Saturday, March 2, 2013

जुलै दिनविशेष



जुलै


१ जुलै १६९३
छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूनंतर मोघलांकडे गेलेल्या सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामील नवजी बलकावडे या सरदाराची ही कामगिरी.

२ जुलै १६४९
फत्तेखान पराभूत होऊन पळाला, त्या बेलसरच्या छावणीपासून जवळच असलेल्या मोरगावच्या मोरेश्वराला पुजेसाठी फुलझाडे लावावयास शिवाजी राजांनी ६ बिघे जमीन अर्पण केली. पहिल्या विजयानंतर श्रींना वाहिलेल्या श्रींच्या राज्यातील या पुष्पदूर्वा !

४ जुलै १७२९ सरखेल कान्होजी आंग्रे स्मरणदिन. (समाधी स्थळ - ठुकराली नका, अलिबाग)
तुकोजी संकपाळ व बिम्बाबाई चा हा मुलगा राजगुरुनगर येथे जन्मला. नवसाने आणि अंगाऱ्या धूपाऱ्याने जन्मला म्हणुन आडनाव आंग्रे लाविले. त्यांनी ३ लग्ने केली. पाहिली पत्नी राजूबाई / मथुराबाई कडून त्यांना सेखोजी आणि संभाजी उर्फ़ आबासाहेब अशी २ मुले झाली. सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नाव वरुन ठेवले गेले. दूसरी पत्नी राधाबाई / लक्ष्मीबाई कडून त्यांना मानाजी आणि तुळाजी असे २ पुत्र झाले. तर तिसरी पत्नी गहिणबाई कडून त्यांना येसाजी व धोंडजी असे २ पुत्र झाले. या शिवाय शेवटी एक मुलगी झाल्याने तिचे नाव 'लाडूबाई' ठेवले गेले.
छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळात कान्होजी सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते. १६८८ मध्ये सुवर्णदुर्गचा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेउन फितुरीने किल्ला सिद्दीकड़े सोपवणार असे कळल्यावर कान्होजी यांनी सिद्दीविरुद्ध किल्ला लढवला आणि पराक्रम केला. पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराम महाराजांनी कान्होजी अंग्रे यांना सरखेल (आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले. ते त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांसकडेच होते. मराठा - मुघल युद्धामध्ये कोकणपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी पार पाडले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांना त्यांनी चांगलेच जेरिस आणले आणि संपूर्ण भागात आपला वचक प्रस्थापित केला.
१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फुट पडल्यावर मात्र त्यांनी कोणाचीही बाजु न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला. मात्र पुढे त्यांचे बालमित्र असलेले बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला.
सरखेल कान्होजी आंग्रे यांची मुद्रा - "शाहूकार्ये धुरंदर तुकोजी तनुजनमानहा कान्होजी सरखेलस्य मुद्री येकम विराजते"
पुढे त्यांनी अलीबाग हे आपले मुख्य ठाणे बनवले जेथे आजही त्यांचे वंशज राहतात. ४ जुलै १७२९ रोजी ह्या विराला मरण आले. परकियांची सत्ता या भूमीत रोवु न देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी पार पाडले. त्यांना लक्

६ जुलै १७३५
 मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास आले तेव्हा पेशवे बाजीराव थोरले त्यांना भेटण्यास घोरपडीपावेतो सामोरे गेले.

११ जुलै १६५९
अफजलखानाशी लढावयास शिवाजी राजे राजगडाहून प्रतापगडावर गेले.
स्वराज्याच्या भूमीवरती (१२ मावळ प्रांतात) युद्ध होऊ नये म्हणुन स्वराज्याच्या सरहद्दीवरती जाउन लढायची शिवरायांची रणनीती होती. शिवाय अफझलखानाच्या अवजड फौजेशी लढाईसाठी जावळी ही अतिशय योग्य रणभूमी आहे हे राजांना खुप आधी पासून पक्के ठावुक होते. त्यासाठीच तर त्यांनी २ वर्षात भोरप्याच्या डोंगरामधून प्रतापगड बांधून काढला होता. त्यात प्रतापगड हा मुळातच भयाण सह्याद्रीच्या एकदम बेचक्यातील ही जागा. प्रतापगड ला जाण्याची एकच वाट रणतोंडीची वाट ज्या वाटेवरून जाताना तोंड रडल्यासारखंच होणार अशी ही वाट. इतकी नैसर्गिक अनुकलता शिवासुत्रासाठी (गनिमीकाव्यासाठी) पुरेशी होती.
उन्मत्त हत्तीला जंगलात खेचून आणून मारायचा डाव लवकरचं फत्ते केला जाणार होता...

