Showing posts with label पोवाडे. Show all posts
Showing posts with label पोवाडे. Show all posts

Wednesday, March 14, 2012

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा

 

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि- नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा मग्न आज जयदुर्ग आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनी भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांची । जंगले
परदास्य-पराभविं सारीं । मंगले
या जगति जगूं ही आज गमतसे लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुद्धि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे
ती बुद्धि भाबड्या जीवां । लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थें तुज ज्या
                                             हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा                                                                


- स्‍वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

रायगडची हिरकणी (पोवाडा)–शाहीर खेतर सखाराम चव्हाण


रायगडची सांगतो थोरी--ऐका तुम्ही सारी गोष्ट एक घडली त्या रायगडला----
ऐकताना नवल वाटे मजला--सुरवात करत पोवाडयाला -जी-जी---()
छत्रपती होते गडवरी--पुनव कोजागिरी--समारंभ घनदाट भरला
आनंदाने गड सारा फुलला---किती वर्णावे प्रसंगाला --जी---जी ()
एक खेडे होते शेजारी--गड पायतारी---गौळी लोक रहात होती गावाला---
नित जाती दूध विकण्याला--नेहमीचा परीपाठ त्यान्ला-जी-जी---()
गौळी लोक गेले गडावरी--दूध डोईवरी --हाळी ते देती गिरायकाला --
झटदिशी दूध विकण्याला---विकून ते येती परत घरला जी--जी ()
चाल दुसरी
त्याच गावी होती गौळण -- नाव तिचे हिरा हे जी जी
बेगीबेगी निघाली गडावरी -- काढुनीया धारा हे जी-जी
दुसरी गौळण बोलती तीला--झाल का हिरा हे जी-जी
हिरा म्हणते तुम्ही जा पुढे-येती मी उशीरा हे जी-जी
पाळण्यात बाळ घालूनी --लावीते निजरा हे जी-जी-
चाल तिसरी-हिरा बाळाला झोपविते
हिरा बोले निजनिज बाळा-तुला लागू दे आज डोळा
गडावरी गौळ्याचा मेळा--दूध विकाय झाले गोळा
कोजागिरी पुनवेचा सोहळा-मला जावू दे लडीवाळा
चाल पहिली
हिरा गौळण निघाली गडावरी--चरवी डोईवरी
जाता जाता सांगे म्हातारीला --झोक्यामधे बाळ झोपवीला
उठला तर घेवून बसा त्याला-दिस मावळायला येते घरला जी ()
चाल तिसरी
हिराबाई गेली गडावरी--दूध घेणारी पांगली लोक सारी
दूध घ्या हो म्हणती कुणी तरी-आशी हाळी देती गडावरी
दिस मावळून गेला बगा तरी-हिरा दूध विकण्याची गडबड करी
निघाया घरला जी-जी ()
चौकीदार दरवाज्यावरी-दिस मावळाय दार बंद करी
हीरा आली दरवाजावरी-पहाती हालवून दारे सारी
चौकीदार होते शेजारी-हिरा बोले त्याना सत्वरी
मला जायाच हाय बगा घरी-बाळ माझा तान्हा हाय घरी
कुनी न्हाय घियाला जी-जी ()
चौकीदार तिची समजूत करी-महाराजांचा हुकूम आमच्यावरी
आम्ही हूकमाचे ताबेदारी-आशी गोष्ट गेली त्यांच्या कानावरी
न्हेत्याल टकमक टोका वरी-मुकू प्रानाला जीर हे जी-जी ()
हिराबाई विनंत्या करी--पण ऐकेना पहारेकरी
हिरा मनात कष्टी भारी--बाळ दिसे तीच्या समोरी
हिरा गडावर घिरटया मारी--फिरुनी वाटेचा शोध ती करी
आवरी मनाला जी-जी ()
चारी बाजूला मारुन फेरी-भरली उबळ मायेची उरी
गाय वासराला चुकली पाखरी--पक्षा सारखी मारावी भरारी
पडती डोळ्यातून आसवाच्या सरी-दुध न्हाय तिजला-जी-जी (१०)
ठाम विचार केला अंतरी--हिराबाई गेली बगा कडयावरी
म्हणे देवा तू धाव लौकरी - आले संकट माझ्यावरी
माझे रक्षण तूच आता करी-विनवी देवाला जीर हे जी-जी (११)
कडयावरुन खाली ती उतरी-उतरताना पाय तिचा घसरी
तरी धिरान तोल सावरी-झाडाझुडुपांचा ती आसरा करी
गेली तळाला जीर हे जी-जी (१२)
चाल ली
हिराबाई गेली तेव्हा घरी--बाळ मांडीवरी
शेजारीण घेवून बसली बाळाला-हिराने उचलुन घेतला त्याला
पोटाशी धरुन कुरवाळीला --आईला पाहून बाळ हासला जी-जी (१३)
हीच गोष्ट कळाली गडावरी--लोक नवल करी---
छत्रपती शिवाजी महाराजांन्ला-हकीगत सांगी लोक त्यान्ला
हिराने गड सर केला जीर हे जी-जी (१४)
छत्रपती हिरा सामोरी--उभी दरबारी
महाराजानी बक्षीस दिले तिजला-त्याच कडयावरी बुरुज बांधला
हिराचे नाव दिले बुरजाला-हिरकणीचा बुरुज म्हणती त्याला
हिराचा पोवाडा संपवीला जीर हे जी-जी (१५)
खेतर शाहीर कविता करी-करुनी शाहिरी---
श्रद्धांजली वाहतो हिराबाईला-सीमा नाही तीच्या धाडसाला
मानाचा मुजरा छत्रपतीला-नमस्कार करत मंडळीला जी (१६)

Monday, March 12, 2012

राजमाता जिजाबाई (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर

राजमाता जिजाबाई (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर

सिंदखेडराजाला झाला जन्म जिजाई मातेचा ।
लखूजी जाधव पिता तियेचा सरदार निजामशाहीचा ॥
लखूजी जाधव-कन्या जिजाई मालोजींची ती सून ।
वीरपत्नीध शहाजी राजाची मोठी होती ती गुणवान ॥
चाल
जिजाबाई आमचं दैवत । मोठं जागृत ।
स्फूर्ति ती देत । आजही सार्यात महाराष्ट्रास ।
दुसरें दैवत नाहीं आम्हांस । तिच्या नांवाचा मोठा विश्वास ॥
चाल
गुलामगिरीची बेडी तोडून राज्य हिंदवी करण्याला ।
उत्सुक झाली होती जिजाई, ध्यास लागला जीवाला ॥
चाल
राजमाता जिजा महशूर । दिगंतावर ।
केला तिनं थोर । महाराष्ट्राचा राजा शिवराय ।
दुस्मान करी सदा हाय हाय । धन्य ती जिजा आपुली माय ॥
चाल
शिवनेरीला जन्म जाहला शिवाजीचा त्या वेळेला ।
महाप्रतापी बाळ जन्मला, आनंदाला भर आला ॥
जिजाबाई देई शिक्षण शिवाजी बाळाला ॥
रामायण महाभारत शिकवी ती त्याला ॥
दुष्टांचा नाश करण्याला । रामकृष्ण अवतार झाले शिकवलं त्याला ॥
लहानाचा मोठा बाळ झाला । अन्यायाची चीड ये त्याला ।
देवधर्म साधुसंताचा भक्त तो झाला ॥१॥
जिजाबाई आणि शिवराय गेले पुण्याला ॥
दादोजी कोंडदेव होते गुरुजी त्याला ॥
हिंदवी राज्य करण्याचा संकल्प केला ॥
तवां बोलला बाळ आईला । "आई आशीर्वाद दे मला ।"
रोहिडेश ठेवला साक्षीला । आणि हिंदवी राज्य करण्याच्या घेतलं शपथेला ॥
जिजाबाई बोलली त्याला । "बाळा ! आशीर्वाद हा तुला ।
जगदंबा तुझ्या पाठीला । भारी होशिल कळिकाळाला ।
शिवशंकर यश देणारा । धन्य धन्य माता ती धन्य बाळ तो झाला ॥२॥
शिवाजीचं मन तिनं भारलं थोर पराक्रम करण्याला ।
राजा शिवाजी तिनं घडविला, राज्य हिंदवी करण्याला ॥
संकटं आली मोठमोठालीं शिवरायावरती जेव्हां ।
’पुढेंच जा तूं, मागें सरुं नको’, माता बोलली हो तेव्हां ॥
"देवी भवानी प्रसन्न तुजला देईल यश तुज चौफेर ।
तूं सिंहाचा बच्चा, लांडगे कसे तुला रे धरणार" ॥
चाल
चालून आल अफझलखान । केली त्याचा दाणादाण ॥
चालून आला फाजलखान । निसटून गेला वीर महान ॥
चालून आला शास्ताखान । बोटं छाटून केला म्लान ॥
सिंह आग्र्याला सांपडला । तेथूनी पण सुटुनी आला ॥
कैक संकटें प्राणघातकी शिवबावरती जरि आली ।
तरी न माता डगमगली ॥३॥
चाल
धीर देत ती पुढे चालली ।
शिवराज्याभिषेक सोहळा तिनं पाहिला ।
तृप्त झाला मातेचा डोळा ।
चाल
शहाजी राजे नव्हते परि ते सौख्य सोहळा बघण्याला ।
मनांत येऊन खिन्न जाहली वीरपत्नीा ती त्या वेळां ॥
पंधरा दिवस ही पुढें न जगली इहयात्रा ती संपविली ।
जगदंबेचे नांव घेऊनी परलोकीं निघुनी गेली ॥
चाल
पाचाड गांवी अंत तो झाला । रायगडाच्याच पायथ्याला ।
धन्य शहाजी धन्य जिजाई धन्य शिवाजी जगिं झाले ।
मायबाप ही धन्य पुत्र हा धन्य असे जगतीं झाले ॥
घरांघरांतून दर्शन होईल जिजामातेचें ते जेव्हां ।
भरभराट होईल देशाची निश्चित जन हो मग तेव्हां ॥
जिजाई व्हावें जगांत तुम्ही आयाबहिणींनो ही विनति ।
पांडुरंग शाहीर जाहला कीर्ति गावया सिद्धमति ॥४॥

Saturday, February 25, 2012

सिंहगड (पोवाडा) - शाहीर स्वातंत्र्यवीर सावरकर

 

 

