाधे अशी भुईस दगडांची छावणी करून गच्ची बांधावी. ज्या किल्ल्यास काळा खडक दरजेविरहीत असेल तसे ठिकाणी ते कड्यास टांकी करावी. स्वल्पमात्र दरज असेल तरी गच्च लावून पाझर न फुटे असें करावें. गच्चंस अरेना अशी भुई असेल तेथें गच्चीघरें करून थोर थोर कांचेचे मर्तबान, झोलमाठ, मडकी आणून त्यांस मजबूत बैसका करून त्यांत तेल तूप सांठवावें. दारूखाना घराजवळ घराचे परिघाकाली नसावा. सदरेपासून सुमारांस जागा बांधून भोंवते निरगुंडी आदिकरून झाडांचें दाट कुसूं घालून बांधावें. तयास तळघर करावें. तळघरांत गच्च करावा. त्यांत माच घालून त्यावर दारूचे बस्ते, मडकी ठेवावे. बाण, होके, आदिकरून मध्यघरांत ठेवावे. सर्दी पावों न द्यावी. आठ पंधरा दिवसांत हवालदाराने येऊन दारू, बाण, होके आदिकरून बाहेर काढून उष्ण देऊन मागुती मुद्रा करुन ठेवीत जावें. दारूखान्यास नेहमी राखणेस लोक ठेवावे. त्यांणी रात्रं दिवस पहा-या प्रमाणे जागत जावें. परवानगीविरहित आसपास मनुष्या येऊं न द्यावे. किल्ला संरक्षणाचे कारण ते भांडी व बंदुका, याकरीता किल्ल्यांत हशम ठेवावेत (ते) बंदुकीचे ठेवावेत. तट सरनोबत, बारगीर, सदर-सरनोबत, हवालदार यांसी बंदुकीचा व भांडी डागायचा अभ्यास असावा. (संपुर्ण हशमांनी तलवार, टाकणी हेही हत्यारें बाळगीत जावी.) गड पाहून, गडाचे नाजूक जागे पाहून, त्या त्या जागी व गडाचे उपराचे जागां त्या त्या सारिखी भांडी, जुंबरे, चरक्या आदिकरून यंत्रे बुरुजाबुरूजांत तटोतट टप्पेगुजरे बांधून ठेवावी. भांडीयांचे गाडे, चरक, भांडी पाहून मजबूत लोखंडी कट देऊन त्यावर ठेवावीं. दारूच्या खलित्या, गज, भांडी निवावयाच्या कुंच्या, गोळे, कीट आदीकरून रेजगिरी सुपरी प्रमाणे लहानथोर नदीतले खडे, बाणाच्या पलाखा, जामग्या, तरफा, काने, दुरूस्त करावयाचे सामते, आदिकरून हा जिन्नस भांडियांचा भांड्याजवळ हमेशा तयार असावा. अहिनी दगडी जिन्नस दारूचे अंतरी ठेवावे. होके, बाण हेही पहारेपहा-यास तयार असों द्यावे. दरम्यान, मुलखांत गनीम कोठें आहे, येईल ते समयीं कोठीतून आणून तयार करीन म्हणेल तो मामलेदार नामाकूळ, आळशी. तशास मामला सांगों नये. एक वेळ केली आज्ञा त्याप्रमाणे अंधपरंपरेनें निरालस्यपणें उगेंच वर्तावें, तरीच समयीं दगा होत नाहीं, लावून दिला कायदा अव्याहत चालतो. पर्जन्यकाळी भांडीयास व दरवाज्यास तेल मेणे देऊन भांडियांचेही कोने मेणानें भरून भांडियांवर भांडियापुरती आघाडी घालून जायां होऊं न द्यावीं. वरकडही जिन्नस सर्दी न लागे असे आबादान ठेवावे. इमारतीचे काम आधीं तयार झालेंच असतें. तथापि तट, पहारे, बुरूज, कोट, काहिं जायां होतच आहे ते वरचेवरी मजबूत करावे लागतात. तटास झाड वाढतें तें वरचेवरी कापून काढावें. तटाचें व तटाखालील गवत जाळून गड नाहाणावा लागतो.

गडाचा कारखाना.

या कामास गडोगडास गड पाहून इमारतीचा कारखाना नेहमी ठेवून मुद्राधारी यांचे स्वाधीन करावा. तसेंच गोलंदाज विश्वासूक कबिलेदार, नेमिला जागा दुरूस्त मारणार, असे मर्दान, गड व गाडाचीं भांडी पाहून जितके लागत असतील तितके ठेवावे. गडावरी झाडें जीं असतील ती राखावीं. याविरहित जीं जीं झाडे आहेत तीं फणस, चिंच, वड, पिंपळ, आदिकरून थोर वृक्ष, निंबे, नारिंगे, आदि करून लहान वृक्ष, तसेच पुष्पवृक्ष वल्ली किंबहुना प्रयोजक अप्रयोजक जें झाड होत असेल तें गडांवर लावावें, जतन करावें. समयी तितकेही लांकडाचे तरी प्रयोजनास येतील. गडोगडी ब्राम्हण, ज्योतिषी, वैदिक, व्युत्पन्न तसेंच रसायण वैद्य व झाडपाल्याचे वैद्य व शास्त्र वैद्य, पंचाक्षरी, जखमा बांधणारे, व लोहार, सुतार, पाथरवट, चांभार यांच्याही गड पाहून एक एक दोन दोन असाम्या करून ठेवावे. लहानसहान गडांवर या लोकांचे नित्य काम पडतें असें नाही, याकरिता त्यांचे कामाची हत्यारें त्यांजवळी तयार असों द्यावीं. जे समयीं काम पडेल ते समयी काम करितील, नाहीं ते समयी आदिकरून तहशील तलब चाकरी घ्यावी. रिकामे न ठेवावे. गडोगडीं तनखा, दास्ताद, इस्तान आदिकरून गडाच्या प्रयोजनाची वस्तुजात गडास संग्रह करून ठेवावेंच लागतें. याविरहित गड म्हणाजे आपले कार्याचे नव्हेत, असें बरें समजून आधीं लिहिलेप्रमाणें उस्तवारी गडाची करावी.

(आज्ञापत्रावरून)

आरमार प्रकरण

रामचंद्रपंत अमात्य प्रणीत आज्ञापत्रावरून

आरमार प्रकरण


आरमार : एक स्वतंत्र राज्यांग

आरमार म्हणजे येक स्वतंत्र राज्यांगच आहे. ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्याजवल आरमार त्याचा समुद्र. या करितां आरमार अवस्यमेव करावे.

आरमाराची बांधणी व सुसज्जता :
चालीच्या गुराबा बहुत थोर ना बहुत लहान यैशा मध्यम रितीनें सजाव्या. तैसीच गलबतें करावी. थोर बरसे, फरगात, जें वरियाविण प्रयोजनाचेच नव्हेत, यैसे करावयाचे प्रयोजनच नाहीं. कदाचित एकदोन सलाबतीमुलें केले तरी जे आरमार करावें त्यावरी मर्दाने मारक माणूस, भांडी, जंबुरे, बंदुखा, दारूगोली, होके आदिकरून अरमारी प्रयोजनी सामान यथेष्ट बरें सजुते करावे.

गुराबा - एक प्रकारची होडी, बरसे - मोठे व्यापारी गलबत, फरगात - एक प्रकारचे लढाऊ जहाज, सलाबत - मजबुती, भांडी - तोफा, जंबुरे - लहान तोफा, होके - दारूने भरलेले पेटारे, सजुते - सज्ज

आरमाराची व्यवस्था :

त्याचे प्रत्यक प्रत्यक सुभे करावे. दरसुभे यास पांच गुराबा, पंधरा गलबतें. करून द्यावीं. इतक्यास एक सरसुभा करावा. त्याचे आज्ञेंत सर्वानी वर्तावें. अरमारास तनखा मुलकांत नेमून द्यावा. पैदास्तीवरी नेमणूक सहसा न करावी. पैदास्तीचे नेमणूकेमुलें सावकारास उपद्रव होऊन सावकारी बुडते. बंदरे राहिली पाहिजेत. प्रयोजनिक वस्त ते परस्थलीहून आणावी तेव्हां येते. यैसें जाल्यामध्यें राज्याचा भ्रम काय उरला ? तैसेच जकाती आदिकरून हसीलही बुडाला ; लुटीमुलें गोरगरिबाचा सत्यानास होऊन आपरमित पापही बाढलें; आरमारकरीही बेलगाम होऊन मनःपूत वर्तों लागले: तरी नेहमी तनखा मुलकातून देणे घडते. तरी इतका आनर्गल प्रसंग न होतां कदाचित अरमारास सारा नेहमी तनखा कैसा अनकूल पडतो म्हणावें, तरी जितका अनकूल पडेल तितकेंच अरमार सजावें. सावकारी वाढवावी. सावकारीमुलें जकातीचा हसील होईल. तितक्यावरी कितेक अरमार करूं नये. या रीतीने अरमार सजीत सजीत सजावें. अरमारकरी याणी हमेषां दर्यात फिरून गनीम राखावा. जंजिरियाचे सामान व दारू वरचेवरी पाववीत जावी. येविसीं जंजीरकरीयाचा बोभाट हुजूर येऊं न द्यावा. सर्वकाल दर्यावर्दी गनिमांचे खबरीत राहून गनिमाचा मूलूख मारावा. हवी पालती घालोन गनिमाचे स्थलाचे लाग करावे.

पैदास्ती - उत्पन्न, हसील - प्राप्ती, लाग करावे - हल्ला करावा

व्यापारी जहाजासंबंधीचे धोरण :

दर्यांत कौली सावकारी तरांडी यांची अमदरफ्ती करावी. कौली सावकाराचे वाटी जाऊं नये. त्यास कोण्हाचा उपद्रव लागत आसेल तरी तो परिहार करावा. गनिमाचे मुलकखेरीज विदेसीची गैरकौली यैसे सावकाराची तरांडी येतां जातां आली तरी ती परभारें जाऊ न द्यावीं . नयेभयें हाताखाली घालून त्यांचे दसोडीस हात न लावितां दिलासा करून बंदरास घेऊन यावे. बहुता प्रकारे त्यांणी व मुलूकगिरीचे कारभारी याणी जाऊन त्यांचे समाधान करावें. लाकडे, पाणी घेतील ते घेऊन द्यावे. नारलांचे शाहलीं आदिकरून जो त्यास जिनस पाहिजे असेल तो विकत अनकूल द्यावा. याविरहित आणखी खरेदी फरोख्त आत्मसंतोषें करितील, तो अल्पस्वल्प जकात घेऊन सुखरूप करू द्यावा. थोर मनुष्य सावकार कोण्ही असला तरी त्याचे योग्यतेनरूप दिवाणचे तर्फेने त्याची थोडी बहुत मेहमानी करावी. तो खर्च दिवाणातून मजरा घ्यावा. कोण्हे एक प्रकारें त्या परकी सावकारास सौख्य दिसे, माया लागे, राज्यांत आमदरफ्ती करीत, असें करावें. गनिमाचे मुलकातील सावकारी तरांडी दर्यात आसल्या, कस्त करून घ्यावी, घरून बंदरास आणावी. मालात काडी इतकई तसनस न करितां तमाम माल जप्त करून महालाचे कारकुनानी व आरमारकरी यांणी हुजूर लेहून पाठवावे. आज्ञा होईल तैसी वर्तणूक करावी.