११ जुलै १६६७
मिर्झा राजे जयसिंह यांचा बूर्‍हाणपूर येथे मृत्यू.

१२ जुलै १६६० - पन्हाळगडच्या वेढ्यातून सुटका
महाराज पन्हाळगडाहून निघाले. रात्री दहाचा सुमार होता. आषाढी पौर्णिमेची ही रात्र होती. (दि.१२ जुलै १६६०) पण चंद्र काळ्याकुट्ट ढगांच्या आड लोपला होता. महाराज पालखीत बसलेले होते. पालखी मावळ्यांनी उचलली. बाजीप्रभू निघाले. ६०० मावळेही निघाले. आणी एक रिकामी पालखीही निघाली. पाऊस, वादळ, विजा अखंड चालू होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते. सिद्दी जौहरची छावणी पूर्णपणे गाफील बनलेली होती. शिवाजी उद्यांच शरण येणार आहे ! मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर उभे राहा ? करा उबदार आराम ! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले बनले होते. झाडाझुडपातूंन अन् खोगळ्यांतून महाराजांची पालखी धावत होती.

पाऊस पडत होता. आभाळ गडगडत होते. छाताडे धडधडत होती. विजा लखाकत होत्या. पालखी धावत होती. नजरा धास्तीने भिरभिरत होत्या. छावणीच्या सांदिसपाटीतून ती पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली.
वेढापासून पालखी पुष्कळच दूर गेली. एवढ्यात घात झाला ! जौहरच्या हेरांनी पालखी ओळखली. आता ? त्या रिकाम्या पालखीत आता एक महाराजांसारखा दिसणारा एक जवान बसला. ती पालखी घेऊन १५ - २० लोक मुख्य रस्त्याने धाऊ लागले. आणि महाराजांची पालखी बाजी प्रभुंनी एकदम आडमार्गाने विशाळगडाकडे न्यायला सुरूवात केली.
शत्रुचा पाठलाग अटळ होता. अन् खरोखरच जौहरची फौज सिद्दी मसाउदच्या बरोबर पाठलागावर निघाली. एकदम त्यांनी पालखीला गराडले. त्यांनी मावळ्यांना विचारले की, आत कोण आहे ? उत्तर मिळाले की पालखीत शिवाजी राजे आहेत. पालखी सकट महाराज कैद झाले अन् सिद्दीच्या छावणीत दाखल झाले. सिद्दीसमोर मान खाली घालून उभे राहिले. पण जाणकारांनी ओळखले ! काही गडबड आहे. चौकशी झाली. अन् कळले - की हा तर शिवा न्हावी आहे. ताबडतोब स्वराज्याच्या त्या शिलेदारांची गर्दन उडाली.
पुन्हा सिद्दी मसाऊद पाठलागावर निघाला. नुसताच मनस्ताप - पश्चात्ताप - चिडचिड आणि वडवड. घोड्याला टाच मारून आवघे एल्गारत निघाले...वाटेतील गुढगा - गुढगा चिख्खल तुडवीत.

१२ जुलै १६६० पावनखिंड – आषाढ शुद्ध पौर्णिमा , गुरुपोर्णिमा
बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली " पावनखिंड ". जेथे बाजीप्रभूंनी देह ठेवला. जेथे त्यांनी मृत्यूला सुधा ओशाळविले.
जीवन
बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. शिवाजीराजांना विरोध करणार्‍या बांदलांचे बाजी दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली.
पावनखिंडीचा लढा
सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. त्या वेळी, आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापूरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली. सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणार्‍या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. ही घटना १३ जुलै, इ.स. १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे. घोडखिंडीतला हा लढा मराठ्यांच्या इतिहासात पराक्रमाची शर्थ मानला जातो.
प्रभाव
मराठ्यांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली, म्हणूनच तिला पावनखिंड संबोधले जाऊ लागले. बाजी - फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजी प्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजी प्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.