सिंहगड (पोवाडा) - शाहीर स्वातंत्र्यवीर सावरकर

चौक १
धन्य शिवाजीतो रणगाजी धन्यचि तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥ध्रु०॥
देशमाजीं कहर गुदरला पारतंत्र्य जहरें ।
हलाहलहि या परदास्याहुनि झणिं प्राशितां बरें ॥
गोमातांची मान आणि ती शिखा ब्राह्मणांची ।
परदास्याची सुरी बंधु हो चिरी एकदांची ॥
देश हिंदुचा, हाय ! तयाचा मालक म्लेंच्छ ठरे ।
परि परमेशा फार दिवस हें रुचेल केविं बरें ॥
चाल
मग आर्य देशतारणा । अधम मारणा ।
कराया रणा । परदास्य रात्रि नाशाला ।
स्वातंत्र्य सूर्य उदयाला । शिवनेरीं श्रीमान्‌ झाला ।
त्या सूर्याचा किरण रणांगणि तळपे तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१॥
चौक २
ठायीं ठायीं वीर मराठा सरसावुनि भाला ।
रामदास मत छत्रपतीचा अनुयायी झाला ॥
स्वातंत्र्य श्री-तोरण, तोरण-गड अवघड पडला ।
भगवा झेंडा त्या भाल्यासह सरसर वर चढला ॥
प्रतापगडची शांत कराया स्वतंत्रता देवी ।
पुढती फाडुनि अफझुल्याला भग तो मग ठेवी ॥
चाल
ते धन्य मराठे गडी । घेति रणिं उडी ।
करुनि तांतडी । देशार्थ मृत्युही वरिला ।
शाहिस्ता चर चर चिरिला । गनिमांनि वचक बहु धरिला ।
झुरतो परि रिपु अजुनि नांदतो सिंहगडामाजीं ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥२॥
चौक ३
जरा लढाई पाहुनि वदली जिजा शिवाजीला ।
गड सर केल्याविण वरणें ना अन्न शपथ तुजला ॥
परके बाळा भूमातेला ते लाथा देतां ।
अन्न न गमतें गोमांसाचा घांसचि तो घेतां ॥
गुलामगिरिची बेडिच पायीं अशीच खुपतांना ।
गुलामगिरिच्या नरकामाजीं असेच पचताना ॥
चाल
निर्जीव अन्न कां रुचे । उदर शत्रुचें ।
फाड तेथिंचें । रक्तानिं भूक शमवावी ।
मांसानि भूक शमवावी । अतडयांनि भूक शमवावी ।
घ्या गड कड कड फोडुनि अधरां धावा ये काजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥३॥
चौक ४
धन्या माता जिजा तिलाची शिवबा सुत साजे ।
स्वतंत्र झाल्यावीण सुताला अन्नचि दे ना जे ॥
स्वातंत्र्याच्या सुखनीमाजीं जन्म स्वतंत्रांचे ।
गुलामगिरिच्या उकिरडयावरी गुलाम निपजाचे ॥
श्वानहि भरतें पोट बापुडें चघळुनिया तुकडे ।
शेणामाजीं बांधुनि वाडे नांदति शेणकिडे ॥
चाल
संसार असा जरि करी । मनुजता तरी ।
कशासी धरी । हो तुच्छ किडाचि न कां तो ।
जो गुलाम असुनी हंसतो । परदास्यीं स्वस्थचि बसतो ।
धिग् धिग् वदला श्री शिव घेउनि गड राखूं बाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥४॥
चौक ५
प्रभात झाली वाद्यें झडली मुहूर्त लग्नाचा ।
बोहल्यावरी उभा राहिला सुत तानाजीचा ॥
घटिका पात्रें मोजुनि द्विजगण शेवटच्या घटिला ।
दंगल सोडुनि मंगल व्हाया सावधान वदला ॥
वदला द्विज परि कुणि भेटाया तानाजीस आला ।
आला तो तों तरवारींनीं मंडप खणखणला ॥
चाल
तों हर हर एकचि झाला । चमकला भाला ।
म्हणति रे चला । शिवराय दूत पातले ।
हें लग्न राहुं द्या भलें । युद्धार्थ जनन आपुलें ।
लहान मोठा निघे मराठा पुढती तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥५॥
चौक ६
परमात्म्याशीं जीवात्म्याची तन्मयता झाली ।
वायुकुमर कीं रघुविरचरणीं मिठी पुन्हां घाली ॥
अरुणचि की श्रीजगन्मित्रवर सूर्या आलिंगी ।
आलिंगी कीं तानाजी श्रीशिवरायालागीं ॥
भेट जाहली मसलत बसली राया धाडिं मला ।
प्राणहि देईन, घेईन गड परि तानाजी वदला ॥
चाल
हें पर्व स्वातंत्र्याचें । शत्रु रुधिराचें ।
स्नान मज साचें । घडुं द्यावें हो शिवराया देशार्थ पडो द्या काया ।
जाईल ना तरी वाया । अखेर निसटे शिवहस्तांतुनि तीरचि तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥६॥
चौक ७
शिवरायाच्या तीरा जा बा तानाजी वीरा ।
वीरामाजीं हो रणगाजी अरि मारुनि घोरा ॥
सिंहगडावरी तुझी आर्य भू फोडी हंबरडे ।
गुलामगिरीचा खून पाडण्या जा जा जा तिकडे ॥
देवदूत हो स्वातंत्र्याच्या पवित्र कार्याला ।
जातो आहे अमुचा ताना रक्षण व्हा त्याला ॥
चाल
हे मंगल तारागण हो । अप्सरा जन हो ।
गडावरि जा हो । तानाजि लढाया जातो ।
अरि फार, एकला कीं तो । परि धीर पुढेंची घुसतो ।
त्या धीरावरि वर्षा अमृत आणि फुलें ताजीं ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥७॥
चौक ८
मध्य रात्रिची वेळ शांत परि भयदायी थोर ।
गडा खालच्या झाडी मध्ये घन अंधःकार ॥
रात्रीलाही निद्रा लागे किर्र शब्द उमटे ।
करवंदीच्या एका झाळिंत तो ध्वनि घोर उठे ॥
"अहो मारिती पूर्वज तुमचे स्वर्गांतुनि हांका ।
अहो मराठे कान देउनी तुम्ही सर्व ऐका ॥
आई तुमची ही भूमाता पाठीवरी तिच्या ।
उठला चाबुक फुटल्या ना रे धारा रक्ताच्या ॥
या रक्ताच्या एका थेंबासाठीं लक्ष शिरा ।
अरिच्या कुटुनी मलम लावणें आईच्या शरिरा ॥
अस्सल जो जो बीज मराठा तो तो मज व्हावा ।
त्यानें येउनि, देउनि प्राणा, मजसह गड घ्यावा ॥
चाल
बाकीचे षंढ हो चला । गृहाप्रति वळा ।
बचावुनि गळा । गळसरी त्यांत घालणें ।
तें योग्य तयांना लेणें । तलवार करीं ना घेणें ।"हर हर गर्जुनि सिंह झाडिंतुनि चवताळुनि ये जी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥८॥
चौक ९
रामा लक्ष्मण किंवा भीमा अर्जुन तो गमला ।
अपुल्या भावा सूर्याजीला तानाजी वदला ॥
कल्याणाचे दारामागें दबा धरुनि बसणें ।
शंभर घेउनि गडी दार मी फोडिन लाथेनें ॥
शंकित कां हो, हस्त, मस्तकें लढतां जरि पडतीं ।
धडें तथापि दार फोडितिल पार आमुची तीं ॥
चाल
हें कार्य आमुचे ठरे । बाकि जें उरे ।
तें करा पुरे । किल्ल्यांत शिरुनि तें खानीं ।
आणि तुम्हीं वीर मर्दानीं । हां निघा चाललों हा मी ।
जा तरि येशिल परत भेटण्या केव्हां तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥९॥
चौक १०
दरड उभट बहु चढणें मुश्किल घोरपडीलाही ।
म्हणुनि पहारा तिथें गडावरि मुळिं नव्हता कांहीं ॥
साधुनि ही संधी तानाजी तिथें नीट आला ।
सज्ज नव्हे चढण्यासि हवेमधिं उडण्यासी झाला ॥
कोणी वदतां, ’पाय निसरतां अहा ! काय होई ।’
वदे ’शूर देशार्थ मरोनी स्वर्गाप्रति जाई ॥’
चाल
यशवंती सरसर चढतां । हर्ष हो चित्ता ।
सोल घे हातां । तानाजि चढूं लागले ।
सद्‌भाग्य चढूं लागले । स्वातंत्र्य चढूं लागलें ।सांभाळी रे म्लेंच्छा आतां आला तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१०॥
चौक ११
एकामागुनि एक मराठा सरसर वर चढला ।
दहा हजारावरि रिपु असुनी चढविति ते हल्ला ॥
कोण कोठुनी किती आणखी कसें कुठें लढलें ।
दडले अंधारीं रिपु अपसामधिं झुंजुनि पडले ॥
खालीं वरती मागें पुढती आजूबाजूनीं ।
सैरावैरा पळतां मारिती भाला भोंसकुनी ॥
चाल
तो मर्द मराठा गडी । शत्रुंचीं मढीं ।
हजारों पाडी । तुडवीत चिखल मांसाचा ।
पोहुनी पूर रक्ताचा । दे मार करित ये साचा ।
कल्याणाचें दार धडाडे झाली रे बाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥११॥
चौक १२
झाली बाजी परि तो कोठें आहे तानाजी ।
मारित काटित छाटित चढला रणरंगामाजीं ॥
उदयभानु तो नजरे पडतां घे घे मार उडे ।
झुंज झुंजतां नजरा फिरल्या गर्जे सिंह पुढें ॥
सह्याद्रीच्या वाघा शेळी उदयभानु खाशी ।
खान आपुल्या बापा म्हणतो मी रजपुतवंशी ॥
धिक्‌ धिक्‌ नीचा लाविसि वंशा लाज रजपुतांच्या ।
श्रीकृष्णाच्या श्रीरामाच्या प्रतापसिंहाच्या ॥
मुसलमान कां बाप तुझा जो लढसी आम्हांसी ।
आर्यभूमिला मुक्त कराया जे झटती त्यांशी ॥
वदोनि पुनरपि तुटोनि पडला जरि तो श्रमलेला ।
उदयभानुचा वार मर्मिंचा अवचित तो बसला ॥
चाल
मूर्च्छना तया भीतरी । पातकी खरी ।
वीररसशाली । तानाजी खाली येतो ।
तो धैर्य मेरु उसळीतो । शिवकरिचा भाला गळतो ।
भूमातेच्या मांडीवरती पहुडे तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१२॥
चौक १३
पडतां ताना आणि मराठे बंधू पळतांना ।
सूर्याजीची सिंहगर्जना भय देते कर्णा ॥
’अरे चालला सांगा कोठें सर्व मराठे हो ।
भाला ठेवा भरा बांगडया मग पुढती जा हो ॥
बाप तूमचा मरुनी पडला येथें लढतांना ।
परत जाउनी नरकी ढकला अपुल्या पितरांना ॥
जाउं इच्छितां काय धरोनी अपुल्या दोराला ।
अहो षंढ तो दोर मघांची तुटोनीयां गेला ॥
चाल
धिक्कार शब्द उठले । पुन्हा परतले ।
मराठे भले । घनधोर युद्ध मातले ।
वीरासि वीर तो भिडे । देशार्थ मराठा लढे ।
धमार्थ मराठा लढे । त्यांना घुटके वीर रसाचे स्वतंत्रता पाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१३॥
चौक १४
’अहो धरा तो अधम घातकी मातृघातकी हो ।
चला चला हो त्या ठायाला अन्य विषय राहो ॥
सर्व मराठा लोटे तिकडे घ्याया सूडाला ।
उदयभानु परि अधींच कोणी वर कां पाठविला ॥
त्याच्या रक्तीं भिजवुनि फडका केला झेंडा तो ।
स्वातंत्र्याचा विजयध्वज जो अजुनि तिथें डुलतो ॥
चाल
तानाजिकडे जन वळे । दाटले गळे ।
वाहती जळें । तानाजि कांहींसा उठला ।
जय पाहुनि ’हर हर’ केला । ’देशार्थ मरें मी’ वदला ।
मागुति पडला आतां कैंचा उठतो तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१४॥
चौक १५
मग त्या गडची भूमी ठेवी तानाजिस उदरीं ।
तेव्हां पासुनि रत्नावकर बहु तीचा द्वेष करी ॥
स्वातंत्रतेच्या रणांत लढतां स्वतंत्रतेसाठीं ।
त्या पक्षाचा कैवारी श्री मुरहर जगजेठी ॥
देशाला हो धर्माला हो स्वातंत्र्याला हो ।
बा तानाजी सूर्याजी श्री शिवरायाला हो ॥
धन्य मराठे पुनीत झाले अरि-रुधिर स्नानें ।
आणि ’विनायक’ त्यांच्या नामें यशःसुधापानें ॥
असो समाप्ती छत्रपतीच्या सरस्वतीमाजीं ।
’गड आला परि सिंह चालला’ अमुचा तानाजी ॥
धन्य शिवाजी तो रण गाजी धन्यचि तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥

शिवाजी महाराजांचा पोवाडा - शाहिर: महात्मा ज्योतिबा फुले

 