कौल - अभयपत्र, परवाना, आमदरप्ती - येण्या जाण्याची मुभा, तरांडी - मोठे जहाज

आरमारी युद्ध :

आरमारास व गनिमास गांठ पडोन जुंझ मांडले तरी सर्वांनी कस्त करून येक जमावें गनीम दमानी घालून जुंझावें. वारियाचें बलें दमानी न येतां आपण दमानी पडलों, आपले गलबत वारियावरी न चाले यैसें जाहलें, तरी कैसेही आपले बल असो त-ही गनिमासी गाठं न घालितां, गांठ तोडीत तोडीत आपले जंजिरियाचे अश्रयास यावें, तरंडियास व लोकांस सर्वथा दगा होऊं देऊं नये. आपणास राखून गनीम घ्यावा. गनीम दमानी पडोन हरीस आला, जेर जाला, तरी येकायेकी उडी घालों नये. दुरून चौगीर्द घेरून भांडियाचा मार देत आसावे. दगेखोर गनीम आपण जेर जालो यैसे जाणून दगाबाजीनें कौल घेतो, म्हणोन जवल बोलाऊ नये. आपल्याजवळ बोलविल्यानें पायाळास आगी टाकून तरांडे जाया करितों. याकरिता त्याचा विश्वास न मानिता कौलास आला तरी दुरूनच कौल देऊन त्याचेच बतेल्यावरून सरदार देखील लोक आपणाजवळ आणावे. मग त्याचे तरांडेवरी आपले लोक चढवावे. नाही तरी मालबिसातीची तमा न धरितां भांडियाचे माराखालें तरांडे फोडून सलाबत पाडावी.

आरमाराची छावणी :

आरमाराची छावणी करणे ते दर्या तुफान होणार तों आठ पंधरा दिवसी आगोधर करावी. तेही प्रतिवर्षी येकाच बंदरीं आथवा हरयक जंजिरियाखाली किंवा उघड्यामानी सर्वथा न करावी. प्रतिवर्षी येक्याच बंदरी छावणी केल्यानी आरमाराचे लोक बारगल ताकीद केली तरी कांही येक मुलकास उपसर्ग होतच आहे. तो येकाच मुलकास होणार यैसें होऊं न द्यावे. उघड्यामानी आरमाराची छावणी केली तरी छावणी करणे ते आरमार धड्यावरी वोढावे लागते, वरती छावणी, तशामधे दगेखोर, चोरीछपीने तात्काळ अग्नीचा दगा करणार. यैसेंही होऊं न द्यावे. केवल किल्याचेच बंदरात छावणी करावी तरी आरमारचे मनुष्य बहुवस प्रायशा अविंध आणि उन्मत, यरवादे बोलचालीमुले कचकलागत होऊन लोक जाया होणार, कदाचित परस्परें संकेतस्थलांत फितवा होऊ शके, हे बरें नव्हे. याकरितां आरमारची छावणी करणे ते प्रतिवर्षी नूतन बंदरी, ज्या बंदरास मोहारी किला, किल्याचे दहषतीने गनीम खाडींत शिरों न शके आथवा आडखाडी, यसे खाडीत आरमारची छावणी करावी. तेही सारे आरमार येकाच जागा न ठेवावे. जागा जागा छावणीस ठेवावें. रात्रीस खाडीतील गस्त व खुष्कीची गस्त आरमारासभोवती करवीत जावी.

सुभेदारांनी आपला कबिलादेखील दोन महिने त्याच जागा ठेऊन आरमाराची रातबिरात चाकरी करून, लागेल ते सामान तेविषई हुजूर लेहून विल्हे करून घ्यावी. मुलकांत आवाडाव सर्वथा होऊ न द्यावी. आरमारास तख्ते, सोट, डोलाच्या काठ्या आदिकरून थोर लाकूड आसावे लागते. ते आपले राज्यात आरण्यामध्ये सागवानादि वृक्ष आहेत त्यांचे जे आनकूल पडेल ते हुजूर लेहून हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे. याविरहित जें लागेल तें परमुलकीहून खरेदी करून आणवीत जावें. स्वराज्यातील आंबे, फणस आदिकरून हेही लाकडे आरमारचे प्रयोजनाचीच. परंतु त्यांस हात लाऊ न द्यावा. काये म्हणोन की ही, झाडे वर्षा दों वर्षांनी होतात यैसे नाही. रयतेने ही झाडे लाऊन लेकरासारखी बहुत काल जतन करून वाढविली असता, ती झाडें तोडिलियावरी त्यांचे दुःखास पारावार काये आहे ? येकास दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल, ते कार्य करणारासहित स्वल्पकालेंच बुडोन नाहीसेंच होतें. किंबहुना धण्याचेच पदरीं प्रज्यापीडणाचा दोष पडतो. या वृक्षाच्या अभावें हानीही होते. याकरिता हे गोष्ट सर्वथा होऊं न द्यावी. कदाचित येखादे झाड, जे बहुत जिर्ण होऊन कामातून गेले आसेल, तरी त्याचे धण्यास राजी करून, द्रव्य देऊन, त्याच्या संतोषें तोडून न्यावे. बलात्कार रयतेवरी सर्वथा न करावा.

संदर्भ - "आज्ञापत्र" संपादक - रा. चिं, ढेरे

Tuesday, November 27, 2012

गोवळकोंडा



                          गोवळकोंडा 


                                 
आंध्र प्रदेश राज्यातील प्रसिद्ध किल्ला व शहर. हे हैदराबादच्या पश्चिमेस सु. ८ किमी. असून
सध्या उद्ध्वस्त आहे. पूर्वी हे कुत्बशाही प्रदेशात सापडणाऱ्या हिऱ्यांसाठी प्रसिद्ध होते. मात्र याच्या आसपास हिरे सापडत नाहीत. वरंगळच्या राजाने येथील किल्ला बांधला. चौदाव्या शतकात हा बहमनी सत्तेकडे दिला गेला व मुहंमदनगर म्हणून ओळखला जाऊ लागला.सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस हा कुत्बशाहीच्या अंमलाखाली आला; हैदराबाद राजधानी वसविण्यापूर्वी गोवळकोंडा हीच कुत्बशाहीची होती. पुढे १६८७ मध्ये औरंगजेबाने हे जिंकून घेतले.
ग्रॅनाइटी खडकावर बांधलेल्या या किल्ल्याला ८७ बुरुज व सु. ४ किमी. घेराचा तट असून आत आजही अनेक पडके नाडे, मशिदी असून त्यांचे अवशेष इतस्ततः विखुरलेले आहेत. बाला हिसार नावाचा बालेकिल्ला मात्र अजून चांगल्या अवस्थेत आहे. किल्ल्याला आठ दरवाजे असून त्यांपैकी चार सध्या वापरात आहेत. किल्ल्याभोवतीचे खंदक बुजलेले असून त्याच्या दक्षिणेकडून मूसी नदी वाहते. जवळच कुत्बशाही सुलतानांचे कबरस्तान आहे.

Sunday, October 21, 2012

भाग ११ ते १५

 शिवचरित्रमाला भाग ११ 
राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे!