१३ जुलै १६६० (आषाढ वद्य प्रतिपदा)
सिद्दी मसूद दौडत पाठलागावर निघाला. २००० घोडदळ व मागोमाग १००० पायदळ निघाले. पुन्हा तिच वाट. तोच चिखल. तेच शेवाळे. अंधार आणि आडथळे.
उजाडले ! आषाढ वद्य प्रतिपदा उगवली.
आणी आली ! सिद्दी मसूदच्या घोडेस्वारांची आरोळी आली. मावळ्यांची, बाजींची आणि महाराजांची उलघाल उडाली. मोठ्या मेटाकुटीने त्यांनी गजापूरची घोडखिंड गाठली. विशाळगड ४ कोस दूर होता.वख्त बाका होता. बाजींनी महाराजांना हट्टाने विशाळगडला जायला लावले. आणी निम्म्या सैन्यानिशी घोडखिंडीच्या तोंडावर शत्रूला अडवायला बाजी उभे राहिले. महाराज गडावर पोहोचून इशारती होईपर्यंत बाजी खिंड झुंजवणार होते ! सिद्दी आलाच. भयंकर रणकंदन सुरू झाले.
खळाळणार्‍या आषाढधारात मावळ्यांचे रक्त मिसळत होते. लौकरात लौकर गडावर जाऊन इशारतीच्या तोफा उडविण्यासाठी महाराज धांवत होते. महाराजांनी विशाळगडचा पायथा गाठला आणि घात झाला. सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी महाराजांवर चालून निघाले. हे आमचेच लोक, पण बादशाही चाकरीत स्वराज्याशी वैर करणारे पापग्रह. सुर्वे व दळवी यांनी महाराजांची वाट आडवली. झुंज सुरू झाली. घोडखिंड लगीनमंडपासारखी गाजत होती. बाजी वाट बघत होते मुहुर्ताच्या तोफेची.
दिवस सरला. खिंडीत अद्यापही झुंज चालू होती. गेले २१ तास सारेजण अविश्रांत श्रमत होते. आधी धावताना व नंतर लढताना. संध्याकाळ झाली. अंधार वाढत चालला. आणी कोंडी फोडून शिवाजी महाराज विशाळगडावर पोचले. भराभरा तोफांची सरबत्ती सुरू झाली. अन् आनंदाचा कल्लोळ बाजींच्या मनी उठला. कामगिरी फत्ते झाली होती. तेवढ्यात खाडकन् घाव बाजींच्या छातीवर बसला ! बाजी कोसळले ! छाती फुटली ! तरिही बाजी आनंदातच होते. "स्वामी कार्यी खर्च जाहलो. आतां सुखे जातो." हाच तो आनंद होता. गजापूरची खिंड पावन झाली होती. (दि. १३ जुलै १६६०, सायंकाळी सुमारे ७.३० वाजता)

१५ जुलै १६७४
बहादूरखान कोकलताश याच्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली. सुमारे १ कोटीची लूट रायगडावर जमा झाली.
राजाभिषेकानंतर पुन्हा एकदा मराठ्यान्नी मुघल भागात छापे मारून लुट मिळवणे सुरु केले. पेडगावमध्ये मोठ्या प्रमाणात मुघल फौज होती मात्र मराठ्यान्नी त्यांना मुर्ख बनवून लुट मिळवली. काही हजारांचे सैन्य आधी पेड़गाववर चालून गेले आणि जेंव्हा मुघल फौज समोर उभी ठाकली तेंव्हा मात्र मागे फिरून पळू लागले. मुघल फौजेला वाटले मराठे घाबरुन मागे पळत आहेत.
मात्र डाव वेगळाच होता. ज्याक्षणी मुघल फौज मराठा सैन्याचा पाठलाग करत-करत पेड्गावच्या हद्दीपासून दूर गेली त्याक्षणी दुरवर लपून बसलेल्या इतर मराठा फौजेने पेड़गावमध्ये प्रवेश केला आणि संपूर्ण पेड़गाव लुटले. अर्थात मुघल फौजेला जेंव्हा जे समजले त्यावेळी ते मागे फिरले मात्र मराठा सैन्याने तोपर्यंत आपले काम चोख केले होते. ह्यालुटीने राजाभिषेकाचा बराचसा खर्च शिवरायांनी भरून काढला.

२० जुलै १७६१
माधवराव यांनी पेशवेपदाची सूत्रे हाती घेतली.
पानीपतच्या युध्हानंतर नानासाहेब पेशवे यांचा मृत्यू झाला. रघुनाथराव यांनी पेशवेपदावर दावा सांगितला पण माधवराव यांनाच पेशवेपद मिळाले.
खचलेल्या मराठा साम्राज्याला नवी उभारी देण्यास वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी पेशवे माधवराव सज्ज झाले होते.

२० जुलै १६७२
मोरोपंत पेशवे पंतप्रधान यांनी नाशिक जिंकले.

