Sunday, February 28, 2016

जावळीचे मोरे प्रकरण- उत्तरार्ध



जावळीचे मोरे प्रकरण- उत्तरार्ध
एकीकडे शिवाजी महाराजांचे स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत होते, अश्या परिस्थितीत जावळीकर चंद्ररावाला एकतर शिवाजीराजांचे प्रभुत्व मान्य करावे लागणार अथवा पुढे कधीनाकधी या दोघांमध्ये वितुष्ट येणार हे उघड होते. या मोऱ्यांनी महाडपासून महाबळेश्वरपर्यंतचा डोंगरी भाग व बहुतेक सातारा विभाग काबीज केला होता. कोकण व घाटमाथा यावरील सर्व रस्तेही मोऱ्यांच्या ताब्यात होते.या कारणांमुळेच महाराजांचे जावळीकडे प्रारंभापासून लक्ष होते.

इस १६४७ मध्ये माणकाईने दत्तक घेतलेल्या चंद्ररावास शिवाजी महाराजांनी जावळीच्या गादीवर बसण्यात मदत केली होती हे आपण मागील प्रकरणात पहिले.ते यासाठीच की या उपकारामुळे जावळीकर मोरे हे आपले मित्र होतील व हिंदवी स्वराज्य-संवर्धनात त्यांच्याकडून सहकार्य प्राप्त होईल.परंतु लवकरच चंद्ररावाने महाराजांशी उघड शत्रुत्व आरंभले. स्वराज्य संवर्धनामुळे नकळत मोऱ्यांच्या स्वतंत्र सत्तेला धोका उत्पन्न झाला.महाराजांचे उपकार विसरून या चंद्ररावाने आदिलशाही निष्ठा जाहीर करून महाराजांना शह देण्यास आरंभ केला तो असा,
जावळीचे मोरे प्रकरण- उत्तरार्ध
१) बिरवाडी टप्पाखालील काही गावांचा अधिकार बाजी पाटील व मालोजी पाटील यांच्याकडे होता परंतु चंद्ररावाने त्यांना हुसकून लावले.ती गावे स्वतः बळकावली. इ.स. १६५१-५२ मध्ये हे पाटील महाराजांकडे मदत मागण्यासाठी आले, महाराजांनी त्यांची वतनावर पूर्णस्थापना केली.चंद्रराव स्वाभावीकच चिडला असल्यास नवल नाही.
२) पुढे लवकरच स्वराज्यातील मुसेखोऱ्याचा गावकुळकर्णी 'रंगो त्रिमल वाकडे' याने एका विधवेशी सिंदळकीचा गुन्हा केला आणि शिवाजीराजे शासन करतील या भीतीने तो जावळीस आश्रयास आला.चंद्ररावणे त्यास आश्रय दिला आणि महाराजांची नाराजी स्वतःवर ओढावून घेतली.
३) चिखलीचा रामाजी वाडकर व चंद्रराव यांचे पूर्वीपासून वैर होते त्यामुळे चंद्ररावाने त्यास जीवे मारले. या रामाजीचा पुत्र लुमाजी प्राणभयाने रोहीडेखोऱ्यात आला.चंद्ररावाने सुद्धा त्याचा पाठलाग सोडला नाही. स्वराज्य कक्षेत असणार्या रोहीडेखोऱ्यात घुसून त्याने लुमाजीला ठार केले.
४) अशाप्रकारे शक्तीप्रदर्शन करणाऱ्या चंद्ररावाने आता भेदनीतीचा अवलंब केला, गुंजणमावळात देशमुखी कोणाकडे यावरून शिंदे-चोरघे-शिलिमकरयांच्यात जुना वाद होता. शिलिमकरांनी यापूर्वी फतहखान मोहिमेत महाराजांना साथ दिली होती, त्यामुळे साहजिकच महाराजांनी त्यांचा पक्ष देशमुखीसाठी उचलून धरला. परंतु चंद्रराव हे शिलिमकरांचे मामा असल्याने मन वळवण्याच्या प्रयत्न चंद्ररवाने केला.हे वृत्त समजताच महाराजांनी शिलिमकरांना ताबडतोब अभयपत्र पाठवून मनधरणी केली.
जावळीचे मोरे प्रकरण- उत्तरार्ध
एकीकडे शिलिमकरांना अभयपत्र पाठवले तर दुसरीकडे शिवाजी महाराजांनी चंद्ररावाला जरबेचे पत्र पाठवले , त्यावर प्रतिक्रिया म्हणून 'येता जावली जाता गोवली' अशा शब्दात धमकीवजा उत्तर चंद्ररावाकडून मिळाले (मो.ब.), परंतु मोरे बखरीत आलेला पत्रसंवाद कालोकाल्पित वाटतो. समोपचाराने जावळी प्रकरण प्रकरण मिटत नाही हे आता स्पष्ट झाले होते. त्यामुळे बळाचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नव्हते.पण जावळीवर आक्रमण करणे तितके सोप्पे नव्हते. कारण विजापूरकर चंद्ररावाची पाठराखण करीत होता. वाईचा सुभा अफजलखानाकडे होता.शाहजीराजे सुद्धा नुकतेच अटकेतून मुक्त झाले होते. त्यामुळे अनुकूल संधीची वाट पाहणे भाग होते.
लवकरच अशी अनुकुलता महाराजांना लाभली. विजापूरकर आदिलशाह मरणासन्न झाला होता, त्यामुळे गादीसाठी विजापुरास अंतर्गत कलह सुरु झाले होते.अफझलखानही कर्नाटकात रवाना झाला होता, अशावेळी जावळीवर हल्ला केल्यास चंद्ररावाच्या मदतीला लगेच कोणीतरी धावून येईल ही शक्यता कमी होती. म्हणून जावळीवरील मोहिमेला सुरवात झाली, ती जोर खोऱ्यावरील हल्ल्याने. जेधे शकावली नुसार-