शिवाजीराजे फार बारकाईने अभ्यास करून योजना आखीत असत , असे ठाईठाई दिसून येते। लहानमोठ्या कामात त्यांना येत गेलेलं यश पाहिलं की लक्षात येतं , की या राजानं या प्रश्नांचा सर्वांगीण अभ्यासपूर्वक आराखडा तयार केला होता. योजनाबद्धता हा शिवकार्याचा आत्मा. हा अभ्यास त्यांनी कोणत्या साधनांनी केला हे सांगता येत नाही. पण महाभारतातील श्रीकृष्णापासून ते शकुनीपर्यंत साऱ्या राजनीतीवाल्यांची त्यांना अगदी दाट ओळख होती असे वाटते. कृष्णाच्या राजनीतीचा त्यांच्या मनावर फार मोठा परिणाम होता यांत शंका नाही. कृष्णनीतीचा राजकारणात अचूक उपयोग करणारा हा शेवटचा राजा. बाकीचे सारे कृष्णाचं भजन करणारे , देवळं बांधणारे , अन् नवस करणारे भाबडे भक्त!
यावेळी (इ। स. १६५६ अखेर) मोगल राज्याची स्थिती उगीचच चिंताजनक झाली होती. सार्मथ्य प्रचंड होतं. पण राजपुत्रांच्या स्पधेर्मुळे आणि शाहजहानच्या नाजूक प्रकृतीमुळे सर्व दरबारी संभ्रमात पडले होते. भयंकर पाताळयंत्री आणि महत्त्वाकांक्षी आणि तेवढाच ढोंगी औरंगजेब दक्षिणेत बीदर- नांदेड या महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील भागात ससैन्य होता. त्याचे लक्ष बापाच्या आजारपणाकडे अन् म्हणूनच त्याच्या मरणाकडे अत्यंत आस्थेने लागलेले होते. कोणत्याहीक्षणी दक्षिणेतून दिल्लीकडे दौडावे लागेल हे औरंगजेब ओळखून होता. आणि हेच औरंगजेबाचे वर्म शिवाजीराजांनी अचूक हेरले होते. राजांना उत्तरेतून शाहजहानच्या तब्येतीच्या बातम्या येत होत्या. अशाच गंभीर बातम्या राजांना मिळाल्या. त्यांना खात्रीच पटली की , हा औरंगजेब आत्तापासूनच दिल्लीकडे जाण्याच्या अधीर तयारीत आहे. आपल्याला हीच संधी आहे या मोगलांवर झडप घालण्याची!
शिवाजीराजांनी गंमतच केली। त्यांनी आपले वकील सोनो विश्वनाथ डबीर यांना बीदरकडे औरंगजेबाच्या भेटीसाठी नजराणे देऊन पाठविले. हेतू कोणाचा ? औरंगजेबाला बनविणे! सोनोपंत औरंगजेबाला दरबारी रिवाजाप्रमाणे अदबीने भेटले. खरं म्हणजे अजूनपर्यंत राजांनी मोगली सत्तेला लहानसा ओरखडाही काढला नव्हता , भांडण तर नाहीच ते शक्यही नव्हते. मग सोनोपंतांचा नेमका मनसुबा कोणता ? ते औरंगजेबाशी साळसूदपणे बोलले की , ‘ कोकणातील आणि देशावरील विजापुरी आदिलशाहीचा जो मुलूख आमच्या कब्जात आम्ही घेतला आहे , त्याला तुमची राजकीय मान्यता असावी.
‘ म्हणजे राजांनी मुलुख घेतला होता आदिलशाहचा अन् ते मान्यता मागत होते मोगल औरंगजेबाची! फुकटची निष्ठा राजे औरंगजेबापाशी वकीलांमार्फत व्यक्त करीत होते। औरंगजेबाचं यात काय जाणार होतं ? फुकटचं मोठेपण! सोनोपंत हा जणू मैत्रीचाच बहाणा करीत होते.
यातील मराठी डाव औरंगजेबाच्या लक्षात आला नाही। त्याने ही मैत्री मंजूर केली. या दिवशी तारीख होती २ 3 एप्रिल १६५७ . सोनोपंत बिदरहून परतले. राजगडला पोहोचले. राजांशी बोलले आणि फक्त सातच दिवसांनी शिवाजीराजांनी आपलं भरधाव घोडदळ घेऊन , भीमा ओलांडून मोगली मुलखांत मुसंडी मारली. त्यांनी औरंगजेबाच्या ताब्यातील जुन्नर ठाण्यावर एकदम झडप घातली. गडगंज खजिना , शेकडो घोडे आणि युद्धसाहित्य पळविले. (दि. 3 ० एप्रिल १६५७ ) सोनोपंतांनी मैत्रीच्या तहाचं लग्न सातच दिवसांत पार उधळलं. तड्क तड्क तड्क… लगेच राजांनी श्रीगोंदे , पारनेर आणि प्रत्यक्ष अहमदनगर या ठिकाणी असलेल्या मोगली ठाण्यांवर भयंकर घाव घातले. भरपूर लूट मिळविली.
या साऱ्या बातम्या औरंगजेबाला बिदरला समजल्या। त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. या मराठी कोल्ह्यांनी आपल्याला निष्ठेची हूल दाखवून आपल्यावर उघडउघड हल्ले केले याचा अर्थ काय ? आपण तहानं गाफील झालो. सिवानं लोणी पळविलं. गाफील का जो माल है , वो अकलमंदका खुराक है!
पण औरंगजेब यावेळी स्वत: काहीही करणार नाही याची अचूक खात्री राजांनी ठेवूनच त्याला निष्ठेच्या तहाचे आमिष दाखविले अन् डाव साधला.
औरंगजेबाला घाई होती दिल्लीकडे जाण्याची। कारण बाप अतिशय गंभीर आजारी होता. केव्हा ना केव्हा महाराष्ट्रातून ही मोगलाई सत्ता आपल्याला उखडून काढायचीच आहे. नक्कीच. आत्ता हीच संधी आहे , हे ओळखून ही संधी अचूकपणे राजांनी टिपली. पण पुढची धूर्त नाटकबाजी पाहा. राजांनी हे छापे घालीत असतानाच रघुनाथ बल्लाळ कोरडे या आपल्या बिलंदर वकिलाला औरंगजेबाकडे नजराण्याची चार ताटे देऊन रवानाही केले होते. कशाकरता ? जुन्नर , नगर , श्रीगोंदे इत्यादी मोगली ठाण्यांवर आमच्याकडून ‘ चुकून ‘ झालेल्या दांडगाईबद्दल पश्चाताप आणि क्षमेची याचना व्यक्त करण्याकरिता! या वकिलाने चिडलेल्या औरंगजेबाची भेट घेऊन भरपूर पश्चाताप व्यक्त केला. केलेल्या गोष्टीची खोटी माफी मागितली. हेतू असा की , दिल्लीची घाई लागलेल्या औरंगजेबानं जाताजातादेखील शिवाजीराजांवर लहानमोठासुद्धा घाव घालू नये.
ही सारी कोल्हेबाजी औरंगजेबाला समजत नव्हती काय ? होती। पण तो अगतिक होता. शत्रूच्या अगतिकतेचा असाच फायदा घ्यायचा असतो , हे कृष्णानं शिकविलं. शिवाजीराजांनी सतराव्या शतकात ओळखलं. ज्या दिवशी आम्ही भारतीय कृष्णनीती विसरलो , त्या दिवसापासून आमची घसरगुंडी चालू झाली.
शिवाजीराजांच्या दिशेने संतापाने पाहात अन् फक्त हात चोळीत औरंगजेबाला दिल्लीकडे जाणे भागच होते.

शिवचरित्रमाला भाग १२ 

पुढचे पाऊल पुढेच पडेल.


शिवाजीराजांनी यावर्षी (दि। २ 3 ते 3 ० एप्रिल १६५७ ) एका अत्यंत अवघड अशा धाडसी राजकारणात हात घातला. मोगलांसारख्या दैत्य बळाच्या सत्तेविरुद्ध पहिला हल्ला केला. मोगली ठाणी मारली. औरंगजेबानं सर्व पाताळयंत्री डाव आणि ढोंगबाजी करून दिल्ली कब्जात घेतली. त्याने बापाला आग्ऱ्याला कैदेत ठेवले. तो ‘ आलमगीर ‘ बनला. म्हणजे जगाचा सत्ताधीश! या त्याच्या आलमगीर पदवीचा शिवाजीराजांवर काय परिणाम झाला ? राजांवर दहशत बसली का ? छे! पण ते खिन्नतेने बहुदा हसले असावेत राजपुतांच्या राजनिष्ठेला.
पण इराणच्या बादशाहवर मात्र परिणाम झाला. याचे नाव होते शहा अब्बास सानी. त्याला औरंगजेबाचा राग आला. तिरस्कार वाटला आणि कीवही. पण त्याने एक पत्र औरंगजेबाला लिहिले. त्यांत शहा अब्बास लिहितो : ‘ अरे! तू आलमगीर केव्हा झालास ? जगाचा सत्ताधीश! आलमगीर ? तो दक्षिणेकडे ( म्हणजे महाराष्ट्रात) असलेला शिवाजी तुला हैराण करतोय. त्याचा बंदोबस्त तुझ्याने होईना आणि तू आलमगीर ?’ म्हणजे या आणि पुढच्या काळात शिवाजीराजांच्या धुमाकुळाची रणधुमाळी इराणच्या तेहरान राजधानीपर्यंत पोहोचली.
शिवाजीराजांच्या राज्यकराभारात आणि रणकारभारात एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने दिसून येते। ती म्हणजे स्वावलंबन. कुठेही , कुणाकडेही मदतीच्या-भिक्षेच्या आशाळभूतपणाने ते बघत नाहीत. अन्नधान्य , युद्ध साहित्य , गडकोटांची बांधणी , दारूगोळा आणि आथिर्क खजिना सदैव समृद्धच असला पाहिजे , हा त्यांचा कडक आग्रह होता. स्वराज्याला कधीही आथिर्क कर्ज काढण्याची वेळ आलीच नाही. यात अनेक गोष्टी प्रकर्षानं नजरेत भरतात. आवश्यक तेवढा खर्च , आवश्यक ती काटकसर , उधळपट्टीला पुरता पायबंद , शिस्त चिरेबंद , भ्रष्टाचारी , गुन्हेगारी पक्की जेरबंद. एकदा का सरकारी सेवकांना लाच खायची सवय लागली की , रयतेची दु:खे आणि तेवढेच शाप राज्यर्कत्याला सोसावे लागतात हे राजांनी पक्कं जाणलं होतं. ‘ रयतेस आजार देऊ नये. रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नये. रयत दु:खी झाली तर म्हणू लागेल की , यापेक्षा मोगल बरे! मग मराठीयांची इज्जत वाचणार नाही. ‘ हा महाराजांचा राज्यकारभार. राज्यसंसार. एखाद्या दक्ष पण तेवढ्याच प्रेमळ अशा गृहिणीसारखा राज्यकारभार महाराज करीत होते. न्याय चोख होता. अन्याय करणाऱ्यांना कडक शिक्षा होत होत्या. कामगिरी करणाऱ्यांना ते पोटाशी मायेनं घेऊन कौतुक करीत होते.
म्हणूनच जुन्या पत्रांत राजांच्याबद्दल शब्द येतात बेलाफुलासारख्या भक्तीचे , तुळशी- दवण्यासारख्या अन् चाफा-बकुळीसारख्या सुगंधांचे। हे बघा ना! ‘ राजश्रींचे राज्य म्हणजे देवताभूमी ‘, ‘ हे श्रींचे राज्य आहे ‘, ‘ हे श्रींच्या वरदेचे राज्य आहे.
‘ शिवाजी महाराज फार फार प्रेमळ होते। गुणी आणि कष्टाळू परमार्थवंत आणि चारित्र्यवंत संतसज्जनांचे ते नम्र भक्त होते. कोणत्याही धर्माच्या , पंथांच्या वा जातीच्या ईश्वरभक्तापुढे ते हात जोडून होते. पण कोणत्याही राजकारणात वा राज्यकारभारात त्यांनी या संतांचा हस्तक्षेप होऊ दिला नाही. त्याही संतांनी फक्त देवभक्ती , लोकजागृती आणि लोकसेवाच केली. यात कोणीही सरकारी संत नव्हताच.
शिवाजीराजा एक माणूस होता। तो अवतार नव्हता. आपण शिवाजीराजांच्या दैदिप्यमान पराक्रमी कृत्यांनी आणि उदात्त आचरणाने दिपून जातो. आपले डोळे भक्तीभावाने मिटतात. नको! ते डोळे उघडण्याची आवश्यकता आहे.
शिवाजीमहाराजांनी अचूक संधी साधून , आपल्या कर्दनकाळासारख्या महाभयंकर असलेल्या सत्तेवर जुन्नर , नगर , श्रीगोंदे इत्यादी ठाण्यांवर हत्यार चालविले , हे पाहून औरंगजेबाचे डोळे खाडकन उघडले. वटारले गेले. तो या गोष्टीचा बदला नक्कीच घेणार होता। पण दिल्ली ताब्यात आल्यावर स्थिरस्थावर व्हायला वेळ लागणार होता. त्यावेळचाही फायदा घेणार होते. शिवाजीराजे! त्यांनी औरंगजेबी सत्तेखालचे कोकणातले उत्तर ठाणे जिल्ह्यातले काही किल्ले घेतलेच. राजांच्यासारखा अचूक संधीसाधू राष्ट्राला नेहमीच हवा असतो.
याचवेळी ( इ। स. १६५७ उत्तरार्ध) राजांनी कोकणात आपला घोडा उतरविला. कारण त्यांना संपूर्ण कोकण समुदासकट स्वराज्याच्या कब्जात हवे होते. राजांनी दादाजी रांझेकर आणि सखो कृष्ण लोहोकरे यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर कल्याण आणि भिवंडी जिंकावयास रवाना केले , जिंकले. या दोघांनीही एकाच दिवशी कल्याण , भिवंडी काबीज केली. या दिवशी दिवाळीतील वसुबारस होती. (दि. २४ ऑक्टो. १६५७ ) दुर्गाडी किल्ल्यावर झेंडा लागला. इथे भूमीगत धन हंडे भरून राजांना मिळाले. लक्ष्मीपूजन सार्थ झाले. कल्याणच्या खाडीत मराठी आरमाराचा शुभारंभ झाला. आगरी , भंडारी आणि कोळी जवान सागरलाटेसारखे महाराजांच्याकडे धावत आले. आरमार सजू लागले. पैशात किंमतच करता येणार नाही , हिऱ्यामाणकांनी तुळा करावी अशी ही कोकणची जवान आगरी , कोळी , भंडारी माणसं आरमारावर दाखल झाली. कोकणची किनारपट्टी हळूहळू स्वराज्यात येऊ लागली. आंबा पिकत होता , रस गळत होता पण कोकणचा राजा उपाशीपोटीच झोपत होता. आता स्वराज्यात आमराया बहरणार होत्या. नारळी सुपारी चवरीसारख्या डुलणार होत्या. कोकणचा हा उष:काल होता.
कल्याण भिवंडीपासून दक्षिणेकडे कोकणवर महाराजांची मोहीम सुरू झाली. एकेक ठाणं भगव्या झेंड्याखाली येऊ लागलं.

शिवचरित्रमाला भाग १३ 

आलं उधाण दर्याला.



मोगली ठाण्यांवर शिवाजीराजांनी अचानक हल्ले केल्यामुळे औरंगजेब संतापलेलाच होता। पण आत्ता यावेळी काहीच करता येत नाही. हे लक्षात घेऊन तो दिल्लीला गेला. पण त्याच्या मनात शिवाजीराजांचा पुरेपूर काटा काढायचा हे नक्कीच झालं. विस्मय वाटतो , तो राजांच्या कमालीच्या धाडसाचा. एका कर्दनकाळ सत्तेच्या विरुद्ध आपणहून बेमुर्वत हे असलं लष्करी राजकारण करायचं राजांनी साहस केलं ही अत्यंत मोठी झेप होती. पण ती अतिशय विचारपूर्वक म्हणजेच अभ्यासपूर्वक होती. तो वेडेपणा नव्हता. तो मिळत असलेल्या संधीचा अचूक अन् हमखास फायदा घेणं होतं. तो फायदा राजांना झालाच.
अशा अनेक संधी पुढच्या इतिहासात पेशव्यांना लाभल्या। पण त्याचा फायदा क्वचितच एखाद्या प्रसंगी घेतला गेला. तसा प्रत्येक संधीचा फायदा इंग्रजांनी आमच्याविरुद्ध अचूक टिपला. लहान वयात आणि आपल्या लहानशा सैन्यानिशी राजांनी अनेकदा अवघड डाव धाडसानं जिंकले. ज्याला नेतृत्त्व करायचं आहे , त्याने शिवचरित्राचा बारकाईने अभ्यास करावा. काळजांत अचूक कल्पनेची कळ येईल. बुद्धीत बळ येईल अन् पदरात फळ पडेल. आता आपण शिवाजीराजांचा नुसताच जयजयकार जरा कमीच करावा!
दि. २४ ऑक्टोबर १६५७ या दिवशी शिवाजीराजांनी कल्याणपासून दक्षिण कोकणात सावंतवाडीपर्यंत वादळी स्वारी मांडली। महिनोन्महिने राजा स्वारीवर आहे , त्याला विश्रांती सोसतच नाही. या कोकण मोहिमेत संपूर्ण कोकण महाराजांच्या कब्जात आलं असं नाही. पण किनाऱ्यावरचे अनेक किल्ले आणि काही जलदुर्ग महाराजांनी सुसरीनं शेपटाचा फटकारा मारून एकेक भलामोठा मासा मारावा , तसा एकेक जलदुर्ग राजांनी मटकावला. हरणेचा किल्ला , जयगड , घेरिया , देवगड , रेडी अन् थेट तेरेखोल शिवाय सह्यादीच्या अंगाखांद्यावरती असलेले अनेक गिरीदुर्ग महाराजांनी काबीज केले. केवढं प्रचंड वादळ आहे हे! आमच्या तरुण मनात असंच काही अचाट कर्तृत्त्व , आजच्या हिंदवी स्वराज्यात आपणही गाजवावं असं येतंच नाही का ? का येत नाही ? आळस ? अज्ञान ? बेशिस्त ? अभिमानशून्यता ? आत्मविश्वासाचा अभाव ? अल्पसंतुष्टता ? सगळंच काही!
याच काळात इंग्लिश टोपीवाले व्यापारी , बंदुकवाले लष्करी पोर्तुगीज अन् सारेच अठरा टोपीकर फिरंगी हजारो मैलांवरून सागरी मार्गाने भारतात येत होते। उंदराच्या कानाएवढे आणि विड्याच्या पानाएवढे यांचे देश. नकाशावर लौकर सापडतही नाहीत. पण त्यांची महत्त्वाकांक्षा लाटेवर स्वार होऊन आम्हाला लुटायला आणि कुटायला येत होती.
कोकणातील या स्वारीत ( इ। स. १६५७ ते ५८ ) शिवाजीराजांच्या नजरेस अनेक गोष्टी आल्या. काही सुखावणाऱ्या तर काही मिरचीसारख्या झोंबणाऱ्या त्यात राजांना जी कोकणी मनं आणि मनगटं गवसली , ती फारच मोलाची होती. मायनाक भंडारी , बेंटाजी भाटकर , दौलतखान , सिदी मिस्त्री , इब्राहिमखान , तुकोजी आंग्रे , लायजी कोळी सरपाटील आणि असे अनेक. आगरी भंडारी , कोळी , कुणबी , प्रभू , सारस्वत मंडळी महाराजांच्या या जागर- गोंधळात कर्तृत्त्वाचे पोत पेटवून राजांच्या भोवती हुकूम झेलायला अधीरतेन गोळा होऊ लागली. हे सारेच समाजगट खरोखर गुणी होते. शौर्य , धाडस , कल्पकता , निष्ठा पराक्रमाची हौस आणि उत्तुंग महत्त्वाकांक्षा या तरुणांच्या रोमरोमात उसळत होती. राजांनी या कोकणी चतुर काळसुंद्यांचा अचूक उपयोग करायच्या योजना आखल्या. कृतीतही आणल्या.
या आगरी , कोळी , भंडारी पोरांचं काय सागरी अप्रूप सांगावं ? जन्मल्यावर यांना आधी समुदात पोहता येत होतं. अन् मग जमिनीवर रांगता येत होतं.
एकच पुढच्या काळातील इतिहासातील साक्ष सांगू का ? शिवाजीराजांच्या मृत्युनंतर औरंगजेबानं मराठी राज्य गिळून टाकण्याकरता अमाप दळवादळ घेऊन इथं स्वारी केली। पंचवीस वर्ष तो मराठी देशावर थैमान घालत होता. पण कोकणात किनारपट्टीचा एकही सागरी किल्ला अन् कोकणची वीतभर जमिनही औरंगजेबाला पंचवीस वर्षात जिंकता आली नाही. अजिंक्य! कोकण अजिंक्य , भंडारी अजिंक्य , आगरी अजिंक्य , कोळी अजिंक्य , समुद अजिंक्य , मराठी राज्य आणि मराठी ध्वज अजिंक्य. हे कर्तृत्त्व कोणाचं ? हे या कोकणी मर्दांचं.
आणि आज याच माणसांना आम्ही मुंबईत ‘ रामागाडी ‘ म्हणून भंाडी घासायला लावतोय. मॅक्सी अन् साड्या धुवून वाळत घालायला लावतोय. हॉटेलात कपबश्या विसळायला लावतोय. वास्तविक यांचा मान भारताच्या आरमारी नौकांवरून शत्रूवर तोफा बंदुकांनी सरबत्ती करण्याचा आहे. ही सारी मार्शल रेस आहे. शिवाजीमहाराजांनी तीनशे वर्षांपूवीर् हे ओळखलं. कोकण अजिंक्य बनवलं. आमच्या लक्षात केव्हा येणार ? ब्रिटीश विल्यम पिप्ससारखा एखादा कान्होजी आंग्रा , मायनाक भंडारी किंवा एखादा मराठी दौलतखान आम्हाला आज लाभेल का ?

शिवचरित्रमाला भाग १४ 

मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला

याच कोकण स्वारीतून (इ। स. १६५७ – ५८ ) शिवाजीराजे कुडाळपर्यंत समुद आणि भूमी कब्जात घेत पोहोचले होते. देशावरीलही लोणावळ्याजवळच्या अनेक किल्ल्यांचा कब्जा राजांनी घेतला होता. राजमाची , लोहगड , तुंगतिकोना आणि पूवीर् शहाजीराजांच्यासाठी बादशाहच्या ताब्यात देऊन टाकलेला कोंढाणा राजांनी काबीज केला होता. कोकणातील पण सह्यादीवर असलेले माहुली , कोहजगड , सिद्धगड , मलंगगड , सरसगड , इत्यादी गडही जिंकले होते. स्वराज्य वाढलं होतं.
विजापूरचा अर्धांगवायू झालेला बादशाह मोहम्मद आदिलशाह चार नोव्हेंबर १६५६ रोजी मृत्यू पावला होता आणि त्याचा मुलगा अली आता बादशाह झाला होता। हा अली वयाने १७ – १८ वर्षांचाच होता. त्याची आई ताजुल मुख्खदीरात उर्फ बडीसाहेबा हीच सर्व कारभार पाहत होती.
क्वचितच एखाद्या झटापटीत स्वराज्याच्या मावळी सेनेचा पराभव होत होता। नाही असं नाही. पण उल्लेख करावा असा एकही विजय या काळात आदिलशाही सेनेला कुठेही मिळाला नाही. सर्वत्र विजयाचाच घोष उठत होता मराठ्यांचा. त्यामुळे आधीच हादरून गेलेल्या विजापूरच्या शाही दरबारची अवस्था चिंताक्रांत झाली होती. खरं म्हणजे ही विजयाची गगनभेदी गर्जना साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर एकदम उठली होती. हीच शिवक्रांती सगळीकडेच परकीय शत्रू विस्मित आणि बेचैन झाले होते. स्वकीय शत्रूंना काय तोटा ? त्यांचं पोट सततच दुखत होतं. राजांच्या या सुसाट कोकण स्वारीमुळे (इ. स. १६५७ – ५८ ) आदिलशाही गलबलून गेली होती. शिवाजीविरुद्ध काय करावं हेच बड्या बेगमेस आणि शाहास समजत नव्हतं. विचार करीत बसायलाही सवड नव्हती. सतत मराठी वादळाच्या बातम्या येत होत्या.
या मराठी विजयांचं मर्म कोणचं होतं ? का जय मिळत होते ? असं कोणचं ‘ मिसाईल ‘ महाराजांना गवसलं होतं ? आम्ही तरुणांनी आज याचा अभ्यास केला पाहिजे. महाराजांनीच अनेक प्रसंगी स्वत: उद्गारलेल्या शब्दांत ते मर्म सापडले. ते आपल्या मावळ्यांना म्हणताहेत.
‘ आपापले काम चोख करा ‘, ‘ हे राज्य श्रीच्या आशीर्वादाचे आहे ‘, ‘ पराक्रमाचे तमाशे दाखवा ‘, ‘ या राज्याचे रक्षण करणे हा आपला फर्ज (कर्तव्य) आहे , त्यांस चुकू नका। ‘ सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापावेतो अवघा मुलूख आपला. तो मुक्त करावा , ऐसा मानस आहे.
आणि असेच कितीतरी वमीर् भिडवित असे शब्द महाराजांनी आपल्या जिवलगांच्या पाठीवर हात ठेवून आयुष्यभर उच्चारले। हे शब्द हृदयी कोरूनच मावळ्यांनी स्वराज्याकरता सर्वस्व पणाला लावले. अनुशासन , शिस्त , निस्वार्थ सेवा , स्वच्छ राज्यकारभार आणि नेत्यांवरती नितांत विश्वास हे शिवशाहीच्या यशाचे मर्म होते. म्हणूनच हरघडी , हरदिवशी , नित्यनवा दिन जागृतीचा उगवत होता. मावळ्यांच्या आकांक्षापुढति गगन रोज झुकत होतं , ठेंगणं ठरत होतं. त्यातूनच भरत होतं स्वराज्य आणि बहरत होते स्वाभिमानी संसार. आळस , अज्ञान , अन् अहंकार यांची हकालपट्टी झाली होती. अन् लाचारी , फितुरी आणि हरामखोरी यांना स्वराज्यात जागा नव्हती. असं सारं घडलं तरच राष्ट्र उभं राहत असतं. फुलत असतं.
शिवकालात तसं पाहिलं तर रणांगणावर होणाऱ्या जखमांमुळे कण्हण्याचेच क्षण रोज आणि अखंड उठत होते। पण पोरं हसत हसत कण्हत होती. अभिमानानं कण्हत होती , अन् मग कोणी एखादा शाहीर डफावर थाप मारून गर्जत होता. ‘ मराठियांची पोरं आम्ही , भिणार नाही मरणाला
‘ अन् मग माझ्यासारख्या सह्यादीच्या दऱ्याखोऱ्यात भिरभिरणाऱ्या गोंधळ्याला सुचू लागतं की , मऱ्हाठियांची पोरे आम्ही नाही भिणार मरणाला!
सांगुनि गेला कुणी मराठी शाहीर अवघ्या विश्वाला.
तीच आमुची जात शाहीरी मळवट भाळी भवानिचा.
पोत नाचवित आम्ही नाचतो. दिमाख आहे जबानिचा!

शिवचरित्रमाला भाग १५ 

कठीण नाही ते व्रत कसलं?

अगदी प्रारंभापासून जिजाऊसाहेब , शिवाजीराजे आणि राज्यकारभारी यांनी एक अत्यंत महत्त्वाची पद्धत स्वराज्यात सुरू केली। प्रधानमंडळांपासून ते अगदी साध्या हुज – यापर्यंत प्रत्येक स्वराज्य- नोकराला रोख पगार , वेतन. हे वेतनही प्रत्येकाला अगदी नियमितपणे मिळावे , अशी व्यवस्था कोणालाही नोकरीच्या मोबदल्यात वतन किंवा मिरासदारी दिली जात नसे. संपूर्ण राज्यकारभाराची आथिर्क व्यवस्था वेतनावरच योजिली होती. सरंजामशाही आणि वतनशाही याला इथेच प्रतिबंध घातला गेला.
कोणत्याही बादशाहीत हा असा वेतनबद्ध राज्यकारभार दिसत नाही। सामान्य नोकरांना पगार असतील. पण बाकीच्या मोठ्यांना नेमणुका सरंजाम , जहागिऱ्या आणि वतनदाऱ्या होत्या. यामुळे अनुशासन राहतच नव्हते. शिवाजीराजांपाशी हुकमी शक्ती सतत सुसज्ज होती , यातील हे एक प्रबळ कारण होते. पगारी पद्धतीवरती राज्यकारभार करणारा शिवाजीराजा हा अर्वाचीन युगातला एकमेव राज्यकर्ता. त्यामुळे सरंजामशाहीतील दुर्गुण राजांनी अस्तित्त्वातच येऊ दिले नाहीत. आत्तापर्यंत बुडालेल्या बादशाह्या आणि विजयनगरचे राज्य का बुडाले याचा अचूक वेध शिवाजीराजांनी निश्चित घेतला होता. यात शंका नाही. त्या चुका आपल्या स्वराज्यात होता कामा नयेत. याकरिता ते अखंड सावधान होते.
माणसांची परीक्षा होते ती कठोर संकटाच्या आणि भरघोस स्वार्थाच्या वेळी। ती वेळ सामोरी आलीच. कमालीच्या अस्वस्थ आणि संतप्त झालेल्या आदिलशाही दरबारने एक प्रचंड निर्णायक मोहीम राजांच्या विरुद्ध योजिली. इ. स. १६४७ पासून ते आत्ता इ. स. १६५९ प्रारभापर्यंत आदिलशाहीला शिवाजीराजे सतत पराभवाचे फटके देत होते. स्वराज्याचा मुलूख वाढत होता. कोकणातील फार मोठा प्रदेश , बंदरे आणि किल्ले राजांनी काबीज केले होते. स्वराज्याचं आरमार दर्यावर स्वार झालं होतं. आरमाराकडे म्हणजेच सागरी सरहद्दीकडे यापूवीर् वाकाटक राजांपासून ते यादव राजांपर्यंत अगदी शिलाहार आणि कदंब राजांपर्यंतही कोणी महत्त्व ओळखून लक्षच दिले नव्हते. कुणाकुणाचे थोडीशीच गलबते दर्यावर तरंगत होती. पण ती लुटुपुटीच्या पोरखेळासारखीच. पोर्तुगीज आणि अरबांसारख्या महामहत्त्वाकांक्षी शत्रूला अन् चाचेगिरी करणाऱ्या कायमच्या शत्रूला धडक देण्याइतकी ताकद आपल्यात असली पाहिजे हे शिवाजीराजांनी अचूक ओळखलं. त्यांनी आरमार उभे करण्यास गतीने सुरुवात केली.
खरं म्हणजे ही आरमाराची परंपरा शालिवाहनांपासूनच चालू राहिली असती , तर पुढे शिवाजीराजांनी आपले आरमार असे जबर बनवले असते की , खरोखरच मराठ्यांचे लष्करी आणि व्यापारी जहाजे थेट इराणी , अरबी , युरोपी आणि आफ्रिकी किनाऱ्यांपर्यंत जाऊन धडकली असती। खऱ्या अर्थाने रुमशाम पावेतो आमचे आथिर्क आणि लष्करी साम्राज्य निर्माण झाले असते. पण ‘ सागरी पंचक्रोशी ओलांडली तर आपला धर्म बुडतो ‘ अशी खुळचट कल्पना आमच्या धर्मपंडितांनी इथे रुजविली अन् वाढविली. आता शिवाजीराजांना आरमाराच्या श्रीगणेशापासून सुरुवात करावी लागत होती. स्वराज्याचे भाग्य असे की , कोकणातील साऱ्या दर्यावदीर् जमातींनी राजांना काळजापासून मदत केली. हाहा म्हणता दर्यावर दरारा बसला. आरमार हा एक स्वतंत्र लष्करी विभाग झाला. आरमारी सेनापती म्हणजे सरखेल म्हणजे सागराध्यक्ष हे पद राजांनी निर्माण केले.
आता विजापुराहून निघाला होता अफझलखान। आदिलशाहीने आणि राजमाता बड्या बेगमेने या खानाला अगदी स्पष्ट शब्दात हुकूम दिला की , ‘ हम लढाई करना चाहते नही। ‘, ‘ ऐसा बहाना बनाकर सिवाको धोका देना। ‘ स्वराज्यासकट शिवाजीमहाराजांचा आणि त्यांच्या सर्व साथीदारांचा ‘ निर्मूळ फडशा ‘ पाडण्याकरिता ही प्रचंड मोहीम खानासारख्या सर्वार्थाने प्रचंड सेनापतीच्या नेतृत्त्वाखाली निघाली. (इ. स. १६५९ मार्च) एवढ्या मोठ्या प्रमाणात घोडदळ , पायदळ , तोफखाना आणि अपार युद्धसाहित्य विजापुराहून निघाले. सार्वभौम मराठी राष्ट्र उभी करण्याची महाराजांची कल्पना आणि महत्त्वाकांक्षा मुळासकट पार पार चिरडून टाकण्याकरता आदिलशाहने मांडलेला हा डाव होता.
जास्तीतजास्त दक्षतापूर्वक आणि योजनापूर्वक खानाने आराखडा आखला। शिवाजीला डोंगरी किल्ल्यांच्या गराड्यातून बाहेर , पूवेर्कडील सपाटीच्या प्रदेशावर यायला भाग पाडावे असा त्याचा पहिला प्रयत्न होता. म्हणूनच त्याने आदिलशाही हद्दीतील देवदेवस्थानांत धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. तेथे त्याला कोण अडविणार ? त्याच्या स्वत:च्या सैन्यातही आमचीच माणसे मोठ्या संख्येने होती. जणू त्यांच्याच अध्यक्षतेखाली खान या देवस्थानांचे धिंडवडे काढत होता. यात त्याचा हेतू एकच होता. शिवाजीराजांना चिडविणे. त्यांच्या धामिर्क भावना कमालीच्या दुखविणे. हे केले की , राजा चिडेल. भावनाविवश होईल आणि आपल्या विरुद्ध तो चाल करून येईल , मोकळ्या मैदानी मुलुखात!
यातच शिवाजीराजांच्या राजकीय विवेकाला आणि लष्करी मुत्सद्देगिरीला आव्हान होते। खबरा मिळत होत्या. यावेळी महाराज कुडाळहून राजगडास आले. खान म्हणजे मूतिर्मंत मृत्यूदूतच. राजगडावर साक्षात यमाचे दूत घिरट्या घालीत होते. राजांची अतिशय लाडकी राणी सईबाई क्षयाने अत्यवस्थ होती. खानाच्या बातम्यांनी स्वराज्य अस्वस्थ होते.
अन् मग शिवाजीराजांची मन:स्थिती कशी असेल ? स्वराज्याचं व्रत म्हणजे अग्निदिव्यच कठीण! कठीण नाही , ते व्रत कसलं ?

भाग ६ ते १०

शिवचरित्रमाला भाग ६  

तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला!

 

शहाजीराजे पकडले गेले होते। त्यांच्या हातापायात बेड्या होत्या. त्यांना मदुराईहून विजापूरला आणलं अफझलखानानं शहाजीराजांना मकई दरवाजाने विजापूर शहरांत आणलं. अन् भर रस्त्याने त्यांना हत्तीवरून मिरवित नेलं. त्यांच्या हातापायात बेड्या होत्याच. या अशा अपमानकारक स्थितीतच अफझलखान शहाजीराजांची या भर वरातीत कुचेष्टा करीत होता. तो मोठ्याने शहाजीराजांना उद्देशून म्हणत होता. ‘ ये जिंदाने इभ्रत है!
‘ खान हसत होता। केवढा अपमान हा! राजांना ते सहन होत नव्हतं. पण उपाय नव्हता. राजे स्वत:च बेसावध राहिले अन् असे कैदेत पडले. जिंदाने इभ्रत! म्हणजे मोठ्या मानाचा कैदी. शिवाजीराजे स्वराज्य मिळविण्याचा उद्योग करीत होते. त्यांनी बंड मोडले होते. म्हणून त्यांचे वडील हे मोठ्या मानाचे कैदी! आता शिक्षाही तशीच वाट्याला येणार. हे उघड होतं. सत् मंजिल या एका प्रचंड इमारतीत राजांना कडक बंदोबस्तात मोहम्मद आदिलशहाने डांबलं. आता भविष्य भेसूर होतं. मृत्यू!
आणि उमलत्या कोवळ्या स्वराज्याचाही नाश! जिजाऊसाहेब यावेळी राजगडावर होत्या। शहाजीराजांच्या कैदेची बातमी त्यांना समजली , त्याक्षणी त्यांच्या मनात केवढा हलकल्लोळ उडाला असेल! गुन्हा नसतानाही अनेक कर्तबगार मराठ्यांची मुंडकी शाही सत्तांनी उडविलेली त्यांना माहीत होती. प्रत्यक्ष त्यांचे वडील आणि सख्खे भाऊ एका शाही सत्ताधीशाने असेच ठार मारले होते. आता शहाजीराजांना जिवंत सोडवायचं असेल , तर एकच मार्ग होता.
आदिलशाहपुढे पदर पसरून राजांच्या प्राणांची भीक मागणं! स्वराजाच्या शपथा विसरून जाणं अन् मिळविलेलं स्वराज्य पुन्हा आदिलशाहच्या कब्जात देऊन टाकणं। नाहीतर शहाजी राजांचा मृत्यू. स्वराज्याचा नाश आणि शिवाजीराजांच्याही अशाच चिंधड्या उडालेल्या उघड्या डोळ्यांनी पाहणं हे आऊसाहेबांच्या नशीबी नव्हतं.! शिवाजीराजांनी स्वराज्यावर याचवेळी चालून आलेल्या फत्तेखानाचा प्रचंड पराभव केला होता. सुभानमंगळ , पुरंदर गड , बेलसर आणि सासवड या ठिकाणी राजांनी आपली गनिमी काव्याची कुशल करामत वापरून शाही फौजा पार उधळून लावल्या होत्या. सह्यादीच्या आणि शिवाजीराजांच्या मनगटातील बळ उफाळून आलं होतं. (दि. ८ ऑगस्ट १६४८ )
अन् त्यामुळेच आता कैदेतले शहाजीराजे जास्तच धोक्यात अडकले होते। कोणत्याही क्षणी संतापाच्या भरात शहाजीराजांचा शिरच्छेद होऊ शकत होता , नाही का ?
पण शिवाजीराजांनी एका बाजूने येणाऱ्या आदिलशाही फौजेशी झुंज मांडण्याची तयारी चालविली होती , अन् त्याचवेळी शहाजीराजांच्या सुटकेकरताही त्यांनी बुद्धीबळाचा डाव मांडला होता। राजांनी आपला एक वकील दिल्लीच्या रोखाने रवानाही केला. कशाकरता ? मुघल बादशाहशी संगनमत करून मोघली फौज दिल्लीहून विजापुरावर चालून यावी , असा आदिलशाहला शह टाकण्याकरता.
राजांचा डाव अचूक ठरला। दिल्लीच्या शहाजहाननं विजापुरावरती असं प्रचंड दडपण आणलं की , शहाजीराजांना सोडा नाहीतर मुघली फौजा विजापुरावर चाल करून येतील! वास्तविक दिल्लीचे मोगल हे काही शिवाजीराजांचे मित्र नव्हते. पण राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. उद्दिष्ट कायम असतं.
हे शिवाजीराजांचं वयाच्या अठराव्या वषीर्चं कृष्णकारस्थान होतं। अचूक ठरलं। विजापूरच्या आदिलशहाला घामच फुटला असेल! शहाजीराजांना कैद करून शिवाजीराजांना शरण आणण्याचा बादशाहचा डाव अक्षरश: उधळला गेला. नव्हे , त्याच्याच अंगाशी आला. कारण समोर जबडा पसरलेला दिल्लीचा शह त्याला दिसू लागला. त्यातच भर पडली फत्तेखानाच्या पराभवाची. चिमूटभर मावळी फौजेनं आपल्या फौजेची उडविलेली दाणादाण भयंकरच होती.
मुकाट्यानं शहाजीराजांची कैदेतून सुटका करण्याशिवाय आदिलशहापुढे मार्गच नव्हता. डोकं पिंजूनही दुसरा मार्ग बादशहाला सापडेना. त्याने दि. १६ मे १६४९ या दिवशी शहाजीराजांची सन्मानपूर्वक मुक्तता केली. अवघ्या सतरा-अठरा वर्षाच्या शिवाजीराजांची लष्करी प्रतिभा प्रकट झाली. मनगटातलं पोलादी सार्मथ्यही प्रत्ययास आलं. वडीलही सुटले. स्वराज्यही बचावलं. दोन्हीही तीर्थरुपचं. किशोरवयाच्या पोरानं विजापूर हतबल केलं. अन् ही सारी करामत पाहून इतिहासही चपापला. इतिहासाला तरुण मराठ्यांच्या महत्त्वाकांक्षा क्षितीजावर विस्मयाने झुकलेल्या दिसल्या.

शिवचरित्रमाला भाग ७ 

तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ!



विजापूरच्या बादशाही विरुद्ध झडलेल्या पहिल्याच रणधुमाळीत शिवाजीराजांनी अस्मानी यश मिळविलं। पण राजे वडिलांच्यावर रागावले , चिडले अन् संतापलेसुद्धा। का ? कारण शहाजीराजे बेसावध राहिले , पकडले गेले अन् भयंकर संकट स्वराज्यावर आले. जिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे यांना मानसिक यातना असह्य झाल्या. हे सारं शहाजीराजांच्या गाफिलपणामुळं झालं.
खरंच होतं ते। याची खंत शहाजीराजांना स्वत:लाही निश्चितच होती. पण पेच सोडविण्यासाठी शहाजीराजांनी शिवाजीराजांच्या हाती असलेला स्वराज्यातला कोंढाणा किल्ला आणि कर्नाटकातील शहाजीराजांचं महत्त्वाचं ठाणं शहर बंगळूर हे बादशहाला देऊन टाकायचं कबूल केलं. आणि हे पाहून शिवाजीराजे रागावले. राजकारणात अक्षम्य ठरणारी गाफिलपणाची चूक स्वत: महाराजसाहेब शहाजीराजे यांनी केली. परिणाम मात्र या लहानग्या स्वराज्याला भोगायची वेळ आली. तळहातावरती भाग्याचा तीळ असावा तसा कोंढाणागड बादशहाला फुकट द्यावा लागतोय , याचं दु:ख राजांना होत होतं. स्वराज्यातील तळहाताएवढी भूमीही शत्रूला देताना यातना होण्याची गरज असते!
कोंढाणा आदिलशाहीत परत देऊन टाकण्याची आज्ञापत्रं राजगडावर आली। आणि महाराज व्यथीत झाले. ते गडावर कुठंतरी एकांतात एकटेच अस्वस्थ होऊन बसले.
मिळालेल्या यशामुळे राजगड आनंदात होता। एकटे शिवाजीराजे खिन्न होते , कोंढाण्यावर. राजे कुठंतरी जाऊन एकटेच बसले आहेत ही गोष्ट वयोवृद्ध सोनो विश्वनाथ डबीर यांच्या लक्षात आली. सोनोपंत म्हणजे आजोबा शोभावेत अशा वयाचे वडिलधारे मुत्सद्दी. भोसले घराण्यावर त्यांची अपार माया. ते चरण चालीने शिवाजीराजांकडे गेले. महाराज गंभीर आणि उदास दिसत होते. सोनो विश्वनाथांनी वडिलकीच्या सुरात त्यांना पुसलं. ‘ महाराज , आपण चिंतावंत का ? आता काळजी कशाची ? तीर्थरुपसाहेब शहाजीमहाराज शाही कैदेतून मुक्त झाले. आपले राज्यही आपण वाचविले. मग चिंता कशाची ?
‘ राजांनी गंभीर शब्दात म्हटलं , ‘ काय सांगावं! आमचे तीर्थरुपसाहेब बेसावध राहिले आणि शाही जाळीत अडकले। आम्ही हरहुन्नर करून त्यांस सोडविण्यास आदिलशहास भाग पाडले. सुटले. पण वडिलांनी बादशहाच्या मागणीवरून आपला स्वराज्यातील कोंढाणागड परत देऊन टाकण्याचे कबूल केले. काय म्हणावं या गोष्टीला ? आमच्या कामाचे मोल वडिलांस समजलेच नाही. ते स्वत:स मोठे जाणते म्हणवितात. पण वर्तन मात्र अजाणते केले.
‘ हे शब्द शिवाजीराजे व्याकुळतेने बोलत होते , पण ते ऐकताच सोनो विश्वनाथ अधिकच गंभीर होऊन जरा कठोर वडिलकीचे शब्दात म्हणाले , ‘ महाराज , काय बोलता हे ? वडिलांच्याबद्दल असं विपरित बोलणं आपणांसारख्या सुपुत्रांस शोभा देत नाही.
‘ शिवाजीराजे अधिकच गंभीर होऊन ऐकू लागले। ‘ महाराज वडील चुकले तर खासच. शंकाच नाही. पण वडिलांबद्दल असं बोलणं बरं नव्हे. कोंढाण्यासारखा मोलाचा गड विनाकारण हातचा जातोय. खरं आहे पण वडिलांच्याकरिता हे सोसावेच महाराज! वडिलांचा मान राखावा.
‘ शिवाजीराजे एकदम स्वत:स सावरीत बआदब म्हणाले , ‘ नाही , आमचं चुकलं। वडिलांचा अपमान करावा म्हणून आम्ही बोललो नाही. स्वराज्याचे नुकसान , मनाला मानवले नाही म्हणून बोललो. कोंढाणा गेला म्हणून बोललो.
‘ ‘ महाराज कोंढाण्याचे काय एवढे वडिलांपुढे ? हा अतिमोलाचा गड देऊन टाकावा। महाराज , आपण तर अवघा मुलूख काबीज करा. उदास होऊच नका. ‘ महाराजांना हा विवेक फार मोलाचा वाटला. पटला. त्यांनी जरा तीव्र शब्दांत म्हटलं. ‘ होय ‘ जरुर. पण वडिलांचा झालेला हा अपमान ती कैद. त्या अफझलखानाचं वागणं बोलणं आम्हाला सहन होत नाही. ज्यांनी ज्यांनी आमच्या तीर्थरुपांचा असा हीन अपमान केला , त्यांचा त्यांचा सूड आम्ही आमच्या हातानं घेऊ. तो अफझलखान , बाजी घोरपडे , ते वझीर मुस्तफाखान , मनसब ई कार ई मुलकी या साऱ्यांचे वेढे आम्ही घेऊ.
‘ सोनो विश्वनाथ या राजवचनांनी सुखावले। अवघं पावलं असं वाटलं असावं त्यांना. आई आणि वडिलांच्याबद्दल आमचा राजा असं पोटतिडीकेनं बआदब वागतो. साऱ्या मराठी मुलुखापुढं सूर्यफुलाचा आदर्श ठेवतो. एक चारित्र्यसंपन्न करारी पण नम्रही नेतृत्त्व मराठ्यांच्या मुलुखाला लाभलेलं पाहून कोणाच्याही डोळ्यांत अभिमानाचे आनंदाश्रू तरळावेत असंच बोलणं राजा बोलला.
हा सारा संवाद पुढे कवींद परमानंद गोविंद नेवासकर यांनी लिहून ठेवला। त्याचा हा आशय.
कोंढाणागड आदिलशाहीत राजांनी देऊन टाकला. बादशहाच्या हुकुमावरून नव्हे. वडिलांच्या आज्ञेवरून!


शिवचरित्रमाला भाग ८ 

आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस!’



शहाजीराजे विजापूरात स्थानबद्धच होते। (दि. १६ मे १६४९ पासून पुढे) या काळात शिवाजीराजांना आदिलशाहच्या विरुद्ध काहीही गडबड करणं शक्य नव्हतं. त्यांच्या महत्त्वाकांक्षा थबकल्या होत्या. पण गप्प बसणं हा त्यांचा स्वभावधर्मच नव्हता. त्यांनी ओळखलं होतं की , आदिलशाह , जंजिऱ्याचा सिद्दी , गोव्याचे फिरंगी , अन् दिल्लीचे मोघल हे आपले वैरी. पण यांच्यापेक्षाही दोन भयंकर शत्रू आपल्या जनतेच्या मनात घुसून बसलेले आहेत. त्यांना कायमचं हुसकून काढलं पाहिजे. त्यातील एका शत्रूचं नाव होतं आळस. आणि दुसऱ्याचं नाव होतं अज्ञान.
या दोन्ही शत्रूंना शिवाजीराजांनी आपल्या स्वराज्याच्या सीमापार पिटाळलं होतं। ते स्वत: अखंड परिश्रम करीत होते. विश्रांती म्हणजेच आळस. ती त्यांना सोसवतच नव्हती. त्यांचे हेर कोकणातील दऱ्याखोऱ्यांत आणि सागरी किनाऱ्यावर हव्या आणि नको अशा गोष्टींचा शोध घेत होते. कारण पुढची मोठी झेप कोकणावर घालायची होती. याच काळात त्यांचं लक्ष पुण्याच्या आग्नेयेस अवघ्या दहा मैलांवरती असलेल्या कोंढवे गावावर गेले. कोंढाणा ते भुलेश्वर या डोंगररांगेच्या उत्तरणीवर हे कोंढवं वसलेलं होतं. तेथूनच बोपदेव घाटातून कऱ्हे पठारात जाण्याचा प्राचीन रस्ता होता. या घाटाच्या पायथ्याशीच कोंढवे गावाला प्यायला पाणी नाही अशी ल्हायल्हाय अवस्था उन्हाळ्यात कोंढण्याची होत होती.
शिवाजीराजांनी या कोंढव्याच्या जवळ अचूक जागा शोधून धरण बांधायचं ठरविलं। जो काही पाऊस थोडाफार पडतो. त्याचं पाणी बंधारा घालून अडवायचं. कमीतकमी खर्चात अन् उत्तम अभ्यासपूर्वक केलं , तर हे होतं. राजांनी तसंच करायचं ठरविलं. स्वत: जाऊन धरणाच्या जागेची पाहणी केली. जागा निवडली. उत्तमच पण जिथं बंधारा घालायचा तिथंच एक प्रचंड धोंड उभी होती. ही धोंड फोडणं आवश्यकच होतं. हे अतिकष्टाचं काम राजांनी कोंढाण्यातल्याच येसबा कामठे नावाच्या एका तरुण मराठ्याला सांगितलं आणि त्यानं ही धोंड फोडून काढली.
धरणाचं काम सुकर झाले। खर्चही बचावला. राजे स्वत: धरणाच्या जागी आले आणि निहायत खूश झाले. येसबानं जीव तोडून धोंड फोडली होती. राजांनी येसबाला कौतुकाची शाबासकी दिली. कौतुकानं ते येसबाला रोख रक्कम बक्षिस म्हणून देऊ लागले. राजा सुखावला होता. माझ्या स्वराज्यातली तरुण पोरं जीवापाड कष्ट करीत आहेत याचा त्याला आल्हाद वाटत होता. पण तो येसबा! राजांची रोख बक्षिसी घेईचना. तो म्हणाला , ‘ पैसे खर्च होऊन जातील. मला कायमची धान्य पिकवायला जरा जमीन द्याल का ?
‘ राजे अधिकच भारावले। येसबाला आलेली ही दृष्टी फारंच चांगली होती. घरसंसार चांगला फुलावा यासाठी चार दिवसांची चंगळबाजी न करता कायम कष्टाचं साधन येसबा पसंत करीत होता. राजांनी ताबडतोब होकार दिला. त्यांनी येसबाला चारवीत जमीन दिली. येसबाच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या मनात एक नवाच अभिमान फुलला की , माझ्या स्वराज्यात , माझ्या राजानं , माझ्या कुटूंबाच्या कायम हितासाठी मला वावर दिलं. आता कष्ट करू. भरल्या कणगीला टेकून पोटभर हक्काची भाकर खाऊ.
राजा अशा नजरेचा होता। दिवाळीत उटणं लावून आंघोळ घालावी अन् मळ धुवून काढावा तसा राजानं कोणाला काही , कोणाला काही काम सांगून त्यांचा आळस आणि अज्ञान धुवून काढायचा दिवाळसणच मांडला. राजानं माणसं कामाला लावली. ज्यांना ज्याची गरज असेल , त्यांना राजानं ‘ ऐन जिनसी ‘ मदत चालू केली. रोख रक्कम उधळली जाते. ज्या कामासाठी रक्कम घ्यायची ते काम करण्याऐवजी माणसं नको तिथं उधळपट्टी करतात. कामं बोंबलतात. अविवेकी माणसं उगीच लगीन करतात. उगीच देवळं बांधत सुटतात. देवाला काय हे असलं आवडतंय व्हय ? राजांनी रोकड कर्ज आणि वतनं इनामं देणं कधी सुरूच केलं नाही. जिजाऊसाहेबांनी पुण्यात प्रथम आल्यावेळी गरजवंतांना आपले संसार आणि उद्योगधंदे सजविण्यासाठी ‘ ऐन जिनसी ‘ मदत केली. तोच हा पायंडा राजे चालवित होते.
रहाटवड्याच्या रामाजी चोरघ्याला शेतात विहीर बांधायला नाही का अशीच मदत केली। यातनं रयतेत कुणाकुणाच्या पूवीर्च्या जखमा राजे भरूनही काढीत होते. तुम्हास्नी ठाऊ नसल. मी सांगतो. कोंढण्याच्या या येसबा कामठ्याच्या संसाराला फार मोठी जखम झाली होती ती कशी ? पूवीर् कोंढाण्याच्या किल्लेदारानं बादशाहीत या येसबाच्या थोरल्या भावावर खोटे नाटे आळ घेऊन त्याला ठार मारलं होतं. कामठ्यांच्या घरातली लक्ष्मी विधवा झाली होती. काही गुन्हा नसताना असं आभाळ कोसळलं. कसं सावरायचं ? कुणी सावरायचं ?
शिवाजीराजांनी सावरायचं। येसबा कामठ्याचं कोसळलेलं घरकुल शिवबानं सावरलं. हे असं सावरलं किसनदेवानं गोवर्धन पर्वत सावरला तसं सावरलं. आपल्या बोटावर सावरलं. पण अवघ्या गवळ्यांच्या काठीचा आधार त्या पर्वताला मिळालाच की!


शिवचरित्रमाला भाग ९ 

चंदग्रहण


शहाजीराजे प्रत्यक्ष तुरुंगातून सुटले , तरीही ग्रहणकाळ संपला नाही. मोहम्मद आदिलशाहने शहाजीराजांना कैदेतून मुक्त केलं. पण त्यांना हुकूम केला की , आमची परवानगी मिळेपर्यंत तुम्ही विजापूर शहरातच राहायचं. बाहेर कुठेही अजिबात जायचं नाही.
अतिशय धूर्तपणानं आणि सावधपणानं शहानं हा हुकूम दिला. म्हणजे शहाजीराजांना त्यानं विजापुरात स्थानबद्ध केलं. याचा परिणाम शिवाजीराजांच्या उद्योगांवर आपोआप झाला. शहानं या मार्गानं शिवाजीराजांना धाकच दाखविला की बघ , तुझा बाप मुक्त असला तरीही विजापूरात तो आमच्याच पंजाखाली आहे. जर तू सह्यादीच्या पहाडात गडबड करशील , तर अजूनही तुझ्या बापाचे प्राण जातील याद राख.
धूर्त शहाने शिवाजीराजांच्या हालचाली साखळबंद करून टाकल्या.
पण गप्प बसणं हा शिवधर्मच नव्हता. ते एक तुफान होतं. त्यांच्या महत्त्वाकांक्षेला विजेचे पंख होते. राजांचं भीमा नदीच्या उत्तरेकडे थेट दिल्लीपर्यंत लक्ष होतं. आज ना उद्या पण लवकरात लवकर आपल्याला भीमा ओलांडून मोगलाई सत्तेवर नक्कीच चढाई करायची आहे , हे लक्षात घेऊन महाराज वागत होते. भीमेच्या उत्तरेला थेट काश्मीरपर्यंत शहाजहानचं मोगली साम्राज्य होतं. तसंच केव्हातरी सह्यादी ओलांडून मावळतीला असलेल्या कोकणपट्टीवर आपल्याला उतरायचं आहे आणि कोकणचा समुद आपल्या ओंजळीत घ्यायचाय हीही महत्त्वाकांक्षा त्यांची होतीच. कोकणात सत्ता विजापूरकरांची होती. पण त्यातही सिद्दीनं आपली जबरदस्त सत्ता जंजिऱ्याच्या सागरी किल्ल्यावर थाटली होती. एखाद्या बेटांवर आणि गोमांतकात पोर्तुगीज फिरंगी जुलूम गाजवत होते. एकूण अवघं कोकण काबीज करणं म्हणजे सुसरी- मगरींशी झुंज देण्याइतकं अवघड काम होतं. अशक्यप्राय!
महाराजांची सावध महत्त्वाकांक्षा सह्यादीवरून पश्चिम पायथ्याशी पसरलेल्या कोकणावरती डोकावून डोकावून फिरत होती. झडप घालयाची होती. पण शहाजीराजे जोपर्यंत विजापूर शहरात शाही पंजाखाली स्थानबद्ध आहेत , तोपर्यंत काहीही करता येत नाही. याची जाणीव त्यांना होती. गप्प बसवत नव्हतं. पण काहीच करता येत नव्हतं. पण आपल्याच लहानग्या स्वराज्याचं बळ ते वाढवित होते. पायदळ , घोडदळ , हेरखातं , परराष्ट्रवकील खातं , जमीन महसूल , रयतेच्या अडीअडचणी इत्यादीत ते अविश्रांत गुंतले होते. हेरगिरी करणारं नजरबाज खातं , बहिरी ससाण्यासारखं स्वराज्याभोवती शत्रूच्या मुलखांत भिरभिरत होतं. नानाजी विश्वासराव दिघे , बहिजीर् नाईक जाधव आणि असेच चतुर हेर त्यात होते. पुढे संुदरजी परभुजी आणि वल्लभदास या नावाचे दोन चतुर गुजराथी हेरागिरीसाठी महाराजांना गवसले. निवडून निवडून आणि पारखून पारखून महाराज माणसं मिळवत होते. घडवत होते. यात जातीधर्माचं बंधन नव्हतं. सामान्य माणसांतून असामान्य माणसं घडविण्याचा हा शिवप्रकल्प होता अत्रे , बोकील , पिंगळे , आवीर्कर राजोपाध्ये , हणमंते , पतकी अन् अशाच कुळकर्ण करीत खडेर्घाशी करणाऱ्या किंवा हातात दर्भाची जुडी अन् पळीपंचपात्री घेऊन गावोगांव श्राद्धपक्षाची पिंडं पाडणाऱ्या वा लग्नमुंजीच मंगलाष्टक तारस्वरात ओरडत हिंडणाऱ्या…. पण तल्लख बुद्धी , काळजात हिम्मत आणि मनगटात तलवारीची हौस असलेल्या निवडक भटाभिक्षुकांचे गुण अचूक हेरून त्यांनाही राजकारणाच्या आणि रणांगणांच्या आखाड्यात उतरविणारे महाराज अठरापगड अवघ्या मऱ्हाठी जातीजमातीलाही आपल्या हृदयाशी धरीत होते ; स्वराज्याच्या कामाला गुंफीत होते. हे राज्य एक आहे , आम्ही सारे एक आहोत अन् श्रींच्या इच्छेप्रमाणे हे राज्य आम्ही वैभवशाली करणार प्रतिपद्चंदलेखेव आहोत ही गगनालाही ठेंगणी बनविणारी महत्त्वाकांक्षा धरीत होती. महाराजांचा पहिला पायदळ सेनापती होता नूरखान बेग सरनोबत , बहिजीर् नाईक जाधव हा रामोशी होता. महार , प्रभू , धनगर , सोनार , शिकलगार , कहार , चांभार , भांग , किती जाती जमातींची नावं घेऊ ? शहाण्णव कुळीच्या मराठ्यांपासून ते चंदपूर गोंडवनातील उघड्यावाघड्या गोंडांपर्यंत अवघ्यांचा भोंडला सह्यादीच्या भोवती महाराज मांडीत होते. त्यांना ‘ अवघ्या मऱ्हाठी यांचे गोमटे करावयाचे ‘ होते. त्यासाठी हा स्वराज्याचा मनसुबा त्यांनी मांडला होता. शहाजीराजांच्या स्थानबद्धतेमुळे ते सह्यादीच्या शिखरांपाशीच थबकले होते. खोळांबले होते. कोकणात डोकावून डोकावून बघत होते. त्यांना कोकणचं वैभव दिसत होतं. अन् गरीब रयतेचे हालही दिसत होते. कोकणात आंबा पिकत होता. रस गळत होता , कोकणचा दर्या राजा झिम्मा खेळत होता. शेतकरी राजा अर्धपोटी राहत होता , तरीही जगत होता.
हबश्यांच्या अन् फिरंग्यांच्या अत्याचारांचे फटके खात होता तरीही नवी आशेची स्वप्न पाहत , दु:ख उशाखाली झाकून झोपत होता. कोकणातल्या त्या आगरी , कुणबी , कोळी , भंडारी , मालवणी अन् गांवकर ‘ मंडलींना ‘ पहाटेच्या स्वप्नात शिवाजीराजे दिसत असल्यास काय ?
अन् याच काळात (इ। स. १६४९ – १६५२ ) महाराजांच्या चाणाक्ष हेरांनी कोकणपट्टी हेरली. सुख , दु:ख , अपमान , अत्याचार आणि आशेचे किरणही हेरले. समिंदर हेरला , किनारा हेरला. लबाड हेरले , वैरी हेरले. इमानी अन् कष्टाळूही हेरले.
महाराजांची झेप पडणार होती .कोकणपट्टीवर उद्या ? परवा ? ते अवलंबून होतं. शहाजीराजांच्या पुढच्या परिस्थितीवर. पण याच काळात महाराजांचं बळ त्यांच्या तळहाताएवढ्या स्वराज्यात सुपाएवढं वाढत चाललं होतं.
पण नियती मोठी द्वाड. एका बाजूनी पंखात बळ वाढवित होती , तर दुसऱ्या बाजूनी तीच नियती पंखांवर भयंकर आघात करीत होती. याच काळात (इ. स. १६४९ फाल्गुन) जगद्गुरू तुकाराम महाराज अचानक हे जग सोडून गेले.

शिवचरित्रमाला भाग १०

 क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.




मोहम्मद आदिलशाहची प्रकृती चांगली नव्हती। शाह अर्धांगवायूसारख्या विकारानं लुळापांगळा झाला होता. त्याची तबियत ढासळत होती. त्याचवेळी गोलघुमट या प्रचंड इमारतीचं बांधकाम उंचउंच चढत होतं. लवकरच ते पूर्ण होणार होतं.
आपल्याला हे माहिती आहे ना ? की गोलघुमट ही इमारत म्हणजे याच मोहम्मद आदिलशाहची कबर. मोहम्मद आदिलशाह तक्तनशीन बादशाह झाला त्याचवेळी त्यानं स्वत:साठी स्वत:च हे कबरस्तान बांधावयास सुरुवात केली. निष्णात वास्तुकारागिरांनी ही इमारत बांधली. उच्चारलेल्या वा उमटलेल्या ध्वनीचे अनेक प्रतिध्वनी या घुमटात घुमत होते. पण आजारी बादशाहच्या मनात एकच ध्वनी आणि असंख्य प्रतिध्वनी उमटत होते मऱ्हाठ्यांच्या बंडाचे. बादशाह बेचैन होता.
एक गोष्ट त्यानं केली त्याने चार वर्षांच्या स्थानबद्धतेनंतर शहाजीराजांची मुक्तता केली. शहाजीराजे दक्षिण कर्नाटकात आपल्या जहागिरीवर रवानाही झाले. म्हणजेच शिवाजीराजांच्यावरचं असलेलं दडपण आणि चिंता एकदम भिरकावली गेली. स्वैर संचार करावयास हे ‘ शिवाजीराजे ‘ नावाचे वादळ मुक्त झाले अन् सुसाट सुटले. गेल्या चार वर्षांत राजांनी आदिलशाही विरुद्ध बोटही उचलले नव्हते. ते एकदम पाच हजार स्वारांचं लष्कर घेऊन स्वराज्यातून म्हणजेच राजगडावरून थेट कर्नाटकाच्या दिशेनं सुटले. कर्नाटकाच्या उत्तर भागात मासूर या नावाचं एक जबर लष्करी ठाणं होतं. शिवाप्पा नाईक देसाई हा शाही ठाणेदार मासूरच्या किल्ल्यात होता.
शिवाजीराजांचा भयंकर वादळी हल्ला या मासूरवर अचानक धडकला। त्या शिवाप्पा नाईकाला स्वप्नातही कल्पना नसेल की , ही मराठी चित्त्यांची झडप आपल्यावर येईल। कारण मासूरपायून शिरवळपर्यंत सर्व मुलुख आदिलशाहीचा होता। या एवढ्या मोठ्या प्रदेशात सर्वच ठाणी आदिलशाहीची. सातारा , कराड , मिरज , कागल , चिकोडी , तेरदळ इत्यादी सर्व ठाण्यांना टाळून शिवाजीराजांनी थेट मासूर गाठलं होतं. शिवाप्पाची अक्षरश: दाणादाण उडाली. त्याची फौज उधळली गेली. तो पळून गेला आणि महाराज हा तडाखा देऊन तेवढ्याच झपाट्यानं पुण्याकडे पसार झाले. मासूर त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलं नाही ? लुटलं नाही ? मधल्या कोणच्याही ठाण्यावर हल्ला किंवा कब्जा केला नाही ?
नाही!नाही! का ? राजांना आदिलशाहीस हे दाखवून द्यायचं होतं की , हा शिवाजीराजा भोसला विसरभोळा नाही , गाफिल नाही , बावळट नाही। वडिलांच्या स्थानबद्धतेच्या काळात माझं बळ आणि माझी तरबेजी किती आहे हे मी तुम्हाला दाखवून देतो आहे. माझ्या वडिलांचा झालेला अपमान मी विसरलेलो नाही. मासूरवरच्या हल्ल्याने आदिलशाही दरबार थक्क झाला. आता दरबारला चिंता होती पुढे काय काय होणार याची.
महिने उलटत गेले। महाराजांचे हेर मोगलाईतूनही खबरा आणीत होते. दिल्लीचा शाह शहाजहान आग्ऱ्याच्या किल्ल्यात आजारपण भोगीत होता. त्याचा थोरला शाहजादा दारा दिल्लीत होता. दुसरा पुत्र मुराद हा गुजराथेत सुभेदार होता. तिसरा पुत्र औरंगजेब हा दक्षिणेत बिदरला होता. आणि चौथा बंगालच्या बाजूस होता. त्याचं नाव सुजा.
शाहजानला इतर कोणच्याही वैऱ्यांपेक्षा आपल्याच मुलांची भीती वाटत होती. त्यातला थोरला पुत्र दारा हा सुसंस्कृत होता. बाकीचे सगळे क्रूर श्वापदाहूनही क्रूर प्राणी होते. सगळे टपले होते दिल्लीच्या तख्तावर. बहुतांशी सर्व राजपूत सरदार औरंगजेबाला अनुकूल होण्याची शक्यता होती. शाहजहान मरण्याचीही कुणी वाट पाहणार नव्हता. बंडासाठी जो तो तोफा बंदुका ठासून तयार होता. खरं म्हणजे परिस्थिती अशी होती की , दारूगोळ्याचं कोठारच उडवावं तसं बंड करून राजपुतांना दिल्लीच ताब्यात घेता आली असती. क्रांती! पण या राजपुतांना क्रांतीपेक्षा बादशाहाशी असलेली आपली नाती जास्त मोलाची वाटत असावीत. राजपुतांच्या मनात क्रांतीचे म्हणजेच स्वातंत्र्याचे विचार येतच नव्हते. त्यांच्या अंत:करणात क्रांतीचे विचार प्रेरित करणारी एकही जिजाबाई राजस्थानात जन्माला आलेली नव्हती. इतर कुठून ही क्रांती यावी ? क्रांतीची आयात आणि निर्यात कधी करता येत नाही. ती उगवावी लागते स्वत:च्याच मेंदूत मग ती उतरते हृदयात , मग ती शिरते मनगटात , अन् मग ती प्रकट होते तलवारीच्या पात्यातून. शिवाजीराजांना ही उत्तरेची ओळख पुरेपूर झालेली होती.
Website Security Test