शिवाजी महाराजांचा पोवाडा - शाहिर: महात्मा ज्योतिबा फुले

चौक १
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥ध्रु०॥
लंगोटयांस देई जानवीं पोषींदा कूणब्याचा । काल तो असे यवनांचा ॥
शिवाजीचा पिता शहाजी पुत्र मालोजीचा । असे तो डौल जहागिरीचा ॥
पंधराशें एकूणपन्नास साल फळलें । जुन्नर तें उदयासी आलें ॥
शिवनेरी किल्ल्यामध्यें बाळ शिवाजी जन्मलें । जिजीबाईस रत्न सांपडलें ॥
हातापायांचीं नखं बोटं शुभ्र प्याजी रंगीलें । ज्यांनीं कमळा लाजिवलें ॥
वरखालीं टिर्याख पोटर्याय गांठी गोळे बांधले । स्फटिकापरि भासले ॥
सान कटी सिंहापरी छाती मांस दुनावलें । नांव शिवाजी शोभलें ॥
राजहौंसी उंच मान माघें मांदे दोंदीलें । जसा का फणीवर डोले ॥
एकसारखे शुभ्र दंत चमकूं लागले । मोतीं लडीं गुंतविलें ॥
रक्तवर्ण नाजूक होटीं हासूं छपिवले । म्हणोन बोबडें बोले ॥
सरळ नीट नाक विशाळ डोळ्या शोभलें । विषादें मृग वनीं गेले ॥
नेत्र तीखे बाणी भवया कमठे ताणीले । ज्यांनी चंद्रा हाटिवलें ॥
सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबलें । कुरळे केंस मोघीले ॥
आजानबाहू पायांपेक्षां हात लांबलेले । चिन्ह गादिचें दिसलें ॥
जडावाचीं कडीं तोडे सर्व अलंकार केले । धाकटया बाळा लेविवलें ॥
किनखाबी टंकोचें मोतीं घोसानें जडलें । कलाबतुचे गोंडे शोभले ॥
लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले । डाग लाळीचे पडलेले ॥
हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे । पायीं घुंगरुं खुळखुळे ॥
मारी पाठोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले । खेळण्यावर डोळे फिरवीले ॥
मजवर हा कसा खेळणा नाहीं आवडले । चिन्ह पाळणीं दिसलें ॥
टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले । पाळण्या हलवूं लागले ॥
धन्य जिजाबाई जिनें जो जो जो जो जो केलें । गातों गीत तिनें केलें ॥
चाल
जो जो जो जो जो जो गाऊ, जी जी जी जी जीजी गाऊं ।
चला वेरुळास जाऊं, दौलताबादा पाहूं ॥
मूळ बाबाजीस ध्याऊं, कीर्ति आनंदाने गाऊं ।
सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधवराऊ ॥
पाटील होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ ।
थोर विठोजी नांव घेऊं, सान मालोजी त्याचा भाऊ ।
दीपाबाई त्यास देऊं, छंदाजोगा गिती गाऊं ॥
चाल
मालोजी राजा । तुझा बा आजा ॥
यवनी काजा । पाळिल्या फौजा ॥
लाविल्या ध्वजा । मारिल्या मौजा ॥
वेळेस मुक्का । साधल्या बुक्का ॥
विचारी पक्का । जाधवा धक्का ॥शेशाप्पा नायका । ठेविचा पैका ।
द्रव्याची गर्दी । चांभारगोंदी ॥
देवळें बांधी । तळीं ती खांदी ॥
आगळी बुद्धि । गुणानें निधि ॥
लिहिलें विधि । लोकांस बोधी ॥
संधान साधी । जसा पारधी ॥
भविषी भला । कळलें त्याला ॥
सांगोनी गेला । गादी बा तुला ॥
चाल
उपाय नाहीं जाणोन चाकर झाला यवनाचा । शिपाई होता बाणीचा ॥
खोटया दैवा कोण खोडी बेत देवाजीचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥१॥
चौक २
वडील बंधु संभाजीनें लळे पुरवीले । धाकटयासवें खेळले ॥
उभयतांचें एक चित्त तालमींत गेले । फरीगदग्या शिकले ॥
आवडीनें खमठोकीं कुस्ती पेंचानें खेळे । पवित्रे दस्तीचे केले ॥
द्वादशवर्षी उमर आली नाहीं मन धालें । घोडी फिरवूं लागले ॥
आट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शीकले । गोळी निशान साधले ॥
कन्या वीर जाधवाची जिनें भारथ लावलें । पुत्रा नीट ऐकविलें ॥
अल्पवयाचे असतां शिकार करुं लागले । माते कौतुक वाटलें ॥
नित्य पतीचा आठव डोंगर दुःखाचे झाले । घर सवतीनें घेतले ॥
छाती कोट करुन सर्व होतें साटिवलें । मुखमुद्रेनें फसविले ॥
चतुर शिवाजीनें आईचें दुःख ताडिले । पित्यास मनीं त्यागिले ॥
पुत्राचे डोळे फिरले माते भय पडलें । हीत उपदेशा योजिलें ॥
मनीं पतिभक्ति पुता बागेमधीं नेलें । वृक्षछायीं बसीवलें ॥
पूर्वजांचे स्मरण करुन त्यास न्याहाळीलें । नेत्रीं पाणी टपटपलें ॥
या क्षेत्राचे धनी कोणकोणी बुडविले । सांगतें मुळीं कसें झालें ॥
क्षेत्रवासी म्हणोन नांव क्षत्रिय धरलें । क्षेत्रीं सुखी राहिले ॥
अन्यदेशिचे दंगेखोर हिमालयीं आले । होते लपून राहिले ॥
पाठीं शत्रु भौती झाडी किती उपासी मेले । गोमासा भाजून धाले ॥
पाला फळें खात आखेर ताडपत्रा नेसले । झाडी उल्लंघून आले ॥
लेखणीचा धड शीपाया सैनापति केलें । मुख्य ब्रह्मा नेमलें ॥
बेफाम क्षत्रिय होते अचूक टोळ उतरले । कैदी सर्वांस केलें ॥
सर्व देशीं चाल त्याचें गुलाम बनीवले । डौलानें क्षुद्र म्हणाले ॥
मुख्य ब्रह्म राजा झाला जानें कायदे केले । त्याचे पुढें भेद केले ॥
ब्रह्मा मेल्यावर परशराम पुंड माजले । उरल्या क्षत्रिया पिडीले ॥महारमांग झाले किती देशोधडी केले । ब्राह्मण चिरंजीव झाले ॥
देश निक्षत्रिय झाल्यामुळें यवना फावलें । सर्वांस त्यांहीं पिडीलें ॥
शुद्र म्हणती तुझ्या हृदयीं बाण टोचले । आज बोधाया फावलें ॥
गाणें गातें ऐक बाळा तुझ्या आजोळीं शिकले । बोलीं नाहीं मन धालें ।
चाल
क्षेत्र क्षत्रियांचें घर, तुझे पितृ माहावीर । सुखा नसे त्यांच्या पार,
आल्या गेल्याचें माहेर ॥ शीखराकार डोंगर, नानावल्ली तरुवर ॥
परीं खोरीं वाहे नीर खळखळे निरंतर । झाडा फुलें झाला भार,
सुगंधी वाहे लहर । पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर ॥
नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार । भूमी अती काळसर,
क्षेत्र देई पीका फार ॥ धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियास मार ।
दास केले निरंतर, ब्रह्मा झाला मनीं गार ॥ लोभी मेले येथें फार, विधवा झाल्या घरोघर ।
उपाय नाहीं लाचार, स्त्रिया वंदी पाटावर ॥ दुसरा झाला शीरजोर, परशा तोबा कठोर ।
मार त्याचा अनीवार, केला क्षत्रियां संव्हार ॥ क्षत्रिय केले जरजर, भये कांप थरथर ।
दुःखा नाहीं त्यांच्या पार, ठाव नाहीं निराधार ॥ बहु केले देशापर, बाकी राहि मांगमाहार ।
निःक्षेत्रीं झाल्यावर, म्लेंच्छें केलें डोकें वर । आले सिंधुनदावर, स्वार्याि केल्या वारोंवार ।
गातें कटावांत सार, लक्ष देई अर्थावर ।
चाल
काबुला सोडी । नदांत उडी ॥
ठेवितो दाढी । हिंदूस पीडी ॥
बामना बोडी । इंद्रियें तोडी ॥
पिंडीस फोडी । देवळें पाडी ॥
चित्रास तोडी । लेण्यास छेडी ॥
गौमांसी गोडी । डुकरां सोडी ॥
खंडयास ताडी । जेजूरी गडी ॥
भुंग्यास सोडी । खोडीस मोडी ॥
मूर्तीस काढी । काबूला धाडी ॥
झाडीस तोडी । लुटली खेडीं ॥
गडास वेढी । लावली शीडी ॥
हिंदूस झोडी । धर्मास खोडी ॥
राज्यास बेडी । कातडी काढी ॥
गर्दना मोडी । कैलासा धाडी ॥
देवळें फोडी । बांधीतो माडी ॥
उडवी घोडी । कपाळा आढी ॥
मीजास बडी । ताजीम खडी ॥
बुरखा सोडी । पत्नीखस पीडी ॥
गायनीं गोडी । थैलीतें सोडी ॥
चाल
माताबोध मनीं हसतां राग आला यवनांचा ।
बेत मग केला लढण्याचा ॥ तान्हाजी मालुसरे बाजी फसलकराचा ।
स्नेह येशजी कंकाचा ॥ मित्रा आधीं ठेवी जमाव केला मावळ्यांचा ।
पूर करी हत्यारांचा ॥ मोठया युक्तीनें सर केला किल्ला तोरण्याचा ।
रोविला झेंडा हिंदूचा ॥ राजगड नवा बांधला उंच डोंगराचा ।
भ्याला मनीं विजापुरचा । दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा ।
दादोजी कोंडदेवाचा ॥ मासा पाणीं खेळे गुरु कोण असे त्याचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा ॥२॥
चौक ३
जाहागीरचा पैसा सारा लावी खर्चास । चाकरी ठेवी लोकांस ॥
थाप देऊन हातीं घेई चाकण किल्ल्यास । मुख्य केले फिङ्‌र्गोजीस ॥
थोडया लोकांसहीत छापा घाली सुप्यास । कैद पाहा केलें मामास ॥
सुप्यासोबत हातीं घेतलें तीनशें घोडयास । करामत केली रात्रीस ॥
मुसलमानां लाच देई घेई कोंडाण्यास । सिंहगड नांव दिलें त्यास ॥
पुरंधरी जाई जसा भला माणूस न्यायास । कैद पाहा केलें सर्वांस ॥
गांव इनाम देऊन सर्वां ठेवी चाकरीस । मारलें नाहीं कोणास ॥
वाटेमधीं छापा घालून लुटी खजीन्यास । सांठवी राजगडास ॥
राजमाचीं लोहगडीं लढे घेई तिकोण्यास । बाकी चार किल्ल्यांस ॥
मावळ्यांस धाडी कोकणीं गांव लुटायास । धूर्त योजी फितूरास ॥
सन्मान कैद्यां देई पाठवि वीजापूरास । मुलान्या सुभेदारास ॥
विजापुरीं मुसलमाना झाला बहु त्रास । योजना केली कपटास ॥
करनाटकीं पत्र पाठवी बाजी घोरपडयास । कैद तुम्ही करा शहाजीस ॥
भोजनाचें निमित्त केलें नेलें भोसल्यास । दग्यानें कैद केलें त्यास ॥
