Thursday, February 28, 2013

शिवराय छत्रपती आमुचा

  शिवराय छत्रपती आमुचा
निधडया छातीचा
शूर बाण्याचा
प्रणेता महाराष्ट्र धर्माचा..... जी जी
जाहला संत श्रीमंत
राजा कुळवंत
गुणी गुणवंत
झाला ना दुजा आजपर्यंत... जी जी
राजाचे रूप देखणे
कसे चालणे
कैसे बोलणे
झुकावी नजर, मान गर्वाने ... जी जी
जलदुर्ग भले बांधले
गडा निर्मिले
मर्द मावळे
मराठे अवघेची मिळविले .... जी जी
युद्धात गनिमी कावा
लढे तो छावा
जाणुनी भावा
यवन मग करीत अल्लाचा धावा .....जी जी
परस्त्री मातेसम मानिली
दिली सावली
कदर दाविली
करून सन्मान लाज राखली ....जी जी
न्याय नीती कठोर निष्ठुर
असो सरदार
आप्त वा पुतर
सजा ना कुणालाच चुकणार ....जी जी
जीवा,शिवा,बाजी तानाजी
लाउनि बाजी
झाले रणगाजी
जखम परी काळजाची ताजी ....जी जी
राजाची नजर पारखी
कुणा पालखी
समस्ता राखी
वाढली कीर्त तीनही लोकी ... जी जी
आई भवानीची तलवार
शत्रूवर वार
करून बेजार
झुंजला राजा अपरंपार ...जी जी
शक्ती ,युक्ती ,राजकारण
धर्म रक्षण
देव ब्राम्हण
राजा झाला शिव कल्याण .... जी जी
शिवराय नृपती तो धन्य
त्रिलोकी मान्य
दुजा न अन्य
होऊया त्याचे चरणि अनन्य ...जी जी

सुनिता जोशी -पनवेल
-----------------------------------------------------------
फेसबुक वरही भेट द्या:-प्रवास गडांचा