"त्यावरी जाउलीवरी मोहीम केली. कान्होजी नाईक यांस व अवघ्या देशमुखांस जामावानसी बोलाविले. जांबलीस मोरे होते. ते जेध्यांनी आधीच पिटाळून लाविले होते. जांबलीस मोरे कोणी नव्हते. जोरामध्ये हनमंतभाऊ मोरे होते. त्यावरी राजश्री स्वामींनी (शिवाजी) रघुनाथ बल्लाळ सबनीस पुण्याहून स्वरांच्याजमावानसी पाठवले. त्यांनी हनमंतभाऊ यास मारून जोर घेतले, जाउली मात्र राहिली होती."
जावळीचे मोरे प्रकरण- उत्तरार्ध
यानंतर शिवाजीराजे पुरंदरवरून जावळीवर आक्रमणार्थ दहा हजारांची फौज घेऊन निघाले (शि.का.). महाराजांनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या. मोठी तुकडी रडतोंडी घाटाच्या दिशेने गेली तिकडे मोऱ्यांच्या सैन्याने प्रतिकार केला. छोट्या तुकडीसोबत खासे महाराज महाबळेश्वर मार्गे निसणीच्या घाटाने जावळीत उतरले. त्यांना विशेष प्रतिकार झालाच नाही. दुपारपर्यंत मोठी फौजही तिथे पोहचली आणि शिवाजीराजांनी जावळी हस्तगत केली. शके १५७७ मन्मथ संवछरी राजश्री सिवाजीराजे यांनी पौष चतुर्दशीस जाऊन जावली घेतली [१५ जानेवारी १६५६] (जे.श.)
चंद्रराव (येसाजी) पळून रायरीच्या (आत्ताचा रायगड) किल्यावर आश्रयास गेला. शिवाजीराजांच्या सैन्याने त्याचा पाठलाग केला. पुढे चंद्ररावाला आणि त्याच्या कृष्णाजी व बाजी या मुलांना शिवाजीराजांनी कैद केले.शरण आलेल्या चंद्ररावाने काही दिवसात पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिवाजीराजांनी त्याला आणि कृष्णाजीला ठार केले. बाजी मात्र पळून गेला.
जावळी घेतल्यावर लवकरच चंद्रगड,मकरंदगड,चांभारगड हे किल्ले स्वराज्यात सामिल झाले. शिवाजी महाराजांचे लक्ष जावळीतल्या भोरप्याच्या डोंगरावर गेले.त्याचा 'ढोळपाळाचा डोंगर' असाही उल्लेख मिळतो (प्रतापदुर्गामहात्म्य). जावळी अभेद्य करण्यासाठी महाराजांनी भोरप्याच्या डोंगरावर किल्ला बांधायचा निश्चय केला आणि लगेच मोरोपंत पिंगळे यांना गड बांधण्यास सांगितले . गडाचे नामकरण 'प्रतापगड' असे करण्यात आले.ही जावळी ताब्यात आल्याने कोकणात उतरण्याचा मार्ग खुला झाला. आणि नव्याने बांधलेल्या याच प्रतापगडाने पुढे महाराजांचा अफझलखानासोबत घडलेला महापराक्रम पाहिला.
|| लेखनसीमा ||
रोहित पवार
संदर्भ :
मोरे बखर (ऐतिहासिक बखरी)- संपादक : अविनाश सोवनी
परमानंदकृत शिवभारत - संपादक : स.म.दिवेकर
प्रतापगडदुर्गमहात्म्य - संपादक : सदाशिव शिवदे
श्री राजा शिवछत्रपती - गजानन भास्कर मेहेंदळे
शककर्ते शिवराय - विजय देशमुख

1 comment:

  1. In this manner my associate Wesley Virgin's tale begins with this shocking and controversial VIDEO.

    You see, Wesley was in the army-and shortly after leaving-he discovered hidden, "self mind control" tactics that the government and others used to get whatever they want.

    These are the exact same tactics many celebrities (notably those who "became famous out of nothing") and top business people used to become rich and successful.

    You probably know how you only use 10% of your brain.

    That's mostly because most of your brain's power is UNCONSCIOUS.

    Maybe this conversation has even occurred IN YOUR own head... as it did in my good friend Wesley Virgin's head about seven years back, while riding a non-registered, beat-up garbage bucket of a car without a driver's license and with $3 in his pocket.

    "I'm so frustrated with living paycheck to paycheck! When will I get my big break?"

    You've been a part of those those types of questions, right?

    Your success story is going to start. You just need to take a leap of faith in YOURSELF.

    CLICK HERE TO LEARN WESLEY'S METHOD

    ReplyDelete

Website Security Test