Saturday, March 2, 2013

ऑक्टोबर दिनविशेष



ऑक्टोबर


२ ऑक्टोबर १६७०
शिवाजी महाराज पुन्हा एकदा लुटीसाठी सुरते नजीक १५,००० फौजेनिशी धडकले.

३ ऑक्टोबर १६७०
द्वितीय सुरत लुट. प्रथम दिन.
- शिवाजी राजांनी सूरत पुन्हा एकदा लुटली. पंतप्रधान मोरोपंत पिंगळे, सरनौबत प्रतापराव गुजर यांच्या समवेत १०००० घोडदळ आणि १०००० पायदळ घेउन पहिल्या सूरत लुटीवेळी घेतलेल्या मार्गानेच राजे ३ ऑक्टोबर रोजी सूरत येथे पोचले.
सूरत येथील मुघल अधिकाऱ्याला पाठवलेल्या पत्राचे स्वैर मराठी भाषांतर -
"बादशहामुळेच मला माझ्या जनतेचे आणि देशाचे रक्षण करण्यासाठी फौज उभी करावी लागत आहे. तेंव्हा त्या फौजेचा खर्च तुम्हीच द्यायला हवा. मी तिसर्यांदा आणि शेवटचे सुरतेच्या उत्पन्नाचा चौथा भाग मागत आहे."
ह्या पत्रामध्ये शिवाजी राजांचा हेतु आणि उद्देश स्पष्ट दिसून येतो.
” I demand for the 3rd time, which I declare to be the last, chauth part of revenue under your government. As your emperor has forced me to keep an army for the defense of my people & country, that army must be paid by his subjects.”

४ ऑक्टोबर १६७
द्वितीय सुरत लुट. द्वितीय दिन.

५ ऑक्टोबर १६७०
दुसर्यांदा सूरत लुटल्यावर शिवाजी राजे वेगाने परतीच्या मार्गावर. दुसरीकडे जबरदस्त धक्का बसलेल्या मुघल फौजेची लढाईसाठी हालचाल सुरू.
शहजादा मुअज्जमने दाउदखानला शिवाजी राजांना बागलाण - नाशिक येथे अडवण्यास सांगितले. मुघलांची लढाईची पूर्ण तयारी नव्हती. मराठा फौज मात्र लढाईसाठी सज्ज झाली होती.

६ ऑक्टोबर १६७६
छत्रपति शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयास निघाले. या दिवशी दसरा होता.

८ ऑक्टोबर १६७९
कॅप्टन रिचर्ड केग्वीन खांदेरीच्या नाकेबंदीवर पोचला. १० तारखेला त्याला खबर मिळाली की दौलतखान खांदेरीच्या दिशेने येत आहे.

९ ऑक्टोबर १६६७
पुरंदर तहातील कलमानूसार व शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील पत्र व्यवहारानुसार औरंगजेबाने पुन्हा मनसबदारी बहाल केल्या नंतर संभाजी राजे शिवाजी महाराजांच्या हुकुमावरून कार्तिक वद्य द्वीतियेला ९ ऑक्टो १६६७ रोजी औरंगाबादेस शहजादा मुअज्जम यास भेटावयास गेले. (शिवापूर दफ्तर यादी) संभाजी राजानंसोबत यावेळी महाराजांनी प्रतापराव गुजर आणि निराजी रावजी सोबत राहुजी सोमनाथ यांना सुभेदार आणि प्रल्हाद निराजी यांना लष्कराचे सबनीस म्हणून पाठवले.(सभासद बखर)

११ ऑक्टोबर १६७३
खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठविलेल्या सैन्यामुळे मुंबईतील सैन्य कमी झाले व मुंबईचा धोका वाढला. मराठे साष्टी (ठाणे) मधून मुंबई वर चालून येण्याचा प्रयत्न करीत आहेत असे इंग्रजांना कळले परंतु तेथील पोर्तुगीजांनी त्यांना अडवल्यामुळे मुंबईकर इंग्रजांच्या जीवात जीव आला व त्यांनी त्वरित ५० टोपाझ सैनिकांची भरती रक्षणार्थ केली. सुंदरजी प्रभू नामक शिवाजीराजांचा एक हेर मुंबईमध्ये गुपचूप माहिती जमा करीत असताना इंग्रजांच्या तावडीत सापडला. इंग्रजांनी त्याच्या कडून माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात अपयश येऊन इंग्रजांनी त्याला कैदेत टाकले. तसेच मुंबईतील काही गरीब रहिवाश्यांना चौलच्या आस-पास टेहळणी करिता पाठवले व त्यांना आदेश दिला कि त्यांनी दर ३-४ दिवसांनी मुंबईला मराठ्यांच्या हालचालीबद्दल खबर कळवावी.