Wednesday, February 13, 2013

पट्टागड किल्ला


पट्टागड किल्ला Pattagad Fort- ४५६२ फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
नाशिक जिल्ह्यातीलकळसूबाई डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी थळघाटाच्या पूर्वेकडे जाते याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढ, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. अलंग, मदन, कुलंग येथे असणारे घनदाट जंगल, दुर्गमवाटा यामुळे येथील किल्ल्यांची भटकंती फारच अवघड आहे तर औंढ, पट्टा, या परिसरातील भ्रमंती फारच सोपी आहे. पट्टा किल्ल्याचेच दुसरे नाव विश्रामगड असे देखील आहे.
इतिहास : पट्टागड शिवाजी महाराजांनी इ.स. १६७१ मध्ये जिंकून घेतला. पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक मोठे पठारचआहे. येथून अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई, त्रिंबकगड हा सर्व परिसर नजरेत भरतो, या सर्व परिसरावर नजर ठेवण्यासाटी या किल्ल्यांचा उपयोग होत असे. शिवरायांनी हा किल्ला जिंकला आणि याचे नामकरण ‘विश्रामगड’ असे केले. जालानापूरची तूट केल्यानंत्र शिवाजी महाराजांनी काही काळ या किल्ल्यावर घालवला. पुढे इ.स. १६८६ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता. १६८२ साली औरंगजेबाने महाराष्ट्रात पदार्पण केले आणि मराठी मुलूख ताब्यात घेण्यास सुरवात केली. १६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती. पट्टागडा संबंधी मातबरखान औरंगजेबाकडे अर्ज पाठवतो त्या तो म्हनतो सेवकाने काही दिवसांपासून १००० कोळी, भिल्ल, व मावळे यांचे पथक सैन्यात घेतले आहे. मराठ्यांच्या ताब्यात असलेले पट्टा व इतर किल्ल्यालगतच्या जमीनदारांना रकमा पुरवण्यात आल्या आहेत. ११ जानेवारी १६८८ला खानाने काही पथके किल्ला घेण्याच्या मार्गावर धाडली. मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग याची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. मोगलांनी १६८८ ते ८९ या कालावधीत मराठ्यांचे औंढा, त्रिंबकगड, कवनी, त्रिंगलवाडी, मदनगड, मोरदंत किल्ले फितुरीने घेतले मात्र पट्टागड त्यांना जिंकून घ्यावा.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. औंढा किल्ल्याकडून येणाऱ्या वाटेने किल्लावर पोहोचल्याअर (वाट२) समोरच पाण्याचे एक टाके लागते. पाण्याच्या टाक्यापासून दोन वाटा निघतात. एक डावीकडे तर दुसरी उजवीकडे. उजवीकडच्या वाटेने पुढे गेल्यावर थोड्याच अंतरावर पाण्याचे टाके आहे. उजवीकडच्या माथ्यावर आता काहीच शिल्लक नाही म्हणून भिंती आणि छप्पर अजूनही शिल्लक आहे. समोरच किल्ल्याची आडवी तटबंदी आहे. तटबंदीच्या वरच्या भागावर दोन मोठ्या गुहा आहेत. समोरच सात पाण्याची टाकी आहेत. गुहा रहाण्यासाठी उत्तम आहेत. तटबंदीच्या खालच्या बाजूला गेल्यावर अष्टभुजा देवीचे मंदिर लागते. या मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्वार केला आहे. मंदिराच्या समोरच उत्तममुखी दरवाजा दिसतो. त्याची कमान आजही शाबूत आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूला बुरूज आहे. मंदिर आणि बुरुजाच्या खालच्या बाजूस उतरलं की दोन गुहा लागतात. एका गुहेमध्ये साधूचे वास्तव्य आहे. तर दुसऱ्या गुहेत अलीकडेच गावाचा दवाखाना आहे. येथून खाली जाणारी वाट पट्टावाडीत जातो. संपूर्ण गडमाथा फिरण्यास४ तास पुरतात.
गडावर जाण्याच्या वाटा :
इगतपुरी -घोटी -मार्गे टाकेद : इगतपुरी -घोटी मार्गे टाकेद गाव गाठावे. टाकेद पर्यंत पोहचण्यास १ तास लागतो. टाकेद वरून कोकणवाडी या वाडी पर्यंत जीपसेवा उपलब्ध आहे. टाकेद ते कोकणवाडी हे अंतर पाऊण तासाचे आहे. कोकणवाडीला येण्यासाठी दुसरी वाटा एकदरा गावातून सुद्धा जाते. टाकेदच्या पुढेच हे एकदरा गाव आहे. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अर्ध्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. पट्टावाडी हे गाव मुळातच डोंगराच्या पठारावर बसलेले आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्यास वाट आहे. गावातून किल्ल्याचा माथा गाठण्यास अर्धा तास पुरतो.
इगतपुरी -भगूर अबसने कडवा कॉलनी : दुसरी वाट औंढ किल्ल्याकडून येते. इगतपुरी-भगूर बसने कडवा कॉलनी गाठावी. कडवा कॉलनी पासून निनावी गावात यावे. निनावी गावात औंढ किल्ल्याची डोंगरसोंड खाली उतरलेली आहे. याअरून वर चढून गेल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. पठारावरून उजवीकडची वाट पकडावी. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर आपण औंढ्याच्या पायथ्याशी पोहोचतो. या किल्ल्याच्या पायथ्याशी वाट दुभागते. उजवीकडची वाट औंढ किल्ल्यावर जाते तर, सरळवाट पट्टा किल्ल्याकडे जाते. या वाटेने पुढे गेल्यावर एक खिंड लागते. या खिंडीतून पुढे गेल्यावर समोरच पठार लागते. पठारावर देवीचे एक मंदिर आहे. मंदिराच्या मागून जाणारी वाट पुढे दुभागते. डावीकडची वाट पट्टावाडीत जाते तर सरळ डोंगरसोंडेवर चढणारी वाट वीस मिनिटात एका कातळकड्या पर्यंत पोहचते. कातळकड्याच्या डावीकडची वाट कड्याला चिकटूनच पुढे जाते. सुमारे २० मिनिटांत आपण दोन डोंगराच्या मध्ये जाते. समोरच पट्ट्याची तटबंदी आहे. वाटेतच एक पाण्याचे टाके लागते.
किल्ल्यावर दोन मोठ्या गुहा आहेत. गुहेमध्ये ५० जणांची राहण्याची सोय होते. व पट्टावाडीत सुद्धा राहण्याची सोय होते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी लागते.किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत. गडावर जाण्यासाठी पट्टावाडीतून अर्धा तास लागतो.