२० जुलै ते २७ जुलै १६७७
शिवाजी महाराज व एकोजी राजे भोसले यांची भेट.

२२ जुलै १६७८
तामीलनाडू मधील वेलोरचा किल्ला हंबीरराव, रघुनाथपंत व आनंदराव मकाजी यांनी जिंकला.
जिंजी येथील राजकारण यशस्वी करून आणि जिंजी ताब्यात घेउन छत्रपति शिवाजी महाराज वेल्लोर किल्ला जिंकायला स्वतः जातीने दाखील झाले होते. किल्ल्याला वेढा घालून सुद्धा किल्ला सहजा-सहजी हातात येणार नाही आणि ह्यात वेळ बराच जाणार आहे असे समजल्यावर त्यांनी रघुनाथपंत व आनंदराव मकाजी यांच्यावर ही कामगिरी सोपवली. पूर्ण किल्ल्याला चारही बाजूने खोल खंदक असून सुद्धा हा किल्ला मराठ्यान्नी जिंकला.

२२ जुलै १६८९
पोर्तुगीजांच्या वाढत्या हालचालींना पायाबंद घालण्यासाठी मराठ्यांनी शंभूराजांच्या नेतृत्वाखाली उत्तर कोकणात रेवाड्यांवर चढाई केली  आणि चौलच्या किल्ल्याला वेढा घातला. किल्ल्यावरील कॅप्टन दोम फ्रान्सीस्को द कास्त याने मराठ्यांनी लावलेल्या शिड्या खाली ढकलून दिल्या. वसईच्या जनरलने मराठ्यांविरुद्ध सिद्दी याकुताखानाकडून ४०० सैनिकांची कुमक मिळवली. त्यापैकी किमान ५० जण बुडून मेले. युद्धाला तोंड फुटले. पोर्तुगीजांच्या अचूक नेमबाजीमुळे मराठे ठार होऊ लागले हे पाहताच शंभूराजांनी माघार घेऊन जवळच्या टेकडीवरील कोरलईच्या किल्ल्यावर हल्ला केला. किल्ल्याच्या कॅप्टनने गुप्तपणे किल्ला चढणाऱ्या मराठ्यांना पाहून तोफा डागल्या. शंभूराजांच्या आज्ञेवरून निळो मोरेश्वर पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी उत्तरेतील मुलखाची जाळपोळ केली.

२५ जुलै १६४८
विजापूर बादशाहाच्या आज्ञेने मुस्तफाखानाने जिंजी नजीक शहाजी राजांना कैद केले.
शहाजीराजांवर वजीर मुस्तफाखानाचा विश्वासघातकी छापा पडला. आपल्यावर काही तरी घातकी संकट येणार आहे , आणि ते वजीराकडूनच येणार आहे हे आधी समजलेले असूनसुद्धा शहाजीराजे गाफील राहिले. झोपले. आणि वजीर मुस्तफाने त्यांना कैद केले. हातापायात बेड्या ठोकल्या. राजांची रवानगी कैदी म्हणून विजापुरास झाली. ही घटना तामिळनाडमध्ये मदुरेजवळ घडली.
शहाजीराजांना अपमानास्पदरीतीने विजापुरात आणण्याची कामगिरी अफझलखानाने केली. राजांना 'सत्मंजिल ' या हवेलीत आदिलशहाने कैदेत ठेवले.
पुढे १६ मे १६४९ रोजी विजापुरच्या आदिलशहाकडून शहाजीराजांची सुटका झाली.
शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि मुघलांचा दख्खनेचा सुभेदार शहजादा मुराद यास १४ मार्च १६४९ रोजी पत्र लिहिले होते. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर १६ मे १६४९ रोजी शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.

२५ जुलै १६६६
औरंगजेबाने शिवरायांसोबत आग्रा येथे आलेल्या मराठा फौजेचे परतीचे परवाने शिवरायांकड़े सुपूर्त केले.
दि. ७ जून १६६६ रोजी शिवाजी राजांनी औरंगजेबाकडे मागितलेले परवाने, अखेर आजच्या दिवशी औरंगजेबाने ते परवाने महाराजांना दिले. या परवान्यानूसार शिवाजी राजांना आपल्याबरोबर आलेल्या फौजेला आग्र्याहून रजा देऊन महाराष्ट्रात पाठवता येणार होते.

३१ जुलै १६५७
मुघलांनी विजापुरचा 'कल्याणी' किल्ला जिंकून घेतला.

No comments:

Post a Comment

Website Security Test