१३ ऑक्टोबर १६७३
मराठ्यांनी वाईनजिकचा पांडवगड जिंकला.
बाळाजी आवजींचा सातारा येथे पालखी देऊन महाराजांनी गौरव केला.

१५ ऑक्टोबर १६७९
खांदेरीजवळ कॅप्टन रिचर्ड केग्वीन आरमारासह नांगर टाकून सज्ज होता व ज्या गोष्टीची तो वाट पहात होता ती गोष्ट अखेर घडली. दि १५ ऑक्टोबर रोजी त्याला सुमारे ३५ नौकांचे मराठी आरमार खांदेरीच्या दिशेने येताना दिसले. ते दिसताच केग्वीन ने नांगर उचलले आणि तो युद्धाची तयारी करू लागला परंतु मराठी आरमार पुढे आलेच नाही उलट त्यांना इंग्रज आरमार दिसताच ते पुन्हा मागे फिरले आणि थळ जवळील उथळ समुद्रात नांगर टाकून थांबले. केग्वीन आता गोंधळात पडला त्याला नेमके काय करावे हे सुचेना त्यामुळे तो पुन्हा नांगर टाकून उभा राहिला. १६ तारखेला मराठ्यांच्या आरमारातील नागावच्या खाडीत शिरल्या. इंग्रज नौका काही काळ जाऊन मराठी नौकांवर गोळीबार करत असत परंतु भूमीवर गोळीच्या टप्प्यात येत नसल्या कारणे त्यांना पुन्हा मागे फिरावे लागत असत. मराठ्यांचे आरमार खांदेरीच्या आसमंतात आल्यामुळे एक गोष्ट मात्र घडली की इंग्रज नौकांना आता एकत्र राहणे भाग पडत होते कारण तसे न केल्यास मराठी आरमार एका जहाजाच्या मागे लागून ते जहाज पळवून नेऊ शकले असते. अशा रीतीने इंग्रजी नौका एकत्र आल्यामुळे खांदेरीची नाकेबंदी मात्र ढिली पडली आणि मराठ्यांच्या छोट्या होड्या त्यांना आश्चर्यकारक रित्या चकवून खांदेरीला पुरवठा करू लागल्या.

१६ ऑक्टोबर १६७०
मुघल सुभेदार दाउद खानला बाकीखान येउन मिळाला. दुसऱ्यादा सूरत लुटल्यावर शिवाजी राजे वेगाने परतीच्या मार्गावर निघाले होते. शहजादा मुअज्जमने दाउदखानला शिवाजी राजांना बागलाण - नाशिक ह्या मोघली भागात अडवण्यास सांगितले होते.
सर्वात पुढे असणाऱ्या इखलास खान मियाना याने मात्र दाउदखानाची वाट न बघता मराठ्यांच्या १५ हजाराच्या फौजेवर हल्ला चढवून मोठी घोडचुक केली. तो स्वतः त्याच्या फौजेसकट जबर जखमी झाला. काही वेळात दाउद खानच्या सोबत असलेल्या बुंदेलेंच्या फौजेने मराठ्यांना काही प्रमाणात रोखले. संपूर्ण दिवसात मराठ्यान्नी 'बेरीरगिरी' म्हणजे 'शत्रुला चोहू बाजूने घेरून केली जाणारी फिरती लढाई' या तंत्राने मुघलांना हैरान करून सोडले. संध्याकाळी मराठा फौजेने पुन्हा एकदा मुघलांवर जबर हल्ला चढवत आपली पुढची वाट मोकळी करून घेतली आणि ते सुरतेच्या लुटी सकट पुढे सटकले.


१७ ऑक्टोबर १६७०
दिंडोरी नजिक मोगलांनी (दाऊदखान) महाराजांना गाठले. लूट मार्गी लाऊन शिवाजी महाराज १०,००० फौजेसह मागे राहिले. फार मोठे युद्ध दाऊद खान व शिवाजी महाराज यांच्यात झाले. यात दाऊदखानाचा दणदणीत पराभव झाला.