--------------------------------------------
फेसबुक वरही भेट द्या :-प्रवास गडांचा
--------------------------------------------

Sunday, February 3, 2013

नरनाळा

अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर तो पसरलेला आहे.अकोल्या पासुन याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट व्याघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्या पासून गडावर जाण्याकरिता आता गाडीवाट आहे. तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात. पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास परवानगी नाही.

भौगोलिक माहिती


गड जमीनीपासून ३१६१ फुट उंच आहे. गडाचा विस्तार हा ३८२ एकर असून गडाच्या कोटाची (तटबंदी) लांबी २४ मैल आहे. एकूण दोन लहान व एक मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुदा महाराष्ट्रातील सर्वात विर्स्तीण गिरीदुर्ग असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखल्या जात असून तेलीयागड आणि जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व-पश्चिमेला आहेत.

किल्ल्याबद्दल

गडाच्या प्रवेशाला पाच दरवाजे लागतात त्यांवरून या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना यावी. सर्वात आधी शहानुर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा, असे करीत आपण गडावर पोहचतो. गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विर्स्तीण जलाशय आहे. याला बारमाही पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणाला कुत्रा चावल्यास त्याने या तलावात स्नान करून येथील दर्ग्यावर गुळफुटाने वाहावे व तडक गड उतरावा. तसेच गड उतरताना मागे वळून पाहू नये, असे मानतात.

पाहण्यासारखी ठिकाणे

गडावर आजही राणी महाल व बाजूची मस्जिद अस्तित्वात आहे. त्या समोरचा सभामंडप आता नसला तरी त्याचे स्तंभ त्याच्या विस्ताराचे भान करून देतात. सरळ पुढे गेल्यास तेला- तूपाचे टाके लागतात. खोल टाक्या असून त्यात विभागणी केलेली आहे; आणि त्यांना युध्दकाळात तेल-तूप साठवण्यासाठी वापरल्या जात असे.

गडाच्या तटाच्या बाजूने फिरत गेल्यास थोड्या अंतरावर 'नऊगजी तोफ' दिसते. ही तोफ अष्टधातुची असून इमादशहाच्या काळात गडावर आणल्या गेल्याचे बोलले जाते. तोफेवर पारशीत लेख कोरलेला आहे. तोफेचे तोंड गडपायथ्याच्या शहानुर गावाकडे रोखलेले आपणास लक्षात येते. बाजूला खूप खोल असे चंदन खोरे आहे. या खोर्यात चंदन व साग झाडांची फार दाट पसरण आहे.


ऐतिहासिक महत्व

गड नेमका कुणी आणि कोणत्या काळात बांधला या बाबत नक्की माहिती नाही पण स्थापत्य व ऐतिहासिक पुराव्या वरून हा गड 'गोंड राजांनी' बांधला असल्याचे बोलले जाते. गडावर नागपूरकर भोसले कालीन तुळशी वृंदावन व हनुमान मंदिर आहे. गडावर राम तलाव व धोबी तलाव यांसहित २२ तलाव आहेत. गडाला ६४ बुरूज आहेत. भक्कम तटबंदी व दुर्गम पहाडी यांच्या सहीत हा दुर्ग सातपुड्याच्या दारावर उभा राहून उत्तरेकडून विशेषतः माळव्यातुन येणा-या आक्रमणांना तोंड देत झुंजला असेल. या गडावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
Website Security Test