थेट शहाजी कैदी आणिला विजापूरास । खुशी मग झाली यवनास ॥
चिरेबंदी कोठडीमध्यें बंद केलें त्यास । ठेविलें भोक वार्या स ॥
शहाजीला पिडा दीली कळलें शिवाजीस । ऐकून भ्याला बातमीस ॥
पिताभक्ति मनीं लागला लागला शरण जायास । विचारी आपला स्त्रियेस ॥
साजे नांव सईबाई स्त्री सुचवी पतीस । ताडा दंडीं दुसमानास ॥
स्त्रीची सुचना सत्य भासली लिहिलें पत्रास । पाठवी दिल्ली मोगलास ॥
चाकर झालों तुमचा आतां येतों चाकरीस । सोडवा माझ्या पित्यास ॥
मोलग थैली गेली थेट मुसलमानास ठेविले किल्ल्यावर त्यास ॥
बाजी शामराज का लाजला जात सांगायास । धरुं पाही शिवाजीस ॥
धेड म्हणावा नाक नाही द्यावा कोणास । अडचण झाली बखरीस ॥
सिद्धिस बेत गेला नाहीं अंतीं भ्याला जिवास । काळें केलें महाडास ॥
शाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्षीस । हा पाजी मुकला जातीस ॥
करनाटकीं आज्ञा झाली शाहाजीस । यवन भ्याला सिंहास ॥
वर्षे चार झालीं शिवला नाहीं कबजास । पिताभक्ति पुत्रास ॥
चंद्रराव मोर्या स मारी घेई जावळीस । दुसरे वासोटा किल्ल्यास ॥
प्रतापगड बांधी पेशवा केला एकास । नवे योजी हुद्यास ॥
आपली बाकी काढी धाडी पत्र तगाद्यास । चलाखी दावी मोंगलांस ॥
रात्रीं जाऊन एकाएकीं लुटी जुन्नरास । पाठवी गडी लुटीस ॥
आडमाग करी हळूंच गेला नगरास । लुटी हत्तीघोडयांस ॥
उंच वस्त्रे, रत्नेंु होन कमती नाहीं द्रव्यास । चाकरि ठेवि बारगिरांस ॥
समुद्रतीरीं किल्ले घेई पाळी गलबतांस । चाकरी ठेवि पठाणास ॥
सिद्दि पेशव्या आपेश देई घेई यशास । उदासी लाभ शिवाजीस ॥
आबझूलखान शूर पठाण आला वांईस । शोभला मोठा फौजेस ॥
हातीं बारा हजार घोडा त्याचे दिमतीस । कमी नाहीं दारुगोळीस ॥
कारकुनाला वचनीं दिलें हिवरें बक्षीस । फितविलें लोभी ब्राह्मणांस ॥
गोपीनाथ फसवी पठाणा आणि एकांतास । चुकला नाहीं संकेतास ॥
मातेपायीं डोई ठेवी, लपवी इत्यारास । बरोबर आला बेतास ॥
समीप येतां शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास । कमी करी आपल्या चालीस ॥
गोपीनाथ सुचना देई भोळ्या यवनास । भ्याला तुमच्या शिपायांस ॥
वर भेटभाव वाघनख मारीं पोटास । भयभित केलें पठाणास ॥
पोटीं जखम सोसी केला वार शिवाजीस । झोंबती एकमेकांस ॥
हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस । पठाण मुकला प्राणास ॥
स्वामीभक्ती धाव घेई कळले शिपायास । राहिला उभा लढण्यास ॥
त्याची धोप घेई शिवाजी बचवी आपल्यास । तान्हाजी भिडे बाजूस ॥
दांती दाढी चावी तोडी घेई धनी सूडास । घाबरें केलें दोघांस ॥नांव सय्यदबंधू साजे शोभा आणी बखरीस । लाथाळी जीवदानास ॥
तान्हाजीला हूल देई मारी हात शिवाजीस । न्याहाळी प्रेतीं धण्यास ॥
उभयतांसीं लढतां मुकला आपल्या प्राणास । गेला जन्नत स्वर्गास ॥
छापा घाली मारी करी कैद बाकी फौजेस । पठाणपुत्र खाशा स्त्रियेस ॥
चार हजार घोडा लूट कमी नाहीं द्रव्यास । दुसर्याख सरंजामास ॥
अलंकार वस्त्रें देई सर्व कैदी जखम्यांस । पाठवि विजापूरास ॥
वचनीं साचा शिवाजी देई हिवरें बक्षीस । फितुर्या गोपीनाथास ॥
नाचत गात सर्व गेले प्रतापगडास । उपमा नाहीं आनंदास ॥
चाल
शिवाचा गजर जयनामाचा झेंडा रोविला ॥
क्षेत्र्याचा मेळा मावळ्याचा शिकार खेळला ॥
मातेपायीं ठेवी डोई गर्व नाहीं काडीचा ।
आशिर्वाद घेई आईचा ॥ आलाबला घेई आवडता होता जिजीचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा ॥३॥
चौक ४
लढे रांगणीं विशाळगडीं घेई पन्हाळ्यास । केले मग शुरु खंडणीस ॥
रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापूरास । नेमिला कोल्हापूरास ॥
स्वार तीन हजार घेई थोडया पायदळास । आला थेट पन्हाळ्यास ॥
मार देत शिवाजी पिटी कृष्णा पैलतडीस । अती जेर केलें त्यास ॥
खंडणी घेत गेला भिडला विजापूरास । परत मग आला गडास ॥
राजापुर दाभोळ लुटी भरी खजीन्यास । मात गेली विजापुरास ॥
सिद्दी जोहरा नेमी मोठी फौज दिमतीस । सावंत सिद्दी कुमकेस ॥
बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळ्यास । करी मग जमा बेगमीस ॥
वारंवार छापे घाली लुटी भौंती मुलखास । केलें महाग दाण्यास ॥
त्रासानें खवळून वेढा घाली शिवाजीस । कोंडिले गडीं फौजेस ॥
चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढयास । योजना करी उपायास ॥
कोंकणामधीं सिद्दी झोडी रघुनाथास । उपद्रव झाला रयतेस ॥
फासलकर बाजीराव पडले वाडीस । दुःख मग झालें शिवाजीस ॥
सिद्दी जोहरा निरोपानें गोंवी वचनास । खुशाल गेला भेटीस ॥
वेळ करुन गेला उरला नाहीं आवकास । कच्चा मग ठेवी तहास ॥
सिद्दीस लाडी गोडी मधी मान डुकलीस । गेला थाप देऊन गडास ॥
सिद्धया पोटीं खुष्याली जाई झोपीं सावकास । हयगय झाली जप्तीस ॥
तों शिवाजी पळून गेला घेई पाठी रात्रीस । फसविलें मुसलमानास ॥
सिद्दी सकाळीं खाई मनीं लाडू चुरमुर्या्स । स्वार दळ लावी पाठीस ॥
चढत होता खिंड शिवाजी गांठलें त्यास । बंदुका लावी छातीस ॥
बाजीपरभु मुख्य केला ठेवि मावळ्यास । एकटा गेला रांगण्यास ॥
स्वामीला वेळ दिला बाजी भिडला शत्रूस । हरवी नित्य मोगलास ॥
दोन प्रहर लढे वाट दिली नाहीं त्यास । धन्य त्याच्या जातीस ॥
मोठी मोगल फौज दाखल झाली साह्यास । खवळला बाजी युद्धास ॥
अर्धे लोक उरले सरला नाहीं पाउलास । पडला परभू भूमीस ॥तो शिवाजी सुखी पोहंचला कान सुचनेस । अंती मनीं हाच ध्यास ॥
बार गडीं ऐकून सुखी म्हणे आपल्यास । नीघून गेला स्वर्गास ॥
सय्यद मागें सरे जागा देई बाजीरावास । पाहून स्वामीभक्तीस ॥
विजापुरीं मुसलमान करी तयारीस । खासा आला लढण्यास ॥
कराडास डेरे दिले घेई बहू किल्ल्यांस । वश करी चाचे लोकांस ॥
दळव्यासीं लडून घेई शृंगारपुरास । मारलें पाळेगारांस ॥
लोकप्रीतिकरितां करी गुरु रामदासास । राजगडीं स्थापी देवीस ॥
मिष्ट अन्न भोजन दिलें सर्वां बक्षीस । केली मग मोठी मजलस ॥
तानसैनी भले गवय्या बसवी गायास । कमी नाहीं तालस्वरास ॥
चाल
जीधर उधर मुसलमानी । बीसमिलाही हिंमानी ॥
सच्चा हरामी शैतान आया । औरंगजीब नाम लिया ॥
छोटे भाइकूं कैद हूल दिया । बडे भाईकी जान लिया ॥
छोटेकूंबी कैद किया । लोक उसके फितालिया ॥
मजला भाई भगा दिया । आराकानमें मारा गया ॥
सगे बापकूं कैद किया । हुकमत सारी छिनलीया ॥
भाईबंदकूं इजा दिया । रयत सब ताराज किया ॥
मार देके जेर किया । खाया पिया रंग उडाया ॥
आपण होके बेलगामी । शिवाजीकू कहे गुलामी ॥
आपण होके ऐशआरामी । शिवाजीकूं कहे हरामी ॥
बरे हुवा करो सलामी । हिंदवाणी गाव नामी ॥
चाल
आदी आंत न । सर्वां कारण ॥
जन्ममरण । घाली वैरण ॥
तोच तारण । तोच मारण ॥
सर्व जपून । करी चाळण ॥
नित्य पाळण । लावी वळण ॥
भूतीं पाहून । मनीं ध्याईन ॥
नांव देऊन । जगजीवन ॥
सम होऊन । करा शोधन ॥
सार घेऊन । तोडा बंधन ॥
चाल
सरनौबती डंका हुकूम पालेकराचा । घेई मुजरा शाईराचा ॥
सुखसोहळे होतां तरफडे सावंत वाडीचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥४॥
चौक ५
सावंत पत्र लिही पाठवी विजापूरास । मागे फौज कुमकेस ॥
बाजी घोरपडा बल्लोळखान येती साह्यास । शिवाजी करी तयारीस ॥
त्वरा करुन गेला छापा घाली मुधोळांस । मारिलें बाजी घोरपडयास ॥
भाऊबंद मारिलें बाकी शिपाई लोकांस । घेतलें बाप सूडास ॥
सावंताची खोड मोडून ठेवी चाकरीस । धमकी देई पोर्च्युग्यास ॥
नवे किल्ले बांधी डागडुजी केली सर्वांस । बांधिलें नव्या जाहाजास ॥
जळीं सैनापती केले ज्यास भीती पोर्च्युग्यीस । शोभला हुद्दा भंडार्याीस ॥
विजापूरचा वजीर गुप्त लिही शिवाजीस । उभयतां आणलें एकीस ॥
व्यंकोजी पुत्रा घेई शाहाजी आला भेटीस । शिवाजी लागे चरणास ॥
शाहाजीचे सद्‌गुण गाया नाहीं आवकास । थोडेसे गाऊ अखेरीस ॥
सुखसोहळे झाले उपमा लाजे मनास । उणें स्वर्गी सुखास ॥
अपूर्व वस्तू घेऊन जाई विजापूरास । भेट मग देई यवनास ॥
पराक्रमी शिवाजी पाळी पाऊण लक्षास । साजे यवनी स्नेहास ॥
विजापूरचा स्नेह होता लढे मोगलास । घेतले बहूतां किल्ल्यास ॥
सर्व प्रांतीं लूट धुमाळी आणिलें जेरीस । घावरें केलें सर्वांस ॥
संतापानें मोंगल नेमी शाइस्तेखानास । जलदि केली घेई पुण्यास ॥
चाकणास जाऊन दावी भय फिङ्‌र्गोजीस । फुकट मागे किल्ल्यास ॥
मास दोन लढला घेऊन सर्व फौजेस । खान खाई मनास ॥
अखेर दारु घालून उडवी एका बुर्जास । वाट केली आंत जायास ॥
वारोंवार हल्ले गर्दी करुं पाहे प्रवेश । शाइस्ता पठाण पाठीस ॥
मागें पळति सर्व कोणी मानिना हुकूमास । भीति आंतल्या मर्दास ॥