१८ ऑक्टोबर १६७९
१८ ऑक्टोबर च्या सकाळी मराठ्यांचे सुमारे ५० गुराबांचे एक पथक वेगाने वल्ही मारत इंग्रजी आरमाराच्या रोखाने येऊ लागले. समुद्राला भरती होती आणि वारा पूर्व दिशेने वाहत होता. इंग्रजी आरमार थळ आणि खांदेरीच्या मध्ये नांगर टाकून उभे होते. वाऱ्याच्या अनुकुलतेचा फायदा घेत मराठ्यांनी इंग्रजी आरमारावर तोफांची सरबत्ती सुरु केली. केग्विनला मुंबई कौन्सिलने आदेश दिला होता की मराठ्यांनी हल्ला केल्यास प्रथम त्यांना सामोपचाराने समजावून सांगावे पण या करिता केग्विनला वेळच मिळाला नाही ! त्याच्यावर थेट हल्ला झाला होता. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे इंग्रजी आरमार गोंधळात पडले. मराठ्यांनी केलेला हल्ला हा नावांच्या नाळेच्या दिशेने होता. जहाजावरील तोफा ह्या नाळेच्या काटकोनात असत त्यामुळे इंग्रजांना त्यांची गलबते फिरवून हल्ला करावा लागणार होता. फ्रिगेट व काही शिबाडांवर पिछाडीस असणाऱ्या एक दोन तोफांनी प्रतिहल्ला सुरु केला.हल्ल्यातून वाचण्यासाठी इंग्रजी आरमाराने नांगर कापून टाकले आणि शिडे सोडून मिळेल त्या वाऱ्याच्या दिशेने ते सैरावैरा भटकू लागले. बरीचशी जहाजे दक्षिणेच्या वळणावर लागली जाणाऱ्या जहाजांमध्ये रिव्हेंज ही फ्रिगेट आणि डव्ह ही गुराब सगळ्यात शेवटी होत्या. मराठ्यांच्या वल्हवणाऱ्या होड्यांनी आता डव्हला वेढले. डव्ह वेधली गेलीये पाहताच काही लोकांनी समुद्रात उड्या टाकल्या. डव्ह चा कर्णधार होता फ्रांसिस मोलीव्हेयार त्याने डव्ह संकटात पाहताच रिव्हेंज कडे मदत मागितली. रिव्हेन्ज्ला वारा अनुकूल नव्हता तसेच हालचाल करण्याकरिता पुरेशी जागाही नव्हती आणि त्यामुळे रिव्हेंज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता वाढली. त्यामुळे रिव्हेंज स्वतःचा बचाव करू लागली. या दरम्यान डव्ह जवळून सार्जंट डकट आणि सार्जंट फुलर यांचे मचवे गेले पण ते मदतीस आले नाहीत. मराठे जवळ येऊ लागले तसे डव्ह वरील ‘Union Jack’ आणि शिड उतरली; हे शरणागतीचे निशान होते. डव्ह चा खलाशी जॉन नेलर याचा मराठ्यांशी पूर्वी संबंध आला असे दिसते कारण त्याने इतरांना सांगितले
“शस्त्र खाली ठेवल्यास मराठी हल्ला करणार नाहीत व कैद करतील अथवा ते जहाजावर कब्जा करून सर्वांना कापून काढतील”
 आणि त्याप्रमाणे सर्वांनी शस्त्र टाकले. मराठे डव्ह वर आले आणि त्यांनी डव्ह ताब्यात घेतली. मराठे पुढे निघाले, आता त्यांनी आपला मोर्चा रिव्हेंज कडे वळवला. मराठ्यांच्या गुराबा येताना दिसताच रिव्हेंज वर असणारे कॅप्टन रिचर्ड केग्वीन आणि कॅप्टन मिन्चीन यांनी रिव्हेंजवरील शिबंदीला भरोसा दिला व सांगितले की – “ख्रिस्ती लोकांनी काफिरांचे कैदी होणे हे नामुष्कीचे असून त्यापेक्षा लढण्यात धन्यता माना”. असे सांगून त्यांनी एक डाव रचला आणि शिड पाडली. शरणागतीचे चिन्ह समजून मराठ्यांच्या गुराबा वेढू लागताच रिव्हेंज वरून जोरदार प्रतिकार झाला आणि तोफा, बंदुकी यांचा एकच मारा मराठ्यांवर झाला. मराठे आता कोंडीत अडकले. इंग्रजांचा डाव त्यांना कळला आणि ते माघार घेवून नागावच्या खाडीकडे वळू लागले. परतीच्या वाटेवर असताना इंग्रजांनी मराठ्यांच्या पिछाडीवर काही मचवे पाठवले आणि भरपूर तोफगोळे उडवले. या धुमश्चक्रीत मराठ्यांच्या काही गुराबांचे नुकसान झाले आणि अंदाजे तीन गुराबा बुडाल्या असे इंग्रज नोंदींवरून कळते. मराठ्यांच्या काही गुरबा नागावच्या खाडीत गेल्या व काही गुरबा डव्ह समवेत खांदेरीकडे गेल्या. मराठ्यांनी कप्तान फ्रान्सिस मौलीव्हेयर सह सुमारे २५ युरोपियन लोक पकडले आणि सागरगडावर कैदेत रवाना केले. केग्विनने मुंबईला रवाना केलेल्या वृत्तानुसार त्याच्या नाविक दलाने मराठ्यांचे सुमारे २०० लोक मारले व १०० जखमी केले होते. या प्रसंगादरम्यान रिव्हेंज व्यतिरिक्त इतर जहाजावरील इंग्रजांची वागणूक अत्यंत भेकड आणि पळपुटी होती. याची तक्रार केग्वीनने मुंबईला केली. मराठ्यांनी कैद केलेल्या इंग्रजांना मुंबईशी पत्रव्यवहार करण्याची मुभा देण्यात आली होती. त्याप्रमाणे पुढे काही दिवसांनी फ्रांसिस मौलीव्हेयर याने मुंबईला पत्र पाठवून काही अन्न धान्य व औषधे मागितली जी मुंबईकर इंग्रजांनी सुरतेहून परवानगी मिळताच पुरवलेली आहेत.

१९-२० ऑक्टोबर १६७९
इंग्रज नौका दल आता खांदेरी आणि मराठे यांच्या मार्गात उभे राहिले. १९-२० ऑक्टोबरच्या रात्री मराठे वारा पडला की रिव्हेंजच्या आजूबाजूला घुटमळत असत. या हालचालींमुळे केग्वीन चिंतीत झाला व जहाजावरील इतरही लोक घाबरले. केग्वीन ने मुंबईला कळवले की अश्या परिस्थितीत जर मराठ्यांनी रिव्हेंजचे नांगर कापले तर ते आपण जहाज गमावू. पुढील काही दिवस वारा अनुकूल नसल्याने काही मचव्यांनी रिव्हेंजला ओढून खांदेरी पासून जरा अंतरावर आणून ठेवले. मराठ्यांना रसद पुरवण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांनी पुन्हा खांदेरीला रसद पुरवठा सुरु केला. या दरम्यान मुंबईहून ’Fortune‘ नावाचे ३ डोलकाठ्यांचे जहाज आणि २ आणखी शिबाडे नौका दलात सामील झाली. फोर्च्युनचा कॅप्टन होता स्टीफन अडरटन. ही जहाजे इंग्रजांनी गोव्याला भाड्याने दिली होती व ती परत येताच त्यांना खांदेरीच्या मोहिमेकरिता रवाना करण्यात आले होते. मुंबईला मराठ्यांचा धोका होताच आणि मराठ्यांचे प्रयत्न पोर्तुगीज मुलुखातून मुंबईत शिरण्याचे असे सुरूच होते. मुंबईत या वेळी बंदुकीची ५३२ पिंप भरून दारू होती व यातील ३०० पिंप पोर्तुगीझाना विकून टाकावी असे पूर्वी सुरतेने मुंबईला कळवले होते. परंतु मराठ्यांचा संभाव्य धोका लक्षात ठेवून जर पोर्तुगीजांनी त्यांना मार्ग दिला तर आपली तयारी असावी म्हणून इंग्रज दारू विकण्याचे टाळत होते. तसेच नौका दलातून शक्य असल्यास २ शिबाडे मुंबईला पाठवावी अशीही त्यांनी केग्वीनकडे मागणी केली परंतु केग्विनला ते शक्य नव्हते.

२२ ऑक्टोबर १६७९
मराठ्यांना खांदेरीला रसद पुरवण्याचा मार्ग मोकळा होता. २२ ऑक्टोबर रोजी राजापूरहून आलेली मराठ्यांची आणखी ३७ गलबते नागावच्या दलात सामील झाली. मराठे सैन्य वाढवीत होते त्या अर्थी ते लवकरच निकाली लढाई करतील असे केग्विनला वाटत होते. पुढील दहा दिवस मात्र मराठ्यांचा एक वेगळाच बेत चालला होता. इंग्रज रिव्हेंज आणि फोर्च्युन घेवून मराठ्यांच्या भीतीने खांदेरीच्या आसमंतापासून दूर रहात होते. याचा फायदा घेवून मराठे आपल्या लहान नौकांच्या आधारे रोज खांदेरीला रसद पुरवीत होते. केग्विनला रोज ५-७ नौका खांदेरीला जाताना अथवा येताना दिसत, मग इंग्रज सैन्य आपले मचवे त्यांच्या पाठीमागे पाठवत असत, पण त्या होड्या त्यांना चकवत व नागावच्या खाडीत पळून जात असत. इंग्रज खाडीत शिरत नव्हते कारण तो संपूर्ण प्रदेश मराठ्यांचा होता व खाडीत शिरल्यानंतर जर खाडीच्या मुखावर मराठ्यांनी हल्ला करून मार्ग बंद केला असता, तर इंग्रजी आरमार आयतेच अलगद मराठ्यांच्या हाती लागले असते. मराठ्यांचा खांदेरीला पुरवठा, इंग्रजांचा त्यांचा पाठलाग आणि मराठ्यांनी त्यांना चुकवणे किंबहुना बऱ्याचदा तर इंग्रजांना पिच्छा करायला लावून आपल्या जाळात अडकवणे आणि दूर नेवून एखादा मचवा पकडणे हा मराठ्यांचा व्यवसाय अगदी व्यवस्थित सुरु होता. गनिमी काव्याचा हा सागरावरील केलेला बहुदा हा पहिलाच प्रयोग असावा ! .इंग्रज या रोजच्याच उपद्व्यापामुळे जेरीस आले. केग्वीन या त्रासाने वैतागला आणि त्याने १ नोव्हेंबर १६७९ रोजी मुंबईला जे इतिहासप्रसिद्ध पत्र लिहिले त्याचा हा सारांश -
नागाव नदीच्या मुखाशी नौका ठेवण्याच्या बेताविषयी गेल्या पत्रात आपल्याला कळवले होते त्याप्रमाणे दिवसा ते शक्य नाही आणि रात्री चंद्र मावळेपर्यंत गस्त देऊनही उपयोग नाही कारण शत्रूची गलबते उशिराने येतात व वल्ही मारण्यात त्यांची शिताफी अधिक असल्यामुळे त्या आमच्या हाती लागत नाहीत. आम्ही त्रस्त आहोत. त्यांना अडविण्याच्या बाबतीत आम्ही कसलीही कसूर होऊ देत नाही याची आपण शाश्वती बाळगावी परंतु त्या लहान सरपटणाऱ्या होड्या आम्हाला आश्चर्यकारक रीतीने चकवतात.आता आम्हाला असे वाटू लागले आहे की आमच्या कडेही तसल्या होड्या असतील तर आम्हाला कदाचित मदत होवू ही शकेल …”
ज्या इंग्रजांना अगोदर वाटले होती की मराठ्यांच्या लहान होड्या आपण काही मोठी गलबते नेवून आरामात बुडवून टाकू तेच इंग्रज आता वरील पत्र लिहीत होते या वरून मराठ्यांचा निग्रह, त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी आणि त्यांची अनोखी युद्धनीती दिसून येते. गनिमी काव्याचा वापर करून ज्या मराठ्यांनी आजवर शत्रुसैन्याला डोंगर-दऱ्यांमधे जेरीस आणले होते त्यांनी तीच युद्धनीती सागरावर अवलंबून बलाढ्य सागरी सत्तेला जेरीस आणले होते.


२४ ऑक्टोबर १६५७
शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणात मुसंडी मारत कल्याण - भिवंडी - शहापुर हा मूघली-विजापुर भाग काबीज केला.
औरंगजेब दख्खनेवरुन दिल्लीला परतलेला आणि विजापुरच्या आदिलशहाचा मृत्यू ह्या १६५७ च्या सुरवातीच्या दख्खनेमधल्या राजकीय परिस्थितीचा फायदा उचलत शिवरायांनी उत्तर कोकण काबीज केले. १६५६ च्या जानेवारी मध्येच जावळी ते रायरी हा भाग ताब्यात घेत विजापुरचा उत्तर कोकणाशी थेट संपर्क त्यांनी जवळ-जवळ तोडला होताच.

२३ ऑक्टोबर १६६२
छत्रपति शिवाजी महाराजांनी १६६२ मध्ये 'रोहिडखोरे - कारी' येथील देशमूख 'सर्जेराव जेधे' यांना पत्र लिहिले.
१६६१ पासून मुघल सरदार शाहिस्तेखान पुण्यात येउन बसला होता. स्वराज्यावर सारखे हल्ले करत होता. ह्यात मावळामधल्या लोकांची जीवित व वित्तहानी खुप होत असे. आपल्या प्रजेबद्दल सदैव जागरुक असणाऱ्या राजांनी रोहिडखोरे मधील कारी येथील देशमूख सर्जेराव जेधे यांना २३ ऑक्टोबर १६६२ रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,"जे बांद धरून नेतील त्याचे पाप तुमचा माथा बसेल" ह्या पत्रामधून राजांची आपल्या रयतेविषयी असणारी काळजी व तळमळ दिसून येते.

२४ ऑक्टोबर १६६२
फोंडा हा सभोवती खंदक, जाड-जुड व मजबूत तटबंदीचा अभेद्य किल्ला होता. किल्ल्याजवळच दुर्भाट हे मराठ्यांचे महत्वाचे बंदर होते. २४ ऑक्टोबर ला पोर्तुगीज व्हाइसरॉय तिथे येवून पोहोचला. स्थानिक मराठी अधिकारी दुलबा नाईक याला फोडण्यात यश आले आणि दुर्दैवाने दुर्भाट अलगद फिरंग्यांच्या हाती आले. संतापलेले ३०० पायदळ आणि ६ मराठे घोडेस्वार फिरंग्यांवर चालून गेले. पण कॅप्टन दिओगोफोजीरा याच्या तिखट प्रतिकारामुळे मराठ्यांना परत फिरावे लागले.

२४ ऑक्टोबर १६६६
आग्राच्या सुटकेनंतर, शिवाजी सुटला आता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे १९ ऑगस्ट रोजी फर्मान सोडले होते. नेताजी पालकर या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते. २४ ऑक्टोबर रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी पालकर यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली.

२५ ऑक्टोबर १६७०
मोरोपंत पिंगळे पेशवे पंतप्रधान यांनी शिवनेरी जिंकण्यासाठी शिकस्त केली पण त्यात त्यांना अपयश आले. पण त्यांनी पुढे घुसून नाशिकजवळील ब्रह्मगिरी जिंकला.


२७ ऑक्टोबर १६६७ कार्तिक वद्य पंचमी
औरंगाबाद येथे संभाजी राजे व शाहजादा मुअज्जमची भेट. यावेळी संभाजी राजांच्या निसबतीस प्रतापराव गुजर सरनौबत, निराजी पंत, रावजी सोमनाथ, प्रल्हाद निराजी सबनीस इत्यादी मंडळी होती. औरंगाबादेस पोहचल्यावर संभाजी राजांनी जसवंतसिंहाची भेट घेतली

२८ ऑक्टो १६६७
संभाजी राजांची शहजादा मुअज्जम सोबत भेट झाली, शहजाद्याने बहुत सन्माने भेट घेतली हत्ती, घोडे, जवाहीर, वस्त्रे सर्वस दिली, व-हाड देश जागा जहागीर १५ लक्षंचा होनांचा दिला टक्का पैसा लोकास बहुत पावला.
(शिवापूर दफ्तर यादी, सभासद बखर)


३१ ऑक्टोबर १६७९
संभाजी राजे व दिलेरखान यांची विजापूरला मोर्चे बांधणी. शिवाजी महाराज व मोरोपंत पिंगळे पंतप्रधान पेशवे विजापूरजवळ कुमक घेऊन पोहोचले.

No comments:

Post a Comment

Website Security Test