लागोपाठ मार देत हटवि पठाणास । खचला खान हिंमतीस ॥
प्रातःकाळीं संतोषानें खाली केले किल्ल्यास । देई मुसलमानास ॥
फिङर्गोजीला भेट देती खुषी झाली यवनास । देऊन मान सोडी सर्वांस ॥
शिवाजीची भेट घेतां सन्मान दिला त्यास । वाढवी मोठया पदवीस ॥
फिड्‌र्गोजीचें नांव घेतां मनीं होतो उल्हास । पीढीजाद चाकरीस ॥
येशवंतशिंग आले घेऊन मोठया फौजेस । मदत शाईस्तेखानास ॥
सरनौबत भौती लुटी नगरी मुलखास । जाळून पाडिला ओस ॥
पाठी लागून मोंगल भारी त्याच्या स्वारांस । जखमा केल्या नेटाजीस ॥
राजगड सोडून राहीला सिंव्हगडास पाहून मोगलसेनेस ॥
जिजाबाईचें मुळचें घर होतें पुण्यास । खान राही तेथें वस्तीस ॥
मराठयांस चौकी बंदी गांवांत शिरण्यास । होता भीत शिवाजीस ॥
लग्नवर्हाचडी रुपें केला पुण्यांत प्रवेश । मावळे सोबत पंचवीस ॥
माडीवर जाऊन फोडी एका खिडकीस । कळालें घरांत स्त्रीयांस ॥
शाइस्त्यास कळतां दोर लावी कठडयास । लागला खालीं जायास ॥
शिवाजीनें जलदी गांठून वार केला त्यास । तोडीलें एका बोटास ॥
स्त्रिपुत्रां सोडून पळे पाठ दिली शत्रूस । भित्रा जपला जिवास ॥
आपल्या पाठिस देणें उणें शिपायगिरीस । उपमा नाहीं हिजडयास ॥
सर्व लोकांसहित मारिलें खानपुत्रास । परतला सिंहगडास ॥
डौलानें मोंगल भौती फिरवी तरवारीस । दावी भय शिवाजीस ॥
समीप येऊं दिले हुकूम सरबत्तीस । शत्रू पळाला भिऊन मारास ॥
करनाटकी बदली धाडी शाइस्तेखानास । मुख्य केलें माजमास ॥
राजापुरीं जाई शिवाजी जमवी फौजेस । दावी भय पोर्च्यूग्यास ॥
सर्व तयारी केली निघाला नाशिक तीर्थास । हुल कसी दिली सर्वांस ॥
मध्यरात्रीं घेई बरोबर थोडया स्वारांस । दाखल झाला सुर्तेस ॥
यथासांग साहा दिवस लुटी शहरास । सुखी मग गेला गडास ॥
बेदनूराहून पत्र आलें देई वाचायास । आपण बसे ऐकायास ॥
शिपायाचे बच्चे शाहाजी गेले शिकारीस । लागले हरणापाठीस ॥
घोडया ठेंच लागे उभयतां आले जमीनीस । शाहाजी मुकला प्राणास ॥
पती कैलासा गेले कळलें जिजीबाईस । पार मग नाहीं दुःखास ॥
भुमी धडपडे बैसे रडून गाई गुणांस । घेई पुढे शिवाजीस ॥
चाल
अतीरुपवान बहु आगळा । जैसा रेखला चित्री पूतळा ॥
सवतीवर लोटती बाळा । डाग लाविला कुणबी कुळा ॥
सवतीला कसें तरी टाळा । कज्जा काढला पती मोकळा ॥
खर्याा केंसानें कापि का गळा । नादीं लागला शब्द कोकिळा ॥
मूख दुर्बळ राही वेगळा । अती पिकला चिंतेचा मळ ॥
झाला शाहाजी होता सोहळा । मनीं भूलला पाहूनी चाळा ॥
बहुचका घेती जपमाळा । जाती देऊळा दाविती मोळा ॥
थाट चकपाक नाटकशाळा । होती कोमळा जशा निर्मळा ॥
खर्याा डंखिणी घाली वेटोळा । विषचुंबनीं देती गरळा ॥
झाला संसारीं अती घोटाळा । करी कंटाळा आठी कपाळा ॥
मनीं भिऊन पित्याच्या कुळा । पळ काढला गेले मातुळा ॥
छातीवर ठेवल्या शिळा । नाहीं रुचला सवत सोहळा ॥
चाल
कमानीवर । लावले तीर ॥
नेत्रकटार । मारी कठोर ॥
सवदागर । प्रीत व्यापार ॥
लावला घोर । सांगतें सार ॥
शिपाई शूर । जुना चाकर ॥
मोडक्या धीर । राखी नगर ॥
आमदानगर विजापूरकर ॥ मंत्री मुरार ॥
घेई विचार ॥ वेळनसार ।
देई उत्तर ॥ धूर्त चतुर ।
लढला फार ॥ छाती करार ॥
करी फीतूर ॥ गुणगंभीर ।
लाविला नीर ॥ होता लायक ।
पुंडनायक ॥ स्वामीसेवक ।
खरा भाविक ॥
चाल
सिंहगडावर गेला बेत केला क्रियेचा । बजावला धर्म पुत्राचा ॥
रायगडी जाई राही शोक करी पित्याचा । शत्रु होता आळसाचा ॥
दुःखामधीं सुरु बंदोबस्त करी राज्याचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ॥ छत्रपती शिवाजीचा ॥५॥
चौक ६
सर्व तयारी केली राजपद जोडी नांवास । शिक्का सुरु मोर्तबास ॥
अमदानगरीं नटून पस्त केलें पेठेस । भौतीं औरंगाबादेस ॥
विजापूरची फौज करी बहुत आयास । घेई कोकणपट्टीस ॥सावध शिवाजी राजे आले घेऊन फौजेस । ठोकून घेई सर्वांस ॥
जळीं फौज लढे भौती मारी गलबतास । दरारा धाडी मक्केस ॥
माल्वणीं घेऊन गेला अवचित फौजेस । पुकारा घेतो मोगलास ॥
जाहाजावर चढवी फौज गेला गोव्यास । लुटलें बारशिलोरास ॥
जलदी जाऊन गोकर्णी घेई दर्शनास । लुटलें मोंगल पेठांस ॥
पायवाटेनें फौज पाठवी बाकी लुटीस । आज्ञा जावें रायगडास ॥
स्वतां खासी स्वारी आज्ञा लोटा जाहाजास । निघाला मुलखीं जायास ॥
मोठा वारा सुटला भ्याला नाहीं तुफानास । लागले अखेर कडेस ॥
औरंगजीब पाठवी राजा जयशिंगास । दुसरे दिलीरखानास ॥
ठेवले मोगल अमीर येऊन पुण्यास । वेढिलें बहुतां किल्ल्यांस ।
मानकरी शिवाजी घेई बसे मसलतीस । सुचेना कांहीं कोणास ॥
बाजी परभू भ्याला नाहीं दिलीरखानास । सोडिलें नाहीं धैर्यास ॥
हेटकरी मावळे शिपाइ होते दिमतीस । संभाळी पुरंधरास ॥
चातुर्यानें लढे गुंतवी मोगल फौजेस । फुरसत दिली शिवाजीस ॥
फार दिवस लोटले पेटला खान इर्षेस । भिडला किल्लया माचीस ॥
बुर्जाखालीं गेला लागे सुरंग पाडायास । योजी अखेर उपायास ॥
हेटकरी मावळे जाती छापे घालण्यास । पिडीलें फार मोगलास ॥
मोगलाने श्रम केले बेत नेला सिद्धीस । काबीज केलें माचीस ॥
यशस्वी भोसले लागले निर्भय लुटीस । चुकले सावधपणास ॥
हेटकर्यांसचा थाट नी मारी लुटार्यावस । मोगल हटले नेटास ॥
बाजी मावळ्यां जमवी हातीं घेई खांडयास । भिडून मारी मोगलास ॥
मोगल पळ काढी पाठ दिली मावळ्यास । मर्द पाहा भ्याले उंद्रास ॥
लाजे मनीं दिलीरखान जमवी फौजेस । धीर काय देई पठाणास ॥
सर्व तयारी पुन्हा केली परत हल्ल्यास । जाऊन भिडला मावळ्यास ॥
बाजी मार देई पठाण खचले हिमतीस । हटती पाहून मर्दास ॥
पराक्रम बाजीचा पाही खान खोच मनास । लावीला तीर कमानीस ॥
नेमानें तीर मारी मुख्य बाजी परभूस । पाडिला गबरु धरणीस ॥
सय्यद बाजी ताजीम देती घेती बाजूस । सरले बालेकिल्ल्यास ॥
मोगल चढ करती पुन्हा घेती माचीस । धमकी देती मावळ्यास ॥
हेटकरी मारी गोळी फेर हटवि शत्रूस । पळवी इशानी कोणास ॥
वज्रगडाला शिडी लाविली आहे बाजूस । वरती चढवी तोफांस ॥
चढला मोगल मारी गोळे बालेकिल्ल्यास । आणले बहू खराबीस ॥
हेटकरी मावळे भ्याले नाहीं भडिमारास । मोगल भ्याला पाऊसास ॥
मोगल सल्ला करी शिवाजी नेती मदतीस । घेती यवनी मुलखास ॥
कुलद्रोही औरंगजीब योजी कपटास । पाठवि थैली शिवाजीस ॥
शिवाजीला वचन देऊन नेई दिल्लीस । नजरकैद करी त्यास ॥
धाडी परत सर्व मावळे घोडेस्वारांस । ठेविले जवळ पुत्रास ॥
दरबार्यांस घरीं जाई देई रत्नव भेटीस । जोडिला स्नेह सर्वांस ॥
दुखणें बाहाणा करी पैसा भरी हकीमास । गूल पाहा औरंगजीबास ॥
आराम करुन दावी शुरु दानधर्मास । देई खाने फकीरास ॥
मोठे टोकरे रोट भरी धाडी मशीदीस । जसा का मुकला जगास ॥
दानशूर बनला हटवि हातिमताईस । चुकेना नित्यनेमास ॥
औरंगजीबा भूल पडली पाहून वृत्तीस । विसरला नीट जप्तीस ॥
निरास कैदी झाला शिवाजी भास मोगलास । चढला मोठया दिमाखास ॥
पितापुत्र निजती टोकरी बदली रोटास । बाकी सोपी चाकरास ॥
जलदी करीती चाकर नेती टोकरास । करामत केली रात्रीस ॥
दिल्ली बाहेर गेले खुलें केले शिवाजीस । नेली युक्ती सिद्धीस ॥
मोगल सकाळीं विचकी दांत खाई होटांस । लावी पाठी माजमास ॥
चाल
औरंगजीबा धूर दीला । पुत्रासवें घोडा चढला ॥
मधींच ठेवी पुत्राला । स्वतां गोसावी नटला ॥
रात्रिचा दिवस केला । गाठलें रायगडाला ॥
माते चरणीं लागला । हळूच फोडी शत्रूला ॥
स्नेह मोगलाचा केला । दरारा देई सर्वांला ॥
चाल
हैद्राबादकर । विजापूरकर ॥
कापे थरथर । देती कारभार ॥
भरी कचेरी । बसे विचारी ॥
कायदे करी । निट लष्करी ॥
चाल
शिवाजीचा बेत पाहून जागा झाला गोव्याचा । बंदोबस्त केला किल्ल्याचा ॥
वेढा घालून जेर केला सिद्दी जंजिर्याचचा । पवाडा गाती शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥६॥
चौक ७
शिवाजी तों मसलत देई मित्र तान्हाजीला । बेत छाप्याचा सुचवीला ॥
तान्हाजीनें भाऊ धाकटा सोबत घेतला । मावळी हजार फौजेला ॥
सुन्या रात्रीं सिंहगड पायीं जाऊन ठेपला । योजिलें दोर शिडीला ॥
दोरीची शिडी बांधली शिपाई कमरेला । हळुच वर चढवीला ॥
थोडी चाहूल कळली सावध उदेबानाला । करी तयार लोकांला ॥
थोडया लोकांसवें तान्हाजी त्यांवर पडला । घाबरा गडकरी केला ॥
रणीं तान्हाजी पडे मावळे पळती बाजूला । सूर्याजी येऊन ठेपला ॥
धीर मोडक्या देई परत नेई सर्वांला । उगवी बंधू सूडाला ॥
उदेबान मारिला बाकिच्या राजपुत्राला । घेतलें सिंहगडाला ॥
गड हाती लागला तान्हाजी बळी घेतला । झालें दुःख शिवाजीला ॥
सिंहगडीं मुख्य केलें धाकटया सुर्याजीला । रुप्याचीं कडीं मावळ्याला ॥
पुरंधर माहूली घेई वरकड किल्ल्याला ॥ पिडा जंजिरी सिद्दयाला ॥
सुरत पुन्हां लुटी मार्गी झाडी मोगलाला । मोगल जेरदस्त केला ॥
कैद करी शिवाजी बाकी उरल्या फौजेला । त्यांमधीं अनेक स्त्रीयाला ॥
सुंदर स्त्रीया परत पाठवी नाहीं भाळला । लाजवी औरंगजीबाला ॥
सरनौबत वीर पाठवी खानदेशाला । शुरु केलें चौथाईला ॥
जलदी मोगल धाडी मोहबतखानाला । देई मोठया फौजेला ॥
औंढापट्टा घेऊन वेढी साल्हेर किल्ल्याला । धिंगाणा दक्षिणेंत केला ॥
गुजर उडी घाली सामना शत्रूचा केला । मोरोबा पठाण पंक्तीला ॥
लढतां पळ काढी दावी भ्याला मोगलाला । जसा खरा मोड झाला ॥
तों मराठे पळती मोगल गर्वानें फुगला । आळसानें ढिला पडला ॥
गुजर संधी पाहून परत मुरडला । चुराडा मोगलाचा केला ॥
बेवीस उमराव पाडले रणभूमीला । नाहीं गणती शिपायांला ॥
लहान मोठे कैदी बाकी सर्व जखम्यांला । पाठवी रायगडाला ॥
मोगल वेढा झोडून मार देत पिटीला । खिदाडी औरंगाबादेला ॥रायगडीं नित्य शिवाजी घेई खबरेला । गोडबोल्या गोवी ममतेला ॥
एकसारखें औषधपाणी देई सर्वांला । निवडलें नाहीं शत्रुला ॥
जखमा बर्याष होतां खुलासा सर्वांचा केला । राहिले ठेवी चाकरीला शिवाजीची कीर्ती चौमुलखीं डंका वाजला ।
शिवाजी धनी आवडला ॥ मोगल यवनी शिपायी सोडी चाकरीला ।
हाजरी देती शिवाजीला ॥ पोर्च्युग्यास धमकी देई मागे खंडणीला ।
बंदरी किल्ला वेढीला ॥ मधींच इंग्रज भ्याला जपे मुंबै किल्ल्याला ।
बनया धर्मा आड झाला ॥ दिल्लीस परत नेलें सुलतान माजूमाला ।
दुजें मोहबतखानाला ॥ उभयतांचा बदली खानजाहान आला ।
मुख्य दक्षणेचा केला ॥ मोगलाला धूर देऊन लुटलें मुलखाला ।
गोवळकुंडीं उगवला ॥ मोठी खंडणी घेई धाकीं धरी निजामाला ।
सुखें मग रायगडीं गेला ॥ मोगलाचे मुलखीं धाडी स्वार लुटायाला ।
लुटलें हुबळी शहराला ॥ समुद्रकांठीं गावें लुटी घेई जाहाजांला ।
केलें खुलें देसाईला ॥ परळी सातारा किल्ले घेई पांडवगडाला ।
आणिक चार किल्ल्यांला ॥
चाल
हुकूम विजापुरी झाला । सोडिलें बहुत फौजेला ॥
द्यावा त्रास शिवाजीला । घ्यावें त्याचे मुलखाला ॥
शिवाजी सोदी गुजराला । कोंडी आबदुल करीमाला ॥
केला माहग दाण्याला । शत्रु अती जेर केला ॥
आर्जव करणें शिकला । भोंदिलें सैनापतीला ॥
निघून विजापुरीं गेला । क्रोध शिवाजीस आला ॥
रागाऊन लिहिलें पत्राला । निषेधी प्रतापरावाला ॥
गुजर मनांत लाजला । निघून वराडांत गेला ॥
चाल
आबदुल्यानें । बेशर्म्यानें ॥
फौज घेऊन । आला निघून ॥
रावा प्रताप । झाला संताप ॥
आला घाईनें । गांठी बेतानें ॥
घुसे स्वतानें । लढे त्वेषानें ॥
घेई घालून । गेला मरुन ॥
चाल
प्रतापराव पडतां मोड फौजेचा झाला । पाठलाग मराठयाचा केला ॥
तोफ गोळया पोटीं दडती भिडती पन्हाळयाला । गेले नाहीं शरण शत्रूला ॥
अकस्मात हंसाजी मोहिता प्रसंगीं आला । हल्ला शत्रूवर केला ॥
गुजर दल मागें फिरुन मारी यवनाला । पळीवलें विजापुराला ॥
शिवाजीनें हंसाजीला सरनौबत केला । मोठा अधिकार दिला ॥
हंबिरराव पद जोडलें त्याच्या नांवाला । शिवाजी मनीं सुखी झाला ॥
सेनापतीचे गुण मागें नाहीं विसरला । पोशी सर्व कुटुंबाला ॥
प्रतापराव-कन्या सून केली आपल्याला । व्याही केलें गुजराला ॥
काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा । केला खेळ गारुडयाचा ॥
लुटारु शिवाजी सुटला धाक गृह फौजेचा । खर्च नको दारुगोळीचा ॥
बहुरुपी सोंग तूलदान सोनें घेण्याचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥७॥
चौक ८
विश्वासू चाकर नेमी मुलखीं लुटायाला । शिवाजी कोकणांत गेला ॥
छोटे मोठे गड घेई बांधी नव्या किल्ल्याला । जमाव फौजेचा केला ।
गोवळकुंडीं जाई मागुन घेई तोफांला । फितीवलें कसें निजामाला ॥
करनाटकीं गेला भेटे सावत्र भावाला । वाटणी मागे व्यंकोजीला ॥
लोभीं व्यंकोजी हिस्सा देईना बळासी आला । आशेनें फिरवी पगडीला ॥
बंधू आज्ञा मोडून गर्वानें हट्टीं पेटला । बिर्हाेडीं रागाऊन गेला ॥
शिवाजीला राग आला कोट छातीचा केला । कैदी नाहीं केलें भावाला ॥
तंजोर बाकी ठेवी घेई सर्व मुलखाला । खडा कानाला लावला ॥
दासीपुत्र संताजी बंधु होता शिवाजीला । करनाटकीं मुख्य केला ॥
हंबीरराव सेनापती हाताखालीं दिला । निघाला परत मुलखाला ॥
वाटेमधी लढून घेई बिलरी किल्ल्याला । तेथें ठेवी सुमंताला ॥
शिवाजीचे मागें व्यंकोजीने छापा घातला । घेतलें स्वतां अपेशाला ॥
जेर झाला व्यंकोजी देई उरल्या हिश्याला । शिवाजी रायगडीं गेला ॥
विजापूरचा साह्य नेई राजे शिवाजीला । मोगल मुलखीं सोडला ॥
मुलखीं धिंगाणा धुळीस देश मिळीवला । सोडिलें नाहीं पिराला ॥
वाटेमधीं मोगल गांठी राजे शिवाजीला । घाबरा अतिशय केला ॥
भिडला शिवाजी मोगल मागें हाटीवला । वाट पुढें चालूं लागला ॥
दुसरी फौज आडवी माहाराज राजाला । थोडेसें तोंड दिलें तिजला ॥
काळ्या रात्रीं हळुच सुधरी आडमार्गाला । धूळ नाहीं दिसली शत्रूला ॥
फौजसुद्धां पोंहचला पटा किल्ल्याला । फसिवलें आयदि मोगलाला ॥
विजापूरचा आर्जव करी धाडी थैलीला । आश्रय मागे शिवाजीला ॥
हांबीरराव मदत पाठवी विजापुराला । बरोबर देई फौजेला ॥
नऊ हजार मोंगलांचा पराभव केला । त्यांनीं मार्ग अडीवला ॥
विजापुरीं जाऊन जेर केलें मोंगलाला । केला महाग दाण्याला ॥
शत्रूला पिडा होतां त्रासून वेढा काढला । मोगल भिऊन पळाला ॥
दिल्लीचा परत बोलवी दिलीरखानाला । पाठवी शाहाजाहानाला ॥
जलदी करुन शिवाजी वळवी पुत्राला । लाविला नीट मार्गाला ॥
तह करुन शिवाजी नेती विजापुरला । यवन घेती मसलतीला ॥
शिवाजीचें सोंवळें रुचले नाहीं भावाला । व्यंकोजी मनीं दचकला ॥
निरास मनीं होऊन त्यागी सर्व कामाला । निरा संन्यासी बनला ॥
शिवाजीने पत्र लिहिलें बधुं व्यंकोजीला । लिहितों पत्र अर्थाला ॥
वीरपुत्र म्हणवितां गोसावीअ कसे बनलां । हिरा कां भ्याला कसाला ॥
आपल्या पित्याचा ठसा कसा जलदी वीटला । मळावांचून काटला ॥
कनिष्ठ बंधू माझ्या लाडक्या पाठी साह्याला । तुम्ही कां मजवर रुसला ॥
बोध घ्या तुम्ही माझा लागा प्रजापालनाला । त्यागा ढोंगधतोर्यारला ॥
मन उत्तम कामीं जपा आपल्या फौजेला । संभाळा मुळ आब्रूला ॥
कीर्ति तुझी ऐकूं यावी ध्यास माझ्या मनाला । नित्य जपतों या जपाला ।
कमी पडता तुम्ही कळवा माझ्या लोकांला । सोडा मनच्या आढीला ॥
सुभोधाचें पत्र ऐकता शुद्धीवर आला । व्यंकोजी लागे कामाला ॥
शिवाजीला रायगडीं गुडघी रोग झाला । रोगानें अती जेर केला ॥
त्याचे योगें नष्ट ज्वर फारच खवळला । शिवाजी सोसी दुःखाला ॥
यवनीं बिरास भिडतां नाहीं कुचमला । शिवाजी रोगाला भ्याला ॥
सतत सहा दिवस सोसी ताप दाहाला । नाहीं जरा बरळला ॥
सातव्या दिवशीं शिवाजी करी तयारीला । एकटा पुढें आपण झाला ॥
काळाला हूल देऊन स्वतां गेला स्वर्गाला । पडले सुख यवनाला ॥
कुळवाडी मनीं खचले करती शोकाला । रडून गाती गुणांला ॥
चाल
महाराज आम्हासीं बोला । धरला कां तुम्ही अबोला ॥
मावळे गडी सोबतीला । शिपाई केले उघडयाला ॥
सोसिलें उन्हातान्हाला । भ्याला नाहीं पाउसाला ॥
डोंगर कंगर फिरलां । यवन जेरीस आणला ॥
लुटलें बहुत देशांला । वाढवी आपुल्या जातीला ॥
लढवी अचाट बुद्धीला । आचंबा भुमीवर केला ॥
बाळगी जरी संपत्तीला । तरी बेताने खर्च केला ॥
वांटणी देई शिपायांला । लोभ द्रव्याचा नाहीं केला ॥
चतुर सावधपणाला । सोडिलें आधीं आळसाला ॥
लहान मोठया पागेला । नाहीं कधीं विसरला ॥
राजा क्षेत्र्यांमध्यें पहिला । नाहीं दुसरा उपमेला ॥
कमी नाहीं कारस्तानीला । हळूच वळवी लोकांला ॥
युक्तीहनें बचवी जीवाला । कधीं भिईना संकटाला ॥
चोरघस्ती घेईअ किल्ल्याला । तसेंच बाकी मुलखांला ॥
पहिला झटे फितुराला । आखेर करी लढाईला ॥
युद्धीं नाहीं विसरला । लावी जीव रयतेला ॥
टळेना रयत सुखाला । बनवी नव्या कायद्याला ॥
दाद घेईअ लहानसानाची । हयगय नव्हती कोणाची ।
आकृती वामनमुर्तीची । बळापेक्षां चपळाईची ॥
सुरेख ठेवण चेहर्या ची । कोंदली मुद्रा गुणरत्नालची ॥
चाल
भिडस्त भारी । साबडा घरीं ॥
प्रिय मधुरी । भाषण करी ॥
मोठा विचारी । वर्चड करी ॥
झटून भारी । कल्याण करी ॥
आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥
लाडावरी । रागावे भारी ॥
चाल
इंग्लीश ज्ञान होतां म्हणे मी पुत्र क्षेत्र्याचा । उडवी फट्टा ब्रह्मयाचा ॥
जोतीराव फुल्यानें गाईला पुत क्षुद्राचा । मुख्य धनी पेशव्याचा ॥
जिजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥८॥

पोवाडे

प्रतापगडाची झुंज (पोवाडा) –शाहीर विष्णुपंत कर्डक

प्रतापगडाची झुंज
चौक १
धन्य--धन्य शिवाजी भोसला । वीर गाजला ।
राजा शोभला । राष्ट्राला पूर्ण देऊन आधार ।
यवन सत्तेस झुगारुन पार । राज्य मराठयांचे केला विस्तार ॥
विजापुरी भरला दरबार । शिवाजी बंडखोर ।
झाला शिरजोर । वेडी बेगम म्हणे हो सरदार ।
सांगा शिवाजीला कोण धरणार । तयाला बढती थोर मिळणार ॥
पैजेचा मांडिला विडा । करीना कोणी धडा ।
झाला मग खडा । क्रोधान अफझूलखान ।
मराठा शिवाजी सैतान । कायमचा टाकतो मी गाडून ।
पैजेचा विडा उचलून । दरबारी बोलला गर्जून ।
शिवाजीचं मुंडक कापून । विजापूरी येतो घेऊन ।
असं म्हणून शिवाजीवर खान चालला ॥
खेडीच्या-खेडी उध्वस्त करु लागला ।
एक लाख फौज संगतीला । जाळपोळ करीत चालला ।
कापितो गाय रस्त्याला । देवांच्या फोडतो मूर्तीला ॥
जमीनदोस्त करा देवळाला । जुलमाने छळी हिंदुला ।
तुळजापुरी येताच चालून । जात्यात घालून ।
टाकली भरडून भवानी देवीला ॥ पंढरपुरी येताच खान ।
शिरला राऊळात । चक्रीत झाला पाहून नाही देव देवळात ॥
भिऊन पळाला म्हणे मला हा शिवाजीचा देव ॥
शिवाजीची काय कथा, आता मी घेतो त्याचा जीव ॥
क्रोधानं फोडून मग देऊळ । निघून चालला ॥
तळ देऊन येऊन राहिला । वाई गावाला ॥
शिवाजीला निरोप धाडला । तू यावं शरण खानाला ।
ऐकशील जरी या वेळा । तरी देतो जीवदानाला ।
ना तरी मराठा मुलखाला । तुज सहित मिळवीन मातीला ।
असं सांगून शिवाजीकडे । कृष्णाजी भास्कर वकील धाडला ॥
शिवाजीला आधीच देवांचा अर्ज होता गेला ॥
दुर्दशा करुन खानानं छळलं आम्हाला ॥
शिवाजीनं समय पाहून । केलं मान्य खान बोलणं ।
मग तह ठरला मिळून । सडया स्वारीनिशी येऊन ।
एक वीर संगती घेऊन । भेटावं बहु आनंदानं ।
असा बेत नक्की ठरवून । करार करुन । वकील परतला ॥
शिवाजीनें केली तय्यारी पहा त्या वेळा ।
गुढया-तोरणे उभारुन प्रतापगड सजवीला ॥
थोर शोभा केली मंडपाला । पाचूचे मणी खांबाला ।
हिरे माणके मध्य भागाला । गाद्या-गिरद्या तक्कया लोडाला ।
मयूर सिंहासन बसण्याला । इंद्रपुरी जणु वसविली प्रतापगडाला ॥
आघाडीस ठेवला नेताजी । पिछाडीस बाजी । मध्ये तानाजी ।
मराठा फौज बंदोबस्तास । शिवाजी भेट देईल खानास ।
वृत्तांत ऐका पुढील चौकास ॥
चौक २
आहा आहा शिवाजी भोसला । शरण आपणाला ।
कळता यवनाला । हर्षला अफझूलखान ।
बोलू लागला तो गर्वानं । शिवाजीला ठोशात मारिन ॥
शिवाजी डोंगरी उंदिर । लुटारु चोर ।
करुनिया ठार । दावतो यवनांच्या दंडा ।
कापूनिया मराठयांचा तांडा । रोवितो मुस्लीमचा झेंडा ॥
अशा आनंदाच्या लहरीत । प्रताप गडी येत ।
बसता मंडपात । शिवाजी म्हणे मस्त गबर झाला ।
संपत्ती एवढी कुठून त्याला । हिर्‍या मोत्यानं मंडप सजला ।
गुडगुडी तोंडी धरुन सिदीला (बंडाला) सांगे डौलानं ॥
शिवाजीला ठार मारुन । संपत्ती नेतो लुटून ॥
मंडपात खान बैसला , कळले शिवबाला ॥
भवानीचे घेऊन दर्शन । नमून मातेला ।
जाणून काळ वेळेला । अंगभर चिलखत ल्याला ॥
भरजरी पोषाख केला । जिरे टोप शिरी चढविला ।
वाघनखे भरुनी पंजाला ॥ खानाच्या भेटीला ।
सर्जा मंडपामधें आला । आहा आहा शिवाजी पाहून ।
दुष्मनी दिली सोडून । तू दोस्त आजपासून ॥
पतंगाने झडप घालावी जशी ज्योतीला ।
सर्पाने विळखा मारावा जसा मुंगुसाला ॥
तसा खान झडपी तया समयास ।
बगलेत धरुन मानगूट, सुरा खुपसला ॥
शिवाजी शूर भोसला । तोही पुरेपुर कसलेला ।
नव्हता कच्च्या गुरुचा चेला । जिजा आईच दूध प्यायलेला ॥
तो कसचा भितोय खानाला । खानाचे कपट ओळखून ॥
मारा चुकवून । बगल तोडून झाला बाजूला ॥
मग सिंह झडपी जसा मस्त हत्तीला ।
वाघाने धरुन फाडावे जस बकर्‍याला ।
तसा शिवाजीने खानाला । वाघनखे खुपसून पोटाला ।
खानाचा फोडला कोथळा । तो खान आडवा पडला कोसळून ।
बचाव बचाव म्हणून ॥ अल्लाअल्ला म्हणून । प्राण सोडला ॥
सय्यद बंडाने जोराचा वार शिवबावर केला ॥
जिरेटोप तुटून धरणीस खेळू लागला ॥
पाहून राजावर घाला । जिवा महाला होताच बाजूला ।
तात्काळ तुटून पडला । सय्यद बंडाला धाडला खानाच्या भेटीला ॥
जयजयकार डंका गाजला । मराठयांनी हल्ला चढविला ।
रक्ताने प्रतापगड न्हाला । खानाची फौज मारुन ।
केली धूळघाण । यवन हैराण । तया समयाला ॥
खानाचे लाव लष्कर । हत्ती, घोडे स्वार । पायदळ सारं ।
लढुनिया फस्त केले यवनास । विजयाने माळ घातली शिवबास ।
शाहीर कर्डक सांगे कवनात ॥


कल्याणी कल्याणची (पोवाडा) –शाहीर रा.वं.जोशी

चाल
(मर्दानी झाशीची राणी, झाशीची राणी
तिन पालथं घालुन शान, पाजल इंग्रजा पाणी ॥ पोवाडयाची )
कल्याणचा खजीना लुटुनी, आणला आबाजींनी,
शूर सेनानी (शूर सेनानी)
अर्पिली भेट राजाला मोठया प्रेमानी ।
लावण्य अती, सुंदरी रुपाची खाणी ॥ (जी जी जी)
सुभेदार सून यावनी, पाहिली शिवबानी, निघाली वाणी (निघाली वाणी)
ही अशीच असती दिव्यरुप मम जननी ।
मी असाच सुंदर दिसतो ना शोभुनी ।
आबाजी सोनदेव यांनी, बोल ऐकूनी, मोठया शरमेनी,
खालच्या मानी (खालच्या मानी)
बोलले शिवाजी बोधरुप शब्दांनी । मानावी परस्त्री माता आणि भगिनी ॥
चाल
टकमका पाही दरबार ऐकूनी वचना ।
शिवराय सांगती आवर्जुनि सर्वांना ॥
राहू या अभय राज्यात गोरगरीबांना ।
गोब्राह्मण, अबला रक्षण आपुला बाणा ॥
हटविण्या लढाई जुलमी परकीयांना ।
गृही शिरुन झाले वैरी त्या शत्रूंना ॥
नांदवू सुखाने गरीब मुस्लीमांना ।
कळीकाळ परंतु जुलमी सरदारांना ॥
द्यावया तडाखा मोगल साम्राज्यांना ।
लुटतात प्रजेला दीन दहाडे त्यांना ॥धर्माचे नावावरती छळणार्‍यांना ।
स्वर्गात पाठवू माथेफिरु सैताना ॥
जाहला दंग दरबार ऐकुनी वचना ।
हा राजा नाही देव वाटे सर्वांना ॥
कल्याणचा अहमद मुला, म्हणे अल्ला अल्ला, ये कैसा झाला ।
तोंडातुनी काढी बोटाला, शेरान सोडल बकरीला आदमी झाला
असा प्रकार नव्हता पाहिला, अचंमित झाला, धीर वाटला सूनबाईला,
तिने सुटकेचा श्वास टाकीला--जी जी जी
अदबीन बुरखा ओढला-थरका थांबला ।
आनंद मनी झाला । नमन राजाला--प्रत्यक्ष जणू भेटला कृष्ण द्रौपदीला ॥
कल्याणी सुन खरोखर, होती सुंदर, रुप मनोहर,
मदनिका चमके जणू बिजली । राजाला भूक नाही पडली ।
मोहिनी दूर झणी सारली ॥जी जी जी॥
संयमी शिव भूपानं, मोठया प्रेमानं, केला सन्मान,
स्त्री जातीचा राखला मान, बाणा मराठयांचा पूर्ण अभिमान
उच्च आदर्श घातले छान ॥जी जी जी॥
आबाजीला सुटल फर्मान, देऊनी मान, वस्त्र भूषण, खणनारळान
ओटी भरुन करा बोळवण ॥जी जी जी॥
नीतीमान श्रेष्ठ झाला राजा, शिवाजी सजा, करावी पूजा,
दिव्य आदर्श ज्याने मांडले, मराठा ब्रीद गौरविले,
सार्‍या जगतात नाव गाजले ॥जी जी जी॥
चाल
सुभेदार मग गहिवरले तो पाहुनी सन्मान
बंदीतुनही त्याला सोडला होता राजानं
कुर्निसात मग करुन बोलला ठेवा राजे ध्यान
जन्मभर मी नाही विसरणार तुमचे अहेसान
शिवरायांनी मान डोलवुनी सांगितले शब्द
यवन तुम्ही जरी असला आमुच्या ठायी नसे भेद
परधर्माचा द्वेष नसे पण, स्वधर्माची जिद्द
जुलमीयांचे पारिपत्य करण्यासि असे सिद्ध
अत्याचार अन् अन्यायाने आम्ही होतो क्षुब्ध
महाराष्ट्राचे स्वराज्य निर्मावया कटीबद्ध
जागला मराठा आज, मराठा आज (मराठा आज) चढला नवा साज,
विजयाचे चढवू आता मस्तकी ताज
त्वेषाने बोलले छत्रपती शिवराज
कल्याणचे सुभेदाराला, निरोप एक दिला, संदेश दिला (संदेश दिला)
मेलेल्या आईचे दूध शिवाजी न प्याला ।
मावळा मराठा आज उभा राहिला--जी जी
चाल
सांगा जा बादशहाला हा निरोप आमुचा खास
हे लचके तोडायाची सोडावी आता आस
जाहली देवळे नष्ट होतात देवता भ्रष्ट
धेनू ब्राह्मण ओरडती धर्मावरती संकट
न्याय नीती उरली नाही, सारेच भोगती कष्ट
जा, सरली तुमची सद्‌दी, द्या सांगुन आता स्पष्ट
ईंटका जवाब पथ्थरसे देण्यास जाहले सिद्ध
चालणार नाही आता अन्याय,जाहली हद्द
आमुचेच वैभव लुटुनी आमुच्याच दाती तृण
मेंढरे बनवूनी आम्हा हाकण्या निघाले कोण ?
गांजलो दडपशाहीने सारेच जाहले दीन
दारिद्रय दुःख कष्टांनी आपलाच पुरता शीण
माघार न आता घेणे हे चक्र थांबल्यावीण
दिल्लीहूनी आला कोणी सरदार जरी चालून
हा लढा न थांबण्याचा स्वातंत्र्य घेतल्यावीण
ही घौडदौड ही स्वारी त्याचीच ओळखा खूण
सुभेदार जाहला स्तब्ध, होऊन हतबुद्ध, बने निःशब्द,
डोलुनी मान-खाली वाकला, कुर्निसात करुनी राजाला,
पाहुनी वरती आभाळाला हात वर करुन काही बोलला,
खालच्या मानी घरी परतला जी-जी-जी ॥
संपला भव्य दरबार, घुमला सभोवार, जय जयकार,
राजे मग झाले घोडयावर स्वार, डोई मंदील पायी सुरवार,
शोभे हातात भवानी तरवार ॥जी-जी-जी॥
महाराष्ट्र आशेचा दीप, शोभला खूप,
श्री शिवभूप भोसले कुलभूषण की जय,
श्री शिवछत्रपती की जय, जय जय महाराष्ट्र की जय हो ॥जी-जी

कल्याणी कल्याणची (पोवाडा) –शाहीर रा.वं.जोशी

चाल
(मर्दानी झाशीची राणी, झाशीची राणी
तिन पालथं घालुन शान, पाजल इंग्रजा पाणी ॥ पोवाडयाची )
कल्याणचा खजीना लुटुनी, आणला आबाजींनी,
शूर सेनानी (शूर सेनानी)
अर्पिली भेट राजाला मोठया प्रेमानी ।
लावण्य अती, सुंदरी रुपाची खाणी ॥ (जी जी जी)
सुभेदार सून यावनी, पाहिली शिवबानी, निघाली वाणी (निघाली वाणी)
ही अशीच असती दिव्यरुप मम जननी ।
मी असाच सुंदर दिसतो ना शोभुनी ।
आबाजी सोनदेव यांनी, बोल ऐकूनी, मोठया शरमेनी,
खालच्या मानी (खालच्या मानी)
बोलले शिवाजी बोधरुप शब्दांनी । मानावी परस्त्री माता आणि भगिनी ॥
चाल
टकमका पाही दरबार ऐकूनी वचना ।
शिवराय सांगती आवर्जुनि सर्वांना ॥
राहू या अभय राज्यात गोरगरीबांना ।
गोब्राह्मण, अबला रक्षण आपुला बाणा ॥
हटविण्या लढाई जुलमी परकीयांना ।
गृही शिरुन झाले वैरी त्या शत्रूंना ॥
नांदवू सुखाने गरीब मुस्लीमांना ।
कळीकाळ परंतु जुलमी सरदारांना ॥
द्यावया तडाखा मोगल साम्राज्यांना ।
लुटतात प्रजेला दीन दहाडे त्यांना ॥धर्माचे नावावरती छळणार्‍यांना ।
स्वर्गात पाठवू माथेफिरु सैताना ॥
जाहला दंग दरबार ऐकुनी वचना ।
हा राजा नाही देव वाटे सर्वांना ॥
कल्याणचा अहमद मुला, म्हणे अल्ला अल्ला, ये कैसा झाला ।
तोंडातुनी काढी बोटाला, शेरान सोडल बकरीला आदमी झाला
असा प्रकार नव्हता पाहिला, अचंमित झाला, धीर वाटला सूनबाईला,
तिने सुटकेचा श्वास टाकीला--जी जी जी
अदबीन बुरखा ओढला-थरका थांबला ।
आनंद मनी झाला । नमन राजाला--प्रत्यक्ष जणू भेटला कृष्ण द्रौपदीला ॥
कल्याणी सुन खरोखर, होती सुंदर, रुप मनोहर,
मदनिका चमके जणू बिजली । राजाला भूक नाही पडली ।
मोहिनी दूर झणी सारली ॥जी जी जी॥
संयमी शिव भूपानं, मोठया प्रेमानं, केला सन्मान,
स्त्री जातीचा राखला मान, बाणा मराठयांचा पूर्ण अभिमान
उच्च आदर्श घातले छान ॥जी जी जी॥
आबाजीला सुटल फर्मान, देऊनी मान, वस्त्र भूषण, खणनारळान
ओटी भरुन करा बोळवण ॥जी जी जी॥
नीतीमान श्रेष्ठ झाला राजा, शिवाजी सजा, करावी पूजा,
दिव्य आदर्श ज्याने मांडले, मराठा ब्रीद गौरविले,
सार्‍या जगतात नाव गाजले ॥जी जी जी॥
चाल
सुभेदार मग गहिवरले तो पाहुनी सन्मान
बंदीतुनही त्याला सोडला होता राजानं
कुर्निसात मग करुन बोलला ठेवा राजे ध्यान
जन्मभर मी नाही विसरणार तुमचे अहेसान
शिवरायांनी मान डोलवुनी सांगितले शब्द
यवन तुम्ही जरी असला आमुच्या ठायी नसे भेद
परधर्माचा द्वेष नसे पण, स्वधर्माची जिद्द
जुलमीयांचे पारिपत्य करण्यासि असे सिद्ध
अत्याचार अन् अन्यायाने आम्ही होतो क्षुब्ध
महाराष्ट्राचे स्वराज्य निर्मावया कटीबद्ध
जागला मराठा आज, मराठा आज (मराठा आज) चढला नवा साज,
विजयाचे चढवू आता मस्तकी ताज
त्वेषाने बोलले छत्रपती शिवराज
कल्याणचे सुभेदाराला, निरोप एक दिला, संदेश दिला (संदेश दिला)
मेलेल्या आईचे दूध शिवाजी न प्याला ।
मावळा मराठा आज उभा राहिला--जी जी
चाल
सांगा जा बादशहाला हा निरोप आमुचा खास
हे लचके तोडायाची सोडावी आता आस
जाहली देवळे नष्ट होतात देवता भ्रष्ट
धेनू ब्राह्मण ओरडती धर्मावरती संकट
न्याय नीती उरली नाही, सारेच भोगती कष्ट
जा, सरली तुमची सद्‌दी, द्या सांगुन आता स्पष्ट
ईंटका जवाब पथ्थरसे देण्यास जाहले सिद्ध
चालणार नाही आता अन्याय,जाहली हद्द
आमुचेच वैभव लुटुनी आमुच्याच दाती तृण
मेंढरे बनवूनी आम्हा हाकण्या निघाले कोण ?
गांजलो दडपशाहीने सारेच जाहले दीन
दारिद्रय दुःख कष्टांनी आपलाच पुरता शीण
माघार न आता घेणे हे चक्र थांबल्यावीण
दिल्लीहूनी आला कोणी सरदार जरी चालून
हा लढा न थांबण्याचा स्वातंत्र्य घेतल्यावीण
ही घौडदौड ही स्वारी त्याचीच ओळखा खूण
सुभेदार जाहला स्तब्ध, होऊन हतबुद्ध, बने निःशब्द,
डोलुनी मान-खाली वाकला, कुर्निसात करुनी राजाला,
पाहुनी वरती आभाळाला हात वर करुन काही बोलला,
खालच्या मानी घरी परतला जी-जी-जी ॥
संपला भव्य दरबार, घुमला सभोवार, जय जयकार,
राजे मग झाले घोडयावर स्वार, डोई मंदील पायी सुरवार,
शोभे हातात भवानी तरवार ॥जी-जी-जी॥
महाराष्ट्र आशेचा दीप, शोभला खूप,
श्री शिवभूप भोसले कुलभूषण की जय,
श्री शिवछत्रपती की जय, जय जय महाराष्ट्र की जय हो ॥जी-जी-जी॥


स्वराज्याचे तोरण (पोवाडा) –शाहीर पिराजी सरनाईक

आई जिजाई वंदन माझे तुझिया चरणाला ।
तुझ्याच पोटी वीर शिवाजी आला जन्माला ॥
होम देहाचा ज्याने केला स्वदेश कार्याला ।
असो शाहिरी मुजरा माझा श्रीशिवरायाला ॥
गद्य
(युगायुगात भूतलावरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो;
त्याप्रमाणे शिवाजी हा अवतारी महापुरुष होता.)
छत्रपति शिवाजी वीर । पराक्रमी धीर ।
खरा झुंझार । हिंदी स्वराज्य स्थापाया खास ।
स्वराज्याच बांधल तोरण तोरण्यास ।
ऐका हा स्फूर्तिदायक इतिहास ॥
विजापूरचे यवन माजले । वर्चस्व आपले ।
गाजवू लागले । न्याय नाही अन्यायाचा बाजार ।
साधुसंतांची विटंबना फार । वैतागुन गेली जनता अनिवार ॥
चाल : बाणा मर्दानी
शिवरायाचे वडील शहाजी राजे समयाला । विजापूरी होते नोकरीला ॥
त्यांनी नेले विजापूरी या बाल शिवाजीला । बादशाही दरबार पहाण्याला हो ॥
चाल : कटाव
विजापुरी बाल शिवाजीला । भलभलता प्रकार दिसला ।
कोण मानीत नाही कोणाला । माणुसकी नाही माणसाला ॥
हे कळता सर्व शिवबाला । येऊन परत पुण्याला ।
हिंदवीराज्य स्थापण्याचा निश्चय केला । आई जिजाईने दिला आशिर्वाद शिवबाला ॥
विजापूरच्या यवनी सत्तेला शह देण्याला । त्यांच्या ताब्यातील घेऊन तोरणा किल्ला ॥
स्वराज्याच तोरणा बांधण्याचा मनसुबा केला ॥
मिळवणी
कानद खोर्‍यात तोरणा किल्ला । दरवाजे पाहा ।
दोहो बाजूला । एक पुण्याच्या उत्तरेला ।
बिनीदरवाजा म्हणती याला । कोकण दरवाजा पश्चिमेला ॥
सह्याद्रीच्या कडे पठारात । दर्‍याखोर्‍यांत ।
वाडया वस्त्यात । स्वराज्याच महत्व पटवून सर्वांस ।
शेकडो मावळे बाल शिवबास । येऊन मिळाले साह्य करण्यास ॥
चाल : जी जी जी
त्यांत बाजी तानाजी फिरंगोजी नरसाळा ।
एकाहुन एक मावळा घेऊन शपथेला ।
शिवाजीच्या हुकमती खाली उभा राहिला ॥
गद्य
(यावेळी उत्तरेकडे बलाढय मोगलशाही, दक्षिणेकडे विजापूरची आदिलशाही, पूर्वेकडे अहमदनगरची निजामशाही, पश्चिमेकडे पोर्तुगीज व सिद्धी इतक्याशी मुकाबला करुन स्वराज्य स्थापणं सोपं नव्हतं पण ती जिद्द आणि महत्वाकांक्षा शिवबाच्या रोमरोमांत भरली होती म्हणूनच---)
कटाव
वंदन करुन भवानीला । जिंकाया तोरणा किल्ला ।
शेदोनशे मावळे संगतीला । शिवराय घेऊन चालला ।
अंधार्‍या रात्री किल्ल्याचा तळ गाठला । किल्ल्यावर चढून जाण्याला ।
मारुनीया मेखा बुरजाला । पागोटे बांधिले त्याला ।
हा हा म्हणता मावळा चढून वरती गेला । गर्जना केली हरहर महादेव बोला ॥
गद्य
(अचानक आलेल्या हल्ल्यापुढे तोरणा किल्ल्यावरील किल्लेदार गोंधळून दोन्ही हात वर करुन उभा राहिला. तोच शिवाजीने किल्लेदाराला घेराव घालताच-----)
कटाव
किल्लेदार शरण आला । बिनशर्त तोरणा किल्ला ।
शिवबाच्या स्वाधीन केला । यावेळी पंधरावे वर्ष होते शिवबाला ॥
चाल : कोल्हापूरचा शाहीर
तोरणा किल्ल्यावरती पहिला बिनी दरवाज्याला ।

महाराष्ट्राचा विजयी भगवा झेंडा फडकला ॥
मिळवणी
स्वराज्याच बांधलं तोरण । तोरणा जिंकून ।
शिवाजी राजानं । सारा सह्याद्री गर्जत उठला ।
जय शिवाजी राजा आपला । शाहीर पिराजीचा मुजरा त्याला ॥



Website